उच्च माध्यमिक स्तरावरील प्रस्तावित अन्यायकारक संचमान्यता निकषांविरोधात श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर आणि महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या वतीने पुण्यात शिक्षण संचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. प्रस्तावित निकषांमुळे राज्यातील आठ ते दहा हजार शिक्षक अतिरिक्त होण्याची शक्यता असून अनेक पूर्णवेळ शिक्षक अर्धवेळ होण्याचा धोका असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला. प्रस्तावित मसुद्यात ४५ मिनिटांची तासिका ४० मिनिटांची करणे, विज्ञान शाखेतील एका तुकडीची विद्यार्थीसंख्या २० वरून ३० करणे तसेच कला आणि वाणिज्य शाखांसाठी १२० विद्यार्थीसंख्येचा निकष सुचविण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षकांची पदे अतिरिक्त ठरण्याची भीती व्यक्त करण्यात आली. संचमान्यतेचा वस्तुनिष्ठ फेरआढावा घेऊन प्रचलित निकषांनुसार पारदर्शक प्रक्रिया राबवावी, अशी मागणी करण्यात आली. शिक्षकांची सेवासुरक्षा आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आणणारे अन्यायकारक निकष तातडीने रद्द करावेत, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला.