
आसाममध्ये २५ लाख नागरिकांना पुराचा फटका
गुवाहाटी - आसाममध्ये बहुतांश भागात बुधवारी पूरस्थिती कायम असून गेल्या चोवीस तासात आणखी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत २४.९२ लाख नागरिकांना पुराचा फटका बसला आहे.
विशेषत:कछारच्या सिल्चर शहरातील बहुतांश भागात दहा दिवसांपेक्षा अधिक काळापासून पाणी साचलेले आहे. गेल्या चोवीस तासात कछारमध्ये तीन आणि मोरीगाव व धुबरी येथे प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. यानुसार राज्यात यावर्षी पुरामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या १३९ वर पोचली आहे. दरम्यान, हवामान खात्याने कोक्राझार, चिरांग, बक्सा येथे रेड ॲलर्ट जारी केला आहे तर धुब्री, बारपेटा, बोंगाईगॉंव, उडलगुरी, बिस्वनाथ, लखिमपूरी, धेमजी आणि दिब्रुगड येथे ‘ऑरेंज ॲलर्ट’ दिला आहे.
याशिवाय दक्षिण सालमारा, कोक्राझार, चिरांग आणि बस्का जिल्ह्यांत गुरुवारपर्यंत ‘ऑरेंज ॲलर्ट’ जारी केला आहे. आसामच्या आपत्ती व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या चोवीस तासांत २८ जिल्ह्यात २४.९२ लाख लोकांना पुराचा फटका बसला. तत्पूर्वी ही संख्या २१.५२ लाखांवर होती. ब्रह्मपुत्रा, बेकी, कोपिली, बराक आणि कुशियारा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. दुसरीकडे अन्य नद्यांची पातळी मात्र घसरत आहे. पूरामुळे विविध ठिकाणी झालेल्या भूस्खलनामुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय तीन जण बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे.
Web Title: Floods Hit 25 Lakh People In Assam
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..