तिरुअनंतपूरम (केरळ) : केरळमधील सरकार आणि राज्यपाल यांच्यातील मतभेद आज, अक्षरशः चव्हाट्यावर आले. विधानसभेत राज्यपालांचे भाषण सुरू असताना, सत्ताधारी आमदांनी अभूतपूर्व गोंधळ घातला. या गोंधळातच राज्यपालांनी आपले भाषण पूर्ण केले. विशेष म्हणजे, नागरिकत्व सुधारणा कायद्याचे समर्थन करणारे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी सरकारचा सन्मान राखत, कायद्याच्या विरोधात भाषण केलं. याच केरळमध्ये सरकारनं नागरिकत्व सुधारणा कायदा अर्थात सीएएच्या विरोधात प्रस्तावाला मंजुरी दिली होती.
काय घडले?
देशभरात नागरिकत्व सुधारणा कायद्याला रस्त्यावर विरोध होत आहे. पण, आज, हा विरोध केरळच्या विधानसभेत पहायला मिळलाा. मुळात केरळमधील पी. विजयन सरकार आणि राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्यात प्रचंड मतभेद आहेत. हे मतभेद आज, अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या निमित्तानं अक्षरशः चव्हाट्यावर आले. केरळमध्ये आज अर्थसंकल्पी अधिवेशनाचा पहिला दिवस होता. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाची सुरुवातच खळबळजनक झाली. अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने झाली. पण, हे भाषण पूर्णपणे गोंधळात झालं. राज्यपाल आरिफ खान यांच्या आगमनापासूनच विधानसभेत गोंधळ सुरू झाला होता. सीएए रद्द करा, राज्यपाल गो बॅक, अशा आशयाची घोषणाबाजी सुरू झाली होती. त्या गोंधळातूनच वाट काढत राज्यपाल आपल्या आसनावर पोहोचले.
काय म्हणाले राज्यपाल?
राज्यपाल आरीफ खान यांनी यापूर्वी नागरिकत्व सुधारणा कायद्याचं समर्थन केलंय. पण, त्यांनी आपल्या भाषणात कायद्याच्या विरोधात मत मांडलं. त्यावेळी त्यांनी या संदर्भात स्पष्टीकरणही दिलंय. ते म्हणाले, 'मी हा सीएए कायद्याच्या विरोधातील पॅरा वाचत आहे. कारण, सरकारचा हा दृष्टीकोन आहे. मुख्यमंत्र्यांची ही इच्छा आहे की मी हे वाचावं. हे योग्य नाही. पण, मी त्यांचा सन्मान राखण्यासाठी हे वाचत आहे.'
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.