नवी दिल्ली : महाराष्ट्रात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आल्याचं दिसत आहे. काल दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज काँग्रेस नेत्यांनी सोनिया यांची भेट घेतल्याची माहिती आहे.
आज, दुपारी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतल्याची माहिती मिळाली आहे. यात अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे आणि ए. के. अँटोनी यांनी सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या नेत्यांनी जवळपास 35 मिनिटे सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली. त्यात महाराष्ट्रात सत्ता स्थापने संदर्भातच चर्चा झाल्याची माहिती आहे.
ठोस निर्णय नाहीच!
महाराष्ट्रात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादीच्या सोबतीने शिवसेनेला पाठिंबा देऊन सरकार स्थापन करण्याचा पर्याय काँग्रेस पुढे आहे. यावर काँग्रेसमध्ये संभ्रम असून, राज्यातील नेते सरकार स्थापनेसाठी अनुकूल असल्याचे समजते. पण, शिवसेनेवर असेलला हिंदुत्ववादाचा शिक्का आणि काँग्रेसची देशभरातील प्रतिमा, अशा दुहेरी कचाट्यात काँग्रेस पक्षश्रेष्ठी फसले असल्याचे सांगितले जात आहे. काल, शरद पवार यांनी सोनिया गांधी यांच्याशी जवळपास 50 मिनिटे चर्चा केली. त्यानंतरही पवार यांनी सत्ता स्थापने संदर्भात ठोस निर्णय झाला नसल्याचे सांगितले.
घटकपक्षांचा दबाव आहे?
एका बाजुला राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेच्या सोबतीने सरकार स्थापन करण्यास अनुकूल आहे. पण, त्यांना काँग्रेसच्या सल्ल्याने पुढे जायचे आहे. निवडणूक काँग्रेसच्या सोबतीने लढवली असल्यामुळे काँग्रेसशी चर्चा करूनच काय तो निर्णय घेऊ, असे राष्ट्रवादीने वारंवार स्पष्ट केले आहे. दुसरीकडे काँग्रेस आघाडीतील घटकपक्ष त्यांना विश्वासात न घेण्यावरून नाराज असल्याचे दिसत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी कालच आपण, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आग्रही असल्याचे सांगितले आहे. त्यामुळं घटक पक्षांचा दबाव आहे का? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.