सचिनसह सगळ्यांच्या ट्विट्सची महाराष्ट्र सरकार करणार चौकशी; तपासणार भाजप कनेक्शन

sachin tweet
sachin tweet

मुंबई : दिल्लीत गेल्या 72 दिवसांपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत सध्या जागतिक पातळीवर चर्चा सुरु आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रिहाना, पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग आणि मिया खलिफा यांसारख्या जागतिक सेलिब्रिटींनी ट्विट करत या आंदोलनाकडे जगाचं लक्ष वेधलं होतं. याविषयी चर्चा का होत नाहीये, असा सवाल उठवण्यात आला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून परराष्ट्र मंत्रलयाने एक वक्तव्य जाहीर केलं होतं. ज्यात हा भारताविरोधातील प्रोपगंडाचा भाग असल्याचा निर्वाळा देत हा आमचा अंतर्गत मामला असून तो हाताळण्यास आम्ही सक्षम असल्याची भुमिका जाहीर केली होती. परराष्ट्र मंत्रालयाच्या या ट्विटनंतर अनेक भारतीय सेलिब्रिटींनी एकामागोमाग एक अशा पद्धतीने याच वक्तव्याची रि ओढली होती. त्याआधीचे 70 दिवस यातील एकाही सेलिब्रिटीने या विषयाकडे ढूंकूनही पाहिलेलं नव्हतं. त्याला पाठिंब्याची भुमिका नव्हे तर त्याबाबत कसलेही मत न व्यक्त करता सोयीस्कर मौनाची भुमिका स्विकारली होती. 

यावर आता महाराष्ट्र सरकार या ट्विट्सची चौकशी करणार आहे, अशी माहिती समोर येतीय. याबाबत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं की, रिहानाच्या ट्विटवर सरकार आणि परराष्ट्र मंत्रालय पहिल्यांदाच या पद्धतीने हडबडून जागं झाल्याचं दिसलं. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या प्रत्युत्तरानंतर एक सलग काही ट्विट्स केले गेले. जर एखादी व्यक्ती अथवा सेलिब्रेटी स्वतःहून मत मांडत असेल, तर ठिक आहे, हरकत नाही. पण यामागे भाजपाचा हात असू शकतो अशी शंका घेण्यास पुरेसा वाव आहे. कारण, या ट्विट्समधील भाषा, त्यातील मजकूर या सगळ्यामध्ये एकसारखेपणा आहे. यांना ट्विट्ससाठी स्क्रिप्ट तयार करवून दिल्याच्या शंकेस वाव आहे, कारण, या सगळ्याच ट्विट्समध्ये 'सौहार्द' हा शब्द दिसून येतोय.

पुढे त्यांनी म्हटलं की, बॉलिवूड स्टार अक्षय कुमार आणि खेळाडू सायना नेहवाल यांच्या ट्विट्समधील शब्द नि शब्द सारखा आहे. जराही फरक नाहीये. त्यानंतर सुनिल शेट्टी यांच्या ट्विट्सकडे पाहिल्यावर तर हा संशय अधिकच भक्कम होतो कारण, त्यांच्या ट्विटमध्ये भारतीय जनता पक्षाच्या मुंबई प्रदेशच्या पदाधिकारी हितेश जैन यांना देखील टॅग केलं आहे. त्यामुळे यात भाजपाचं कनेक्शन निश्चितच आहे. हे सेलिब्रिटीज दबावात असू शकतात. यामध्ये भाजपाचं कनेक्शन आणि दबाव आहे का, हे तपासण्याची मागणी आम्ही केली आहे. 

त्यांनी स्वत:हून ट्विट करण्याला हरकत नाही मात्र, त्यांच्यावर सत्तेचा दबाव असू शकतो, अशी शंका आहे. कारण आज विरोधी पक्षांची सरकारे दबावात आहेत, स्वायत्त संस्था दबावात आहेत, माध्यमे दबावात आहेत. भाजपचं कनेक्शन आहे का? त्यांचा दबाव आहे का? हे तपासलं जावं इतकंच आमचं म्हणणं आहे. यासाठी आम्ही गृहमंत्र्यांकडे मागणी केली आहे. त्यांनी महाराष्ट्र पोलिसांच्या  इंटेलिजन्स विभागाकडून तपासाचे आदेश दिले आहेत, असंही सचिन सावंत यांनी म्हटलं. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com