नवी दिल्ली : अर्थव्यवस्थेतील मरगळ दूर करण्यासाठी गुंतवणुकीसोबतच निर्यातवृद्धी आवश्यक असताना आंतरराष्ट्रीय बाजारात भारताची निर्यातही कमी झाली आहे. वाणिज्य मंत्रालयाशी संबंधित संसदीय स्थायी समितीने या घटलेल्या निर्यातीवरून सरकारी धोरणातील त्रुटींवर बोट ठेवताना निर्यात वाढविण्यासाठी नवे बाजार शोधण्याच्या कानपिचक्याही सरकारला दिल्या आहेत.
राज्यसभा खासदार विजय साई रेड्डी अध्यक्ष असलेल्या वाणिज्य मंत्रालयाशी संबंधित संसदीय स्थायी समितीने सरकारच्या निर्यात धोरणांबाबत शिफारशी असलेला अहवाल राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांना आज ऑनलाइन सादर केला. निर्यातीमध्ये भारताची भागीदारी आधीच कमी असताना कोरोना आणि लॉकडाउन यामुळे निर्यातीत आणखी संकोच झाला आहे. त्यापार्श्वभूमीवर समितीने निर्यात वाढविण्यासाठी सरकारला उपाययोजना सुचविल्या आहेत. भारताने नवे बाजार शोधण्याबरोबरच नवी उत्पादने आणि मूल्यवर्धित सेवांवरही भर देण्याची आवश्यकता असल्याचे समितीने म्हटले आहे. अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी निर्यात वाढवावी लागेल.
कॉरिडॉर पूर्ण करा
संसदीय समितीने मालवाहतूक गाड्यांचा वेग वाढविणे, दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्टा (कॉरिडार) पूर्ण करणे, विशेष आर्थिक क्षेत्रांमध्ये सोईसुविधा वाढविणे यासारख्या शिफारशी केल्या. यासोबतच स्थानिक उत्पादनांसाठी बाजारपेठ शोधून निर्यात करणे शक्य असून यासाठी काश्मीरमधील सफरचंद व अन्य फळे, ईशान्य भारतातील फलोत्पादन आणि अन्य कृषी उत्पादने, सोलापूरमधून वस्त्र, आदींच्या निर्यातीवर सरकारने लक्ष द्यावे, असे म्हटले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.