Loksabha election 2024 : राजघराण्यातील व्यक्ती ‘सत्ते’पासून दूरच; राजकीय पक्षांनी का डावललं?

उत्तर प्रदेशतील राजकीय घडामोडींचे अभ्यासक राजीव तिवारी यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, भाजपने या निवडणुकीमध्ये बऱ्यापैकी विद्यमान खासदारांवर आणि जुन्या नेत्यांवरच पुन्हा विश्‍वास दाखवला आहे त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश केलेल्या किंवा भाजपमध्ये असलेल्या राजघराण्यातील नेत्यांना यावेळी विशेष संधी देण्यात आलेली नाही...
BJP, Congress
BJP, Congressesakal

लखनौः एकेकाळी उत्तर प्रदेशच्या राजकारणावर प्रभाव असणाऱ्या राज्यातील राजघराण्यातील व्यक्तींना यंदाच्या निवडणुकीमध्ये मात्र कोणत्याच राजकीय पक्षांनी फारसा रस दाखवलेला नाही.

राज्यातील अनेक राजघराण्यांतील व्यक्ती यावेळी लोकसभेच्या रणधुमाळीपासून दूर असल्याचे दिसत आहेत. याबद्दल बोलताना राजकीय विश्‍लेषक कौशलकुमार शाही म्हणाले, ‘‘संस्थाने खालसा झाल्यानंतर राजघराण्यातील अनेक व्यक्तींनी राजकारणाची वाट धरली होती त्यानंतर अनेक वर्षे या राजघराण्यातील व्यक्तींचा राज्यातील राजकारणात दबदबा राहिला होता मात्र आता त्यांचा राजकीय प्रभाव कमी झाला असल्याचे दिसत आहे.’’

उत्तर प्रदेशतील राजकीय घडामोडींचे अभ्यासक राजीव तिवारी यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, भाजपने या निवडणुकीमध्ये बऱ्यापैकी विद्यमान खासदारांवर आणि जुन्या नेत्यांवरच पुन्हा विश्‍वास दाखवला आहे त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश केलेल्या किंवा भाजपमध्ये असलेल्या राजघराण्यातील नेत्यांना यावेळी विशेष संधी देण्यात आलेली नाही तर दुसरीकडे इंडिया आघाडीच्या जागावाटपामध्ये उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाच्या वाट्याला जास्त जागा आल्या असल्याने काँग्रेसमध्ये असलेल्या राजघराण्यातील व्यक्तींची उमेदवारीची संधी हुकली आहे.

सुलतानपूर

तत्कालीन अमेठी संस्थानमधील राजघराण्यातील वंशज संजय सिंह यांनी १९९८मध्ये भाजपच्या तिकिटावरून अमेठी मतदार संघातून आणि २००९मध्ये काँग्रेसच्या तिकिटावरुन सुलतानपूर येथून विजय मिळवला होता. यंदा त्यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा होती मात्र, भाजपने सुलतानपूर येथून मनेका गांधी यांना उमेदवारी दिली आहे.

प्रतापगड

काँग्रेसमधून २०१९मध्ये भाजपमध्ये दाखल झालेल्या राजकुमारी रत्नासिंह या प्रतापगड मतदारसंघातून १९९६, १९९९ आणि २००९ मध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. मात्र भाजपने यावेळी प्रतापगड येथून विद्यमान खासदार संगमलाल गुप्ता यांनाच पुन्हा उमेदवारी दिली आहे.

रामपूर

काँग्रेसच्या उत्तर प्रदेशातील ज्येष्ठ नेत्या आणि येथील राजघराण्यातील वंशज बेगम नूर बानो यांना वयाच्या ८४ व्या वर्षी देखील रामपूर मतदार संघातून काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची आशा होती मात्र इंडिया आघाडीच्या जागा वाटपामध्ये हा मतदारसंघ समाजवादी पक्षाकडे गेल्याने बेगम नूर बानो यांना उमेदवारी मिळाली नाही. समाजवादी पक्षाने येथून मोहिबुल्ला नदवी यांना उमेदवारी दिली आहे.

या राजघराण्यातील व्यक्तींना उमेदवारी नाहीच

आग्रा येथील भदावर राजघराण्यातील अरिदमन सिंह यांनाही यंदा उमेदवारी मिळालेली नाही. त्याचप्रमाणे प्रतापगड येथील राजा अजित प्रतापसिंह आणि विश्‍वनाथ प्रतापसिंह हेदेखील निवडणुकीच्या रणधुमाळी पासून दूर आहेत. त्याचप्रमाणे नवाब काझीम अली आणि त्यांचा पुत्र हैदर अली खान यांनाही कोणत्याही पक्षाकडून उमेदवारी मिळालेली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com