'सर्वांना लस नाही'; सरकारच्या निर्णयाला राहुल गांधींनी ठरवलं 'विचारशून्य'

rahul gandhi.
rahul gandhi.

नवी दिल्ली- देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणाची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सध्या देशातील ४५ वर्षांपुढील व्यक्तींना कोरोनाची लस दिली आहे. पण, कोरोनाचा प्रकोप कमी करायचा असेल, तर देशातील सर्व नागरिकांना लस दिली जावी, अशी मागणी होत होती. यावर बोलताना आरोग्य मंत्रालयाने तुर्तास सर्वांना लस देता येणार नाही, असं स्पष्ट केलं होतं. या मुद्द्यावरुन काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.  प्रत्येक भारतीयाला सुरक्षित जीवन जगण्याचा हक्क आहे, असे सांगत कोरोनाची लस सर्वांना मिळाली पाहिजे यावर राहुल गांधी यांनी बुधवारी भर दिला. ‘कोविड व्हॅक्सिन’ असा हॅशटॅक वापरत केलेल्या ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, गरज व इच्छा यावर चर्चा करावी लागते, हे हास्यास्पद आहे. सुरक्षित आयुष्याच्या संधीसाठी प्रत्येक भारतीय पात्र आहे. ज्यांना ती लस घ्यायची इच्छा आहे, म्हणून नाही तर ज्यांना लसीची गरज आहे, त्यांनाच लस मिळेल, असे आरोग्य विभागाने काल जाहीर केले. त्यावर राहुल गांधी यांनी हे ट्विट केलं.

भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी देशात लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्संना कोरोनाची लस देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यामध्ये 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेली व्यक्ती आणि असाध्य रोगाने ग्रासलेल्या 45 वर्षांपुढील व्यक्तींना कोरोनाची लस देण्यात आली. 1 एप्रिलपासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु करण्यात आला असून यात 45 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या सर्व व्यक्तींना कोरोनाची लस दिली जात आहे. लसीकरण होत असलं तरी देशात कोरोना रुग्ण वाढ थांबण्याचं नाव घेत नाहीये. त्यामुळे देशातील सरसकट नागरिकांना कोरोनाची लस देण्यात यावी. यात वयाचं मर्यादा असू नये अशी मागणी होतं आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाकडून यावर स्पष्टीकरण आलं होतं. सरकारचं लक्ष्य सर्वांना लस देण्यापेक्षा ज्यांना त्यांची सर्वाधिक गरज आहे अशांना ती देण्याचं आहे, असं केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी म्हटलं होतं.

कोरोना विषाणूमुळे होणारे मृत्यू कमी करणे आणि आरोग्य व्यवस्थेवरील भार कमी करणे हे सरकारचे उदिष्ट आहे. त्यामुळे सरसकट लोकांना कोरोनाची लस तुर्तास देता येणार आहे. ज्यांना लस हवी आहे, त्यापेक्षा ज्यांना लशीची सर्वाधिक गरज आहे, अशांना ती आधी दिली जात आहे, असं आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी स्पष्ट केलं होतं. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांत दिल्ली, महाराष्ट्र सरकारने कोरोना लसीकरणासाठी वयाची मर्यादा वाढवावी अशी मागणी केली होती. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com