आज दिवसभरात काय महत्वाच्या घडामोडी घडल्या? वाचा एका क्लिकवर

कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील सीमावाद पुन्हा उफाळून आलाय. या वादाचे पडसाद आजही उमटण्याची शक्यता आहे.
Breaking News
Breaking News Sakal
Updated on

कोल्हापूरात CM शिंदेंच्या हस्ते पंचगंगेची आरती

आज कोल्हापूरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंचगंगेची आरती केली. पंचगंगेच्या तीरावर झालेल्या या आरतीला शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर आणि इतर कार्यकर्ते देखील उपस्थित होते.

 गुजरात निवडणुकीसाठी काँग्रेसचे अध्यक्ष उतरणार प्रचार मैदानात

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. यादरम्यान काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे 27 आणि 28 नोव्हेंबर रोजी गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार करणार आहेत.

महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद ही कॉंग्रेस-नेहरूंची चूक - मुनगंटीवार

महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद ही कॉंग्रेस आणि नेहरूंची चूक आहे, कॉंग्रेसने याबद्दलची भूमिका स्पष्ट करावी असे भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत. सीमावादावर एकत्र येऊन सुप्रीम कोर्टात बाजू मांडावी, आम्ही पूर्ण शक्तीने महाराष्ट्राची बाजू मांडतोय. ही चूक पंडीत नेहरू आणि आणि कॉंग्रेसची आहे असे ते य़ावेळी म्हणाले आहेत.

संजय राऊत प्रकरणी ईडीची पुन्हा पळापळ

पत्राचाळ घोटाळाप्रकरणी खासदार संजय राऊत यांना दिलेला जामीन रद्द करण्यासाठी सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. यावेळी हायकोर्टाने ईडीला दुसऱ्या कोर्टाकडे जाण्यासा सांगितले.

भारत बायोटेकची इंट्रानासल कोविड लस मंजूर

भारत बायोटेकचा इंट्रानासल कोविड बूस्टर डोस 'फाइव्ह आर्म्स' मंजूर झाला आहे. शुक्रवारी, ड्रग कंट्रोलर जनरल (DCGI) ने या लसीच्या मर्यादित वापरासाठी मान्यता दिली आहे.

सुप्रीम कोर्टाचा ममता बॅनर्जी सरकारला मोठा दिलासा; CBI चौकशीच्या आदेशावर घातली बंदी

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील (West Bengal) कथित शाळा भरती घोटाळ्याप्रकरणी (School Recruitment Scam) ममता बॅनर्जी सरकारला (Mamata Banerjee Government) सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) मोठा दिलासा मिळाला आहे. शालेय सेवा आयोगातील (School Service Commission) कथित भरती घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्याच्या कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिलीय. एवढंच नाही तर या प्रकरणी पश्चिम बंगालचे प्रधान सचिव मनीष जैन (Manish Jain) यांच्या वैयक्तिक हजर राहण्यासही सर्वोच्च न्यायालयानं बंदी घातलीय. कोलकाता उच्च न्यायालयानं शाळा भरती घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश सीबीआयला दिले होते.

केंद्राकडे थकलेले जीएसटीचे २ हजार कोटी आले; आणखी १२ हजार कोटी येणार - देवेंद्र फडणवीस

नवी दिल्लीः राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीमध्ये आहेत. दिल्लीत त्यांची केंद्रीय अर्थमंत्र्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीनंतर फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. यावेळी माध्यमांशी बोलतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्र सरकारने राज्य सरकारचे जीएसटीचे २ हजार कोटी रिलिज केले आहेत. ही महाराष्ट्रासाठी महत्त्वाची बाब असून सीएजीने ऑडिट केल्यानंतर तेही १२ ते १३ हजार कोटी रुपये येतील, असं फडणवीस यांनी सांगितलं.

पंधरा वर्षे जुनी वाहनं होणार स्क्रॅप - नितीन गडकरी

मुंबईः केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठा निर्णय घेत असल्याचं जाहीर केलं. पंधरा वर्षे जुनी असलेली सर्व सरकारी वाहनं स्क्रॅप होणार आहेत. या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात रोजगार निर्मिती होईल, असं त्यांनी सांगितलं. पर्यावरणपूरक आणि धाडसी निर्णयामुळे नितीन गडकरी यांची वेगळीच ओळख आहे. आता गडकरी एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. या निर्णयाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सहमती दर्शवल्याचं गडकरी यांनी सांगितलं.

पाण्याचा जपून वापर केला तर अडचण येणार नाही - अजित पवार

पुणे शहरात नेमका किती पाण्याचा वापर होतो, हे पाहावं लागणार आहे. काही ठिकाणी जायका, महापालिकाचं कामं सुरू आहे. ३५ टक्के लिकेज शहरात आहेत. इरिगेशनच्या अधिकाऱ्यांना आदेश काढा आणि कामं पूर्ण करायला सांगितलं आहे. पाऊस चांगला झाल्यामुळं धरणात साठा चांगला आहे. पाण्याचा वापर जर नीट केला तर अडचण येणार नाही, असं अजित पवार यांनी सांगितलं.

