नवी दिल्ली: ‘‘अपहरण करणाऱ्यांनी अपह्रत व्यक्तीला योग्य वागणूक दिली असेल तिच्यावर हल्ला केला नसेल किंवा तिला जीवे मारण्याची धमकीही दिली नसेल तर अपहरणकर्त्यांना भारतीय दंडविधान संहितेच्या ‘कलम-३६४ अ’ नुसार जन्मठेपेची शिक्षा ठोठावता येत नाही.’’ असे मत सर्वोच्च न्यायालयाने आज मांडले. न्या. अशोक भूषण आणि न्या. आर. सुभाष रेड्डी यांच्या खंडपीठासमोर आज याप्रकरणी सुनावणी पार पडली. तेलंगणमधील एका ऑटो चालकाने एका बालकाचे दोन लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण केले होते, याप्रकरणी संबंधित ऑटो चालकाविरोधात खटला भरण्यात आला होता तसेच त्याला उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षाही ठोठावली होती.
एखाद्या आरोपीला ‘कलम-३६४ अ’ अन्वये दोषी ठरविताना तीन घटकांची पूर्तता करणे आवश्यक असते. यामध्ये संबंधित अपहरणकर्त्यांनी अपह्रत व्यक्तीला जीवे मारण्यासाठी धमकावले असल्याचे किंवा सरकार, परकी देश, सरकारी संस्था अथवा एखाद्या व्यक्तीकडून खंडणी वसूल करण्यासाठी त्या व्यक्तीला इजा पोचविली असल्याचे निष्पन्न झाले असेल तरच तिला शिक्षा ठोठावली जाऊ शकते.’’ असे न्यायालयाने म्हटले आहे.
तेलंगणमधील स्थानिक रहिवासी असणाऱ्या शेख अहमदने याप्रकरणी तेलंगण उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांना सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिले होते. या प्रकरणामध्ये उच्च न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. दरम्यान अपहरण झालेल्या तेरा वर्षांच्या मुलाने अहमदने आपल्याला कधीही जिवे मारण्याची धमकी दिली नव्हती, अशी कबुली पोलिसांना दिली होती. सर्वोच्च न्यायालयाने याची गांभीर्याने दखल घेताना उच्च न्यायालयाचे आदेश बाजूला ठेवले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.