नवी दिल्ली : जलप्रलयामुळे उद्ध्वस्त झालेल्या केरळच्या मदतीसाठी विविध देशांकडून मदतीचा ओघ सुरू झाला असून, भारत सरकारने आभार व्यक्त करत नम्रपणे मदत नाकारली आहे.
यूनायटेड अरब अमिरातने (यूएई) देऊ केलेल्या 700 कोटी रुपयांच्या मदतनिधीला भारत सरकारने अत्यंत विनम्रतेने नकार दिला आहे. देशाअंतर्गत संकटांना आपणच तोंड देत, त्यातून बाहेर पडायचे, असे भारत सरकारचे असं धोरण आहे. या धोरणानुसार केंद्र सरकारने केरळ सरकारला परदेशी मदतीसाठी विनम्र नकार कळवण्यास सांगितले आहे.
केरळमधील अनेकजण नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने यूएईमध्ये वास्तव्यास आहेत. यूएईमध्ये जवळपास 30 लाख भारतीय असून, त्यापैकी 80 टक्के केरळवासीय आहेत. अमिरातीच्या विकासात केरळी नागरिकांचे योगदान लक्षात घेता यूएई सरकारने केरळसाठी 700 कोटी रुपयांचा मदतनिधी देऊ केला होता.
केरळमधील पुरात आतापर्यंत 400 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून, 14 लाखांहून अधिक जण बेघर झाले आहेत. शिवाय, कित्येकजण अद्याप बेपत्ता आहेत. केरळमधील पाऊस कमी झाला असून, पूर ओसरु लागला आहे. जनजीवन सुरळीत करण्याचे मोठे आव्हान केरळ सरकारसमोर आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक पार पडली. त्यात केंद्राकडे 2600 कोटी रुपयांचे विशेष पॅकेज मागण्याचा निर्णय झाला आहे.
केंद्र सरकारने केरळला 500 कोटींच्या मदतनिधीची घोषणा केली, तसेच विविध राज्यांनीही मदतनिधी दिला आहे. महाराष्ट्राने 20 कोटी रुपये दिले असून, 110 डॉक्टरांच्या टीमसोबत स्वत: वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन केरळच्या मदतीसाठी गेले आहेत. दिल्ली सरकारने 10 कोटी, तेलंगणा 25 कोटी, आंध्र प्रदेश 10 कोटी आणि पंजाब सरकारने केरळला 10 कोटींचे अर्थसहाय्य जाहीर केले असून, तातडीने ही रक्कम देण्यात येणार आहे.
केरळला मदतीसाठी कलाकारांचा मदतीचा हात
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.