नवी दिल्ली- Assembly Election 2021 पश्चिम बंगालसह 5 राज्यांच्या निवडणूक प्रचारात सहभागी झालेल्या लोकांच्या तोंडावर मास्क नसल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला नोटीस पाठवली आहे. उच्च न्यायालयाने निवडणूक प्रचारादरम्यानही मास्कच्या सक्तीकरणावरुन उत्तर मागितले आहे. प्रचारादरम्यान लोक विनामास्क का दिसत आहे, असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला आहे. निवडणूक आयोगाने आपल्या वेबसाइट, मोबाइल ऍप्स, इतर प्लॅटफॉर्म्स आणि साहित्यांवर निवडणुकीच्या दरम्यान नियमावलीबाबत माहिती दिली पाहिजे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. त्याचबरोबर निवडणूक आयोगाच्या डिजिटल, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातून निवडणुकीत कोविड-19 नियमावलीबाबत जागरुकता निर्माण करण्याचा आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे.
थिंक टँक सेंटर फॉर अकाऊंटेबिलिटी अँड सिस्टिमेटिक चेंजचे अध्यक्ष विक्रम सिंह यांनी ही याचिका दाखल केली होती. विक्रम सिंह उत्तर प्रदेश पोलिसमध्ये महासंचालक होते. पश्चिम बंगाल शिवाय आसाम, तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि केरळमध्येही निवडणुका होत आहेत. चार राज्यांमध्ये मतदान झाले आहे. तर पश्चिम बंगालमध्ये 10 एपिलला चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे. राज्यात एकूण 8 टप्प्यात मतदान होणार आहे. विक्रम सिंह यांनी निवडणूक प्रचारात सर्व नियम धाब्यांवर बसवले जात असल्याचे आपल्या अर्जात म्हटले होते.
एकीकडे देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. तर पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये रोड शो आणि रॅली काढल्या जात आहेत, असे अर्जात म्हटले होते. या अर्जात सामान्य नागरिकांवर कोरोना नियमावलीची सक्ती केली जाते आणि राजकीय नेत्यांना यात सूट दिली जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. सामान्य नागरिक आणि नेत्यांमध्ये हा भेदभाव घटनेतील अनुच्छेद 14 च्या भावनेविरोधात असल्याचेही विक्रम सिंह यांनी आपल्या अर्जात म्हटले आहे.
हेही वाचा- EVM वाहतुकीसाठी गाढवांची मदत
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.