स्टार्टअपमध्ये जगात भारताचा डंका; प्रतिदिन ८० स्टार्टअपची नोंदणी

प्रतिदिन नोंदणीचा सर्वाधिक वेग ; एकूण संख्या ७५ हजारांवर
india top business Startup Registration of 80 startups delhi
india top business Startup Registration of 80 startups delhisakal

नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांपासून भारतामध्ये स्टार्टअप हा चर्चेचा विषय बनला आहे. नावीन्यता आणि उद्योजकतेतून भारत आपली प्रगती साधत आहे. देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना देशातील स्टार्टअपची संख्या ७५ हजारांवर पोचण्याचा दुग्धशर्करा योगही जुळून आला आहे. दररोज नोंदणी होणाऱ्या स्टार्टअपची संख्याही जगात भारतात सर्वाधिक असून देशात सध्या प्रतिदिन ८० स्टार्टअपची नोंदणी होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ मध्ये स्वातंत्र्यदिनादिवशी लाल किल्ल्यावरील भाषणादरम्यान आपल्या नागरिकांच्या उद्योजकीय क्षमतेचा वापर करणाऱ्या नवभारताची कल्पना केली होती. त्यानंतर, देशात स्टार्टअप तसेच नवकल्पनांना खतपाणी घालण्यासाठी अनुकूल वातावरण तयार केले जात असून त्यासाठीचा कृती आराखडा तयार करण्यासाठीचा कार्यक्रमही हाती घेण्यात आला.

गेल्या सहा वर्षांमध्ये या कृती आराखड्यामुळे अनेक जणांना यशस्वी स्टार्टअपची उभारणी करता आली. तसेच भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची स्टार्टअप परिसंस्था ठरण्यासाठीही कृती आराखड्याचा उपयोग झाला. देशात सुरुवातीच्या दहा हजार स्टार्टअप्ससाठी ८०८ दिवसांचा कालावधी लागला. मात्र, शेवटचे दहा हजार स्टार्टअप अवघ्या १५६ दिवसांत नोंदविले गेले. यावरून स्टार्टअपच्या वाढीचा वेग लक्षात येतो. सध्या दररोज ८० स्टार्टअपची नोंदणी होत आहे. केंद्र सरकारने २०१६ मध्ये स्टार्टअपसाठी अनुकूल वातावरण तयार करण्यासाठी कार्यक्रम आखला. त्यामुळे, देशातील नवउद्योजकांसाठी व्यासपीठ उपलब्ध झाले. सरकारकडून निधी, कर सवलत, बौद्धिक संपदा हक्कांसाठी तसेच आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांपर्यंत पोचण्यासाठी मदत आदीप्रकारे साहाय्य करण्यात आले.

केंद्र सरकारकडून १ एप्रिल २०२१ पासून ‘स्टार्टअप भारत बीजनिधी योजना’ सुरू करण्यात आली. या योजनेतून मान्यताप्राप्त स्टार्टअप संकल्पनांचा पाठपुरावा, उत्पादनांच्या चाचण्या, व्यावसायीकरण आदींसाठी आर्थिक मदत करण्यात येते. त्यामुळे स्टार्टअप गुंतवणूक आकर्षित करण्यात किंवा बॅंकांकडून कर्ज घेण्यात सक्षम होत आहेत. देशाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाकडून स्टार्टअपना मान्यता दिली जाते.

टियर दोन व तीन शहरांचे योगदान

स्टार्टअपमुळे रोजगारनिर्मितीलाही मोठा हातभार लागत असून सुमारे साडेसात लाख रोजगार तयार झाले आहेत. गेल्या सहा वर्षांमध्ये रोजगारात दरवर्षी ११० टक्क्यांनी वाढ होत आहे. एकूण स्टार्टपैकी जवळपास निम्मे म्हणजे ४९ टक्के स्टार्टअप देशातील टियर दोन व टियर तीन शहरांतील आहेत. त्यातून, भारतीय युवकांची क्षमता केवळ महानगरांपुरतीच मर्यादित नसल्याचे सिद्ध झाले आहे.

राज्यात स्वातंत्र्यदिनापासून स्टार्टअप व नाविन्यता यात्रा

मुंबई : तरुणांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता विभागामार्फत राज्यात १५ ऑगस्टपासून महाराष्ट्र स्टार्टअप आणि नावीन्यता यात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी राज्यातील सहा विभागांमध्ये जनजागृती केली जाणार असून नवसंकल्पना घेऊन येणाऱ्या युवक-युवतींना प्रशिक्षण, तसेच त्यांच्या संकल्पनांचे सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे. उत्तम संकल्पना सादर करणाऱ्या १३४ युवकांना दहा हजार रुपयांपासून एक लाख रुपयांपर्यंतची पारितोषिकेही दिली जाणार असल्याची माहिती मुख्य सचिव मनीषा वर्मा यांनी दिली.स्टार्टअप आणि नावीन्यता यात्रेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतून, तर नागपूरहून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिरवा झेंडा दाखवतील. त्याचबरोबर अमरावती, औरंगाबाद, नाशिक आणि पुणे येथूनही यात्रेचा स्वातंत्र्यदिनी प्रारंभ होणार आहे. तळागाळातील व ग्रामीण दुर्गम भागातील नवउद्योजकांचा आणि नावीन्यपूर्ण कल्पनांचा शोध घेणे, नवउद्योजकांना प्रोत्साहन, तज्ज्ञ मार्गदर्शन, निधी आणि आवश्यक पाठबळ पुरविणे, तसेच राज्याची उद्योजकता व नावीन्यपूर्ण परिसंस्था बळकट करणे असा या स्टार्टअप यात्रेचा उद्देश आहे, असे वर्मा यांनी सांगितले.

लाखाचे बक्षिसे कृषी, शिक्षण, आरोग्य, शाश्वत विकास, स्मार्ट पायाभूत सुविधा आणि गतिशीलता, ई-प्रशासन आणि इतर अशा विषयातील नवनवीन संकल्पना, स्टार्टअपना पारितोषिके दिली जाणार आहेत. राज्यस्तरावर एकूण २६ विजेत्यांची निवड केली जाईल. जिल्हापातळीवरही तीन विजेत्यांची निवड केली जाईल. विभागस्तरावर सहा सर्वोत्कृष्ट नवउद्योजक आणि सहा सर्वोत्कृष्ट महिला उद्योजिका यांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाईल.

स्टार्ट अप्सची घौडदौड

  • ७५ हजार एकूण संख्या

  • ८० प्रतिदिन नोंदणी साडेसात लाख रोजगारनिर्मिती

  • माहिती - तंत्रज्ञानातील स्टार्टअप १२%

  • आरोग्य ९%

  • शिक्षण ७%

  • कृषी ५%

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com