नवी दिल्ली : चीनने पूर्व लडाखमध्ये संघर्षाच्या उरलेल्या चौक्यांवरून सैन्य लवकर माघारी घ्यावे अशी आग्रही मागणी भारताकडून करण्यात आली. रविवारी लष्करी पातळीवर चर्चेची १३वी फेरी झाली.
यासंदर्भात कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आले नाही, मात्र चीनच्या हद्दीतील चुशूल-मोल्डो सीमा चौकीवर सुमारे साडेआठ तास चर्चा चालली. सकाळी साडे दहा वाजता सुरु झालेली चर्चा सायंकाळी सात वाजता संपली. दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीनंतर ही फेरी झाली. याआधीच्या फेरीनंतर गोग्रा येथून (गस्त चौकी क्रमांक १७ अ) सैन्य मागे घेण्यात आले होते.
कॉर्प्स कमांडर पातळीवरील चर्चेत ठप्प झालेली सैन्यमाघारीची प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यावर भर होता. १५व्या क्रमांकाच्या गस्त चौकीवर अजूनही उभय देशांचे सैन्य आहे. देस्पांगसह संघर्षाच्या सर्व चौक्यांवरून सैन्य माघारी घेतले जाणे उभय देशांतील एकूण संबंध सुधारण्यासाठी आवश्यक आहे, अशी भारताची भूमिका आहे.
संघर्षाची पार्श्वभूमी
चीनने उत्तराखंड विभागातील बाराहोती आणि अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे घुसखोरीचा प्रयत्न नुकताच केला. तवांग विभागातील यांगत्सेजवळ सुमारे दहा दिवसांपूर्वी दोन्ही देशांचे सैनिक आमनेसामने आले. प्रचलित शिष्टाचारानुसार दोन्ही बाजूंच्या कमांडरमध्ये चर्चा झाल्यानंतर काही तासांनी तणाव निवळला. सीमा रेषेवरील संवेदनशील ठिकाणी दोन्ही देशांचे प्रत्येकी सुमारे ५० ते ६० हजार सैनिक आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.