भुवनेश्वर - ओडिशातील पूरग्रस्त जिल्ह्यांचा आढावा मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी बुधवारी घेतला. पुराचा फटका बसलेल्यांना आणखी सात दिवस सानुग्रह अनुदान देण्याचे त्यांनी जाहीर केले. भोलनगिरी, कलहंडी, बौध, सुवर्णपूर आणि कंधमाल या जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडला असून, पुराने मोठे नुकसान झाले आहे.
पूरग्रस्त भागात प्रत्येक प्रौढाला 60 रुपये आणि प्रत्येक मुलाला 54 रुपये दररोज देण्याचे नियोजन पटनाईक यांनी केल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली. संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी पटनाईक यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे चर्चा करून मदतीबाबत विचारणा केली. महानदीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने तिला व तिच्या उपनद्यांना मध्यम स्वरूपाचा पूर आला आहे.
त्यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थिती योग्य प्रकारे हाताळण्यासाठी तयारी करण्याचे आवाहन विशेष मदत आयुक्त विष्णूपद सेठी यांनी केले आहे. पावसामुळे राज्यातील रेल्वेसेवा विस्कळित झाले आहे.
|