मुंबई : १ ऑक्टोबरपासून दिल्लीत मोफत वीज मिळणे बंद होईल. जो मागेल त्यालाच सबसिडी दिली जाईल, अशी माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दूरचित्रसंवादाद्वारे (video conferencing) दिली.
ग्राहकांना सबसिडी हवी आहे का असे विचारले जाईल. जे ग्राहक सबसिडीचा पर्याय निवडतील त्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल, असे केजरीवाल यांनी सांगितले.
दिल्लीत नागरिकांना मोफत वीज मिळावी यासाठी सरकार सबसिडी देते; मात्र अनेक नागरिकांनी केजरीवाल यांना कळवले की, ते वीज देयक भरण्यासाठी सक्षम आहेत. त्यामुळे त्यांना मोफत वीज नको आहे. त्यामुळे १ ऑक्टोबरपासून ग्राहकांना विचारले जाणार आहे की, त्यांना मोफत वीज हवी आहे का. जे ग्राहक सबसिडीची मागणी करतील त्यांनाच सबसिडी दिली जाणार आहे.
भरल्या जाणाऱ्या वीज देयकांची रक्कम शाळा, रुग्णालये बनवण्यासाठी वापरावी अशी लोकेच्छा असल्यामुळे केजरीवाल यांनी हा निर्णय घेतला आहे. यापुढे ग्राहकांना सबसिडी हवी की नको यासाठी पर्याय दिले जाणार आहेत.
सध्या दिल्लीतील वीज ग्राहकांना २०० युनिटपर्यंतची वीज मोफत मिळते. तसेच दर महिन्याला २०१ ते ४०० युनिट वीजेवर ८०० रुपये सबसिडी मिळते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.