नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई तसेच प्रियांका यांचे पती रॉबर्ट वद्रा यांनी राजकारणात उतरण्याचे सूतोवाच केले. लोकांना हवे असल्यास राजकारणात प्रवेश करण्यास तयार आहोत. त्यामुळे लोकांची मोठ्या मार्गाने सेवा करता येईल, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.वद्रा यांनी रविवारी उज्जैनमध्ये महाकाल ज्योतिर्लिंग मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर एका स्थानिक यूट्यूब वाहिनीला त्यांनी मुलाखत दिली. ते म्हणाले की, आपण देशातील जनतेमध्ये आहोत आणि जनताही आपल्या साथीला आहे. सध्याची परिस्थिती बघता मला असह्य होते.
वद्रा ५३ वर्षांचे आहेत. आपल्याला राजकारण समजते असा दावा करून ते म्हणाले की, मी त्यांचे प्रतिनिधित्व करावे असे लोकांना वाटत असेल आणि मी त्यांच्यासाठी काही बदल करू शकणार असेन तर मी हे पाऊल नक्कीच टाकेन. माझे सेवाभावी काम दहा वर्षांपेक्षा जास्त काळापासून सुरु आहे. भविष्यातही मी ते सुरु ठेवेन. मी राजकारण उतरेन किंवा नाही, हे काम सुरुच राहील, कारण लोकांची सेवा करण्याचा हा एक मुख्य मार्ग आहे.आज कोणत्या प्रकारचे राजकारण होत आहे आणि देश कसा बदलतो आहे, त्यावरून कुटुंबात दररोज चर्चा होते, असेही त्यांनी नमूद केले.प्रसार माध्यमांना खरे चित्र दाखविण्याची भीती वाटते, असा दावा करून ते म्हणाले की, हा काही लोकशाहीचा भाग नाही. त्यामुळे देशाची पुढे वाटचाल होणार नाही, पीछेहाटच होईल.
मोदींवर टीका
कोरोनात अचानक लॉकडाउन लावल्याबद्दल व बेरोजगारी वाढविल्याबद्दल वद्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. हिंदू-मुस्लीम यांच्यातील दरी संपली पाहिजे. धर्मनिरपेक्ष बनण्यासाठी देशाने सर्व पंथांचा स्वीकार केला पाहिजे, असे ते म्हणाले.
भाजपकडून प्रत्यूत्तर
भाजपच्या मध्य प्रदेश शाखेचे प्रवक्ते डॉ. हितेश वाजपेयी यांनी वद्रा यांना प्रत्यूत्तर दिले. ते म्हणाले की, वद्रा यांना जसे मंदिरांचे महत्त्व समजत नाही तसेच त्यांना अशा स्थानांविषयी कोणताही आदर नाही. त्यांचा पक्ष राममंदिराच्या निर्मितीला विरोध करतो. आता आपल्यावर कारवाई होऊ नये म्हणून ज्योतिषांच्या सांगण्यावरून ते मंदिरांना भेटी देत आहेत.
प्रियांकाला १० पैकी १० गुण
नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ दोन जागा मिळाल्या. यावेळी प्रियांका यांच्याकडे प्रचाराची सूत्रे होती. त्यांच्या कामगिरीबद्दल विचारले असता वद्रा म्हणाले की, मी तिला १० पैकी १० गुण देईन. तिने अहोरात्र काम केले. आम्ही जनादेश स्वीकारतो आणि पूर्ण ताकदीने जनतेची सेवा सुरु ठेवतो. इव्हीएमबद्दल लोकांच्या मनातील शंका दूर झाल्या तर देशात निवडणुकांचे निकाल पूर्णपणे वेगळे लागतील, असे विधानही त्यांनी केले.
महाकाल मंदिरास भेट
वद्रा यांनी महाकाल मंदिरात दर्शन घेतल्यानंतर भाजपवर टीका केले. भाजपने विकासासाठी काहीच केले नसल्याचा आरोप करून ते म्हणाले की, आमच्या सरकारने केलेल्या कामामुळे मध्य प्रदेशात बदल झाला आहे. आमच्या सरकारने चांगले काम केले, पण भाजप सरकारने काहीही केलेले नाही. महाकाल मंदिर परिसरातील सुविधांचा आणखी विकास करण्याची गरज असल्याचे मत त्याने व्यक्त केले. येथे प्रार्थना केल्यानंतर शांतता लाभली. कुटुंब आणि जनतेसाठी आशीर्वाद मागितले, असेही त्यांनी नमूद केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.