बोलेरो कारमधून नेऊन मूकबधिर दलित मुलीवर सामूहिक बलात्कार

बाडमेर जिल्ह्यात (Barmer District) मूकबधिर दलित मुलीवर (Dalit Girl) सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आलीय. नराधमांनी मुलीला बोलेरो कारमधून (Bolero Car) नेऊन तिच्यावर बलात्कार केला. पीडितेच्या वडिलांनी धोरीमन्ना पोलीस ठाण्यात (Dhorimanna Police Station) तक्रार केली आणि सांगितलं की, आमची मूकबधिर मुलगी संध्याकाळी एमआरटी रोडजवळील शेतात शेळ्या चारत होती. यादरम्यान बोलेरो कारमधून आलेल्या नराधमांनी मुलीचा गळा दाबून तिला जवळच्या वनविभागाच्या परिसरात नेलं आणि तिथं नराधमांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. मुलगी बेशुद्ध पडताच नराधम तेथून पळून गेले.

अतिप्रसंगाला विरोध करताच विवाहितेला पेटवून जीवे मारण्याचा प्रयत्न; जळगावमधील घटना

जळगाव: अतिप्रसंगाला विरोध करणाऱ्या विवाहितेला पेटवून अज्ञात व्यक्तीने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना जळगाव जिल्ह्यातील भडगाव शहरात घडली आहे. ही घटना गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. जळगावमध्ये घडलेल्या या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षेतेचा प्रश्न  ऐरणीवर असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी भडगाव पोलिसात एका 50 वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

''अरविंद केजरीवालांची हत्या होऊ शकते'' मनोज तिवारींच्या अटकेची मागणी

नवी दिल्लीः आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी खळबळजनक शंका उपस्थित केली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याचं ते म्हणाले आहेत. मनिष सिसोदिया म्हणाले की, आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांची हत्या होऊ शकते. एमसीडी आणि गुजरात निवडणुकीत पराभवाच्या भीतीने भाजप कट रचत आहे. भाजप खासदार मनोज तिवारी यांचं नाव या कटामध्ये असल्याचं सिसोदिया म्हणाले. मनोज तिवारी यांना अटक करा, अशी मागणी मनिष सिसोदिया यांनी केली आहे.

अमृता फडणवीसांनी केली राज्यपालांची पाठराखण

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची पाठराखण केली आहे. 'मराठी बोलण्याच्या ओघात जे बोलले त्याचा वेगळा अर्थ काढण्यात आला. ' अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री शिंदेंचं शंभूराज देसाई, पृथ्वीराज चव्हाणांकडून स्वागत

कराड : ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाला अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आज शुक्रवारी कराड विमान तळावर आगमन झालं. मुख्यमंत्री विमानतळावर उतरल्यानंतर त्यांचं पालक मंत्री शंभूराज देसाई, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी कांग्रेस खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार गजानन बाबर, आमदार जयकुमार गोरे, शिवसेनेचे आमदार महेश शिंदे, माजी आमदार आनंदराव पाटील, काँग्रेसचे सरचिटणीस उदयसिंह पाटील यांनी स्वागत केलं.

विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत सुधारणा

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृती संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती दीनानाथ हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगीकर यांनी दिली. याडगीकर यांनी त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याची दिलासादायक माहिती दिली आहे. 'त्यांच्या प्रकृतीमध्ये हळूहळू सुधारणा होत आहे. ते डोळे ही उघडत आहेत. पुढच्या ४८ तासांत व्हेंटिलेटरची पण गरज भासणार नाही. तसंच बीपी आणि हृदयाची क्रिया सुरळीत सुरू आहे. ' असं मेडिकल बुलेटिनमध्ये दीनानाथ हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी याडगीकर यांनी सांगितलं आहे.

'झुंड' चित्रपटातील अभिनेत्याला अटक; ५ लाखांचे दागिने लंपास केल्याचा आरोप

नागराज मंजुळे दिग्दर्शित आणि अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला ‘झुंड’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता प्रियांशू क्षत्रिय याला चोरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. प्रियांशूने ‘झुंड’ चित्रपटात बाबू ही भूमिका साकारली होती.

कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नी सर्वपक्षीय बैठकीत चर्चा : CM बोम्मई

बंगळूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद चर्चेने सोडवावा, या विधानावर सर्वपक्षीय बैठकीत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी गुरुवारी सांगितले. आज गृहमंत्री कृष्णा येथे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे की, कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील सीमावाद चर्चेने सोडवला पाहिजे. त्यांच्या या विधानावर पुढील आठवड्यात सर्वपक्षीय बैठक बोलावून चर्चा करण्यात येईल व निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले.

पुण्यात उच्चभ्रू परिसरात गोळीबार, दोन गटांत राडा

पुण्यात उच्चभ्रू परिसरात गोळीबार झाला आहे. येथील कोरेगाव पार्कमध्ये रात्री गोळीबाराची घटना घडली. पूर्ववैमनस्यातून दोन गटांत हा राडा झाला. याप्रकरणी सहा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सोन्या दोडमणी यानं त्याच्याकडील कमरेला लावलेली बंदूक काढून त्यातून हवेत गोळीबार केला आहे.

लक्ष विचलित करण्यासाठीच बोम्मईंचं ते वक्तव्य - संजय राऊत

शिवरायांच्या अपमानाचा विषय मागं पडावा, म्हणून बोम्मईंना पुढं करुन महाराष्ट्रातल्या सोलापूर, जत, अक्कलकोटवरती हक्क सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे. म्हणजे, लोकांनी दुसऱ्या विषयाकडं वळावं आणि छत्रपती शिवरायांचा अपमान विसरावं, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.

स्वाभिमानीकडून चक्काजाम आंदोलन तात्पुरते स्थगित

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून आक्रमक झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आजचे चक्काजाम आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी याबाबत माहिती दिली. मात्र, दोनवेळा सरकारने फसवणूक केली असून जर 29 नोव्हेंबