रखरखत्या उन्हात पायपीट, भूकबळी, मजुरांचा मृत्यू अन् लॉकडाऊनचा काळ

lockdown completed six month
lockdown completed six month

नवी दिल्ली - देशभरात कोरोनाने हातपाय पसरवायला सुरुवात केली. कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या २४ मार्चला लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्यानंतर २५ मार्च ते १४ एप्रिलपर्यंत पहिल्या टप्प्यातील लॉकडाऊन लागू झाले आणि संपूर्ण देशातील जनता घरात कोंडली गेली. या लॉकडाऊनला आज सहा महिने पूर्ण झाले आहेत. लॉकडाऊनमुळे कोरोनाची साखळी तोडता येईल, हा केंद्र सरकारचा विश्वास फोल ठरल्याचे पाहायला मिळत आहे. कारण, सहा महिन्यानंतर कोरोनाचा संसर्ग कमी न होता उलट आलेख वाढतच आहे.

जनता कर्फ्यु  -

देशात ३० जानेवारीला केरळमध्ये पहिला कोरोनाचा रुग्ण आढळून आला. त्यानंतर हळूहळू कोरोनाबाधितांची आकडेवारी वाढत गेली. जवळपास ५०० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर केंद्र सरकारने २२ मार्चला जनता कर्फ्यू घोषित केला. पण, जनतेला हे माहिती नव्हते की यानंतरचे २१ दिवस आपल्याला घरातच राहावे लागणार आहे. जनता कर्फ्युच्या दिवशी टाळ्या-थाळ्या वाजविण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. काहींनी हा जनता कर्फ्यु उत्सव म्हणून साजरा केला. त्यानंतर त्याचे वाईट परिणाम दिसायला सुरुवात झाली आणि पाहता पाहता कोरोनाचा आकडा वाढला.

लॉकडाऊनचा पहिला टप्पा -

केंद्र सरकारने २४ मार्चच्या रात्री २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. २५ मार्च ते १४ एप्रिल असा लॉकडाऊनचा पहिला टप्पा होता. सर्व कामकाज, वाहतूक सर्वकाही ठप्प झाले. या काळात जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी नागरिक मात्र गर्दी करू लागले. लॉकडाऊनचा पहिला टप्पा संपत नाहीतर महाराष्ट्र, केरळ, कर्नाटकसह इतर राज्यांनी लॉकडाऊन वाढविण्याची विनंती केली. त्यानंतर १५ एप्रिल ते ३ मे, असा लॉकडाऊनचा दुसरा टप्पा लागू करण्यात आला.

डोक्यावर सामान, हातात लेकरू घेऊन हजारो किलोमीटर पायपीय करणारे मजूर -

या लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका बसला तो गोरगरीब जनतेला, मजुरांना. लॉकाडऊनमुळे कंपन्या बंद पडल्या. व्यवसाय बंद झाले. त्यामुळे हाताला काम नव्हते. लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात घरात होते तेवढ्यावर पोटाची भूक भागली. स्थलांतरीत कामगार भूकेने व्याकूळ झाले. त्यांचा सहनशक्तीचा बांध शेवटी फुटलाच आणि प्रत्येकजण आपला जीव मुठीत धरून गावाच्या दिशेने पायपीट करत निघाले. डोक्यावर सामान आणि हातात लेकरू, पायात चप्पल नाही, भर उन्हात अनवाणी पायानं हजारो किलोमीटर पायपीट, उन्हाच्या झळा सहन करत मजूर आपलं घर जवळ करू लागले. यामध्ये अनेकांचा भूकबळीही गेला. कित्येक मजुरांचा जीव गेला.

औरंगाबाद रेल्वे अपघातात १६ मजुरांचा मृत्यू -

४ मे ते १७ मे, असा लॉकडाऊनचा तिसरा टप्पा घोषित झाला. त्यातही मजुरांचे लोंढे गावाकडे जातच होते. लहान-लहान लेकरांना घेऊन रखरखत्या उन्हात पायपीट करणारे मजूर हे रोजचेच चित्र होऊन बसले होते. ट्रकचे ट्रक भरून मजुरांचे लोंढे आपल्या घराकडे जात होते. लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे यापैकी अनेकांना अटकही करण्यात आली. त्यामुळे या मजुरांनी रात्रीचा पर्याय निवडला. त्यातच ८ मे रोजील महाराष्ट्रातील औरंगाबादेत हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली.

जालन्यातील एसआरजे कंपनीत काम करणारे १९ मजुरांनी लॉकडाऊन सातत्यानं वाढत असल्याने घराकडं जाण्याचा निर्णय घेतला. मध्य प्रदेशला जाण्यासाठी भुसावळला रेल्वे गाडी मिळेल अशी माहिती त्यांना मिळाली होती. त्यानुसार ते पायी भुसावळला चालले होते. पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी ते रेल्वे रुळांवरून जात होते. रात्र झाल्यामुळं सटाणा शिवाराजवळ रेल्वे रुळावरच पथारी पसरून ते झोपी गेले. पहाटेच्या सुमारास जालन्याकडून औरंगाबादकडे धडधडत येणाऱ्या मालगाडीचा त्यांना अंदाज आला नाही. त्यामुळे सर्वजण मालगाडीखाली चिरडले गेले. यात १६ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. हे सर्व मजूर मध्य प्रदेशचे होते. या घटनेमुळे अवघा देश हळहळला होता. आता या घटनेला जवळपास चार महिने पूर्ण होत आहेत. आता संसदेचे विशेष अधिवेशन सुरू आहे. मात्र, या स्थलांतरीत मजुरांचा जीव गेल्याची नोंद, त्याची माहिती केंद्र सरकारकडे उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते.

लॉकडाऊन सपशेल अपयशी - विरोधक

१८ ते ३१ मे असा लॉकडाऊनचा चौथा टप्पा लावण्यात आला. हा शेवटचा टप्पा होता. त्यानंतर हळूहळू लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले. पण, लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यानंतर कोरोना रुग्णांचा आकडा फुगतच आहे. आज देशातील कोरोना रुग्णांची संख्या पावणेसहा लाखांवर पोहोचली आहे. यामध्ये भारताने इटली, स्पेनला मागे टाकले. देशात तब्बल २ महिने लॉकडाऊन लावले. त्यानंतरची स्थितीही लॉकडाऊनसारखीच होती. कारण पूर्णपणे देश सुरू झालेला नव्हता. पण, कोरोनाची आकडेवारी वाढतच गेली. त्यामुळे  या लॉकडाऊनचा काहीही एक फायदा झाला नाही. लॉकडाऊन सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप विरोधक करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com