
कोरोना रुग्णवाढीत भारताला दिलासा, चिंता मात्र कायम!
भारतात कोरोना महामारीची दुसरी लाट ओसरत असल्याचं काहीसं चित्र दिसत आहे. मागील दोन दिवसांपासून दररोज आढळणाऱ्या नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत थोड्या प्रमाणात घट दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वी दररोज वाढणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या 4 लाखांच्या पुढे गेली होती. मात्र, तेथून कोरोना वाढीचा वेग मंदावल्याचं चित्र आहे. सोमवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार, मागील 24 तासांत तीन लाख 68 हजार 147 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर तीन हजार 417 जणांचा मृत्यू झालाय. याच कालावधीत तीन लाख 732 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
शनिवारी देशात तीन लाख 92 हजार कोरोना रुग्ण आढळले होते. तर तीन हजार 689 जणांचा मृत्यू झाला होता. शुक्रवारी देशात 4 लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळले होते. या तुलनेत आजची आकडेवारी दिलासादायक दिसत आहे. मात्र, कोरोना रुग्णांच्या दिवसागणिक वाढणाऱ्या संख्येत घट होत असली तरी चिंता कायम आहे. कोरोना लसीचे डोस घेतल्यानंतरही काळजी घ्यावी लागणार आहे. मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावेत.
हेही वाचा: कोरोना संकटात केंद्र सरकारला मोठा दिलासा
दोन दिवसांतील रुग्णवाढीचा वेग मंदावला असला तरी धोका कायम आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सोमवारी दिलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दोन कोटींच्या जवळ गेली आहे. देशात सध्या एक कोटी 99 लाख 25 हजार 604 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद आहे. आतापर्यंत एक कोटी 62 लाख 93 हजार जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर दोन लाख 18 हजार 959 जणांचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, देशात सद्या 34 लाख 13 हजार 642 कोरोना रुग्ण उपचाराधीन आहेत.
Web Title: India Coronavirus Update Union Health Ministry Active Cases Death
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..