Kargil Vijay Diwas : उणे ४० डिग्री तापमान, पाक सैनिकावर झेप घेतली अन्...; बारामतीच्या जवानाचा लढा

दोन रात्री बर्फातून चालून '०.४७०० चौकी'चा पायथा गाठला. पहाटे उंचावरच्या चौकीवर तीन बाजूंनी हल्लाबोल केला आणि पाकिस्तान्यांकडून चौकी ताब्यात घेऊन तिरंगा फडकविला...’’
Kargil Vijay Diwas story of jawan Minus 40 degree temperature commander jumps on Pak soldier capturing outpost from the Pakistanis
Kargil Vijay Diwas story of jawan Minus 40 degree temperature commander jumps on Pak soldier capturing outpost from the Pakistanis sakal

सोमेश्वरनगर : ‘‘सर्वत्र बर्फच बर्फ... तापमान उणे चाळीस... चार पावलात धाप लागावी एवढाच ऑक्सिजन अशात हातात एके-४७ आणि पाठीवर सोळा किलो दारूगोळा घेऊन मोहिमेवर निघालेलो. अचानक बारा जणांच्या बंकरवर शत्रूकडून बाँब वर्षाव झाला आणि क्षणात डोळ्यासमोर नऊ देह अक्षरशः विखरून पडले. दोघं बचावलो एक जबर जखमी झाला. व्याकुळलो पण खचलो नाही. दोन रात्री बर्फातून चालून '०.४७०० चौकी'चा पायथा गाठला. पहाटे उंचावरच्या चौकीवर तीन बाजूंनी हल्लाबोल केला आणि पाकिस्तान्यांकडून चौकी ताब्यात घेऊन तिरंगा फडकविला...’’

तेवीस वर्षांपूर्वीचा अंगावर सरसरून काटा उभा राहील असा कारगिल युद्धाचा स्वानुभव सांगताना करंजे (ता. बारामती) येथील बाळकृष्ण रासकर यांच्या डोळ्यांच्या कडा आपोआप पाणावल्या. करंजे गावातील माळवाडी वस्तीवरील गणपत शिंदे हे बांगलादेश मुक्ती युद्धात सहभागी झालेले जवान बाळकृष्ण यांचे आदर्श. आठवीतून शाळा सोडून रोजगार हमीवर राबले. वय अठरा पूर्ण होताच भरती आणि बेळगावचे मराठा लाइट इन्फन्ट्रीचे प्रशिक्षण त्यांनी सहज पार केले. सेवेदरम्यान १९९९मध्ये कुपवाडा येथे ब्राव्हो मराठा कंपनीत कार्यरत होते. तेव्हा पाकिस्तानने भाडेतत्वावरील सैनिकांसह कारगिलवर कब्जा केला. 'ब्राव्हो मराठा' कंपनीस बोलावणे आले. ब्राव्होच्या फोर्थ प्लाटूनच्या तीस जणांच्या तुकडीस ०.४७०० या चौकीचे टार्गेट दिले.

रासकर म्हणाले, ‘‘टायगर हिलपासून चार किलोमीटरवर आम्ही वेगवेगळ्या बंकरमध्ये होते. सकाळच्या उजेडात बाहेर डोकावताच आमच्या बंकरवर हिलवरून बाँब वर्षाव झाला. क्षणात नऊ जण गेले. बंकरमधील मी व पंढरपूरचा शंकर यादव दोघेच जगलो. फोंडवाडा (ता. बारामती) येथील संतोष पिसाळ यांचे पोट फाटले होते. त्यांचे आतडे बोटाने आत सारून पट्टी मारली. उपचारांनंतर ते बचावले. नवे नऊ जण येऊन मिळाले आणि पुन्हा बळ बांधून रात्रीच्या वेळी चढाई सुरू केली. अजिबात आवाज न करता इशाऱ्यांनीच बोलत दोन रात्री चालून टार्गेटच्या पायथ्याशी पोचलो. मी व अन्य दोघांनी एलएमजीमधून पाऊण तास गोळ्यांचा वर्षाव चालू ठेवला. तोपर्यंत कंपनी कमांडर राजेश बिश्त यांच्या नेतृत्वाखाली तीन बाजूंनी तीन तुकड्या वर निघाल्या. कमांडरने पिस्तूल फायर करताच आमचा गोळीवर्षाव थांबला. तीन-चार शत्रूसैन्य पळून गेले. कमांडरने अचानक झेप घेत चौकी सांभाळणाऱ्या एका हवालदाराचे मुंडके कुकरीने छाटले. त्याच्याकडे पाकिस्तानचे पुरावेही सापडले. तिरंगा फडकावून लगेच टायगर हिलकडे कूच केले. आम्ही पोचेपर्यंत तिथेही तिरंगा फडकला होता. छाती अभिमानाने फुलून आली होती.

शांती सैन्यातही सेवा

श्रीलंकेत शांती सैन्यात ‘ऑपरेशन पवन’मध्ये दोन वर्ष सेवा केली. एलटीटीईच्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यात दैव बलवत्तर म्हणून समोरून आलेली गोळी हाताला जखम करून गेली. पंजाबमध्येही ‘ऑपरेशन रक्षक’मध्ये सहा महिने सेवा बजावली. ग्लेशर भारात उणे चाळीस तापमानात दोन वर्ष काम केले. हेच अनुभव कारगिलच्या ऑपरेशन विजयमध्ये उपयोगी आले, असे बाळकृष्ण रासकर सांगतात. कारगिल युध्दावेळी कमांडरच्या विरश्रीपूर्ण भाषणाने आणि पत्नीकडून आलेल्या पत्रानेही बळ वाढल्याचे सांगतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com