नवी दिल्ली - काश्मिरी युवकांचा दहशतवादाकडील ओढा चिंताजनक असल्याचे नमूद करताना लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी चुकीच्या प्रचाराद्वारे स्थानिक युवकांना प्रभावित करून शस्त्रे हाती घ्यायला लावणाऱ्यांना वैयक्तिक पातळीऐवजी गटांनुसार लक्ष्य केले जाईल, असा इशारा लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी दिला.
जनरल रावत यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत काश्मीरमधील दहशतवादविरोधी रणनीतीमध्ये बदल करण्यासंबंधीच्या योजनेवर आपले मत मांडले आणि काश्मिरी युवक दहशतवादाकडे ओढले जाणे ही परिस्थिती चांगली नसल्याचे स्पष्ट केले. काश्मिरमधील दहशतवाद हाताळण्याचा अनुभव असलेले जनरल रावत म्हणाले, की स्थानिक युवक नक्षलवादामुळे नव्हे, तर नुकसानीच्या भावनेच्या अभावातून दहशतवादाकडे ओढले जात आहेत. 1980च्या दशकापासून पाकिस्तानच्या पाठिंब्याने हे सर्व सुरू आहे.
खोटा प्रचार आणि ईशान्य भागात होत असलेल्या विकासाचा काही स्थानिक युवकांवर मोठा परिणाम झाला आहे आणि त्यामुळेच जास्तीत जास्त शिक्षित युवक दहशतवादाकडे ओढला जात असल्याच्या मुद्यावर त्यांनी जोर दिला. स्थानिक युवक बंडखोरीत सहभागी होतो अणि बंदूक उचलतो, हा विषय गंभीर आहे. कारण आपले स्वत:चे देशबांधव बंडखोरीत सहभागी होतात ही काही चांगली परिस्थिती नाही, असेही जनरल रावत म्हणाले.
लष्करप्रमुखांनी घेतला सुरक्षेचा आढावा
लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गुरुवारी प्रथमच जम्मू-काश्मीरचा दौरा करताना उधमपूर तळाला भेट दिली आणि सुरक्षा स्थितीचा, तसेच दलाच्या तयारींचा आढावा घेतला. जनरल रावत अखनूर आणि राजौरी सेक्टरलाही भेट देऊन तेथील जवानांशी चर्चा करण्याची शक्यता आहे.
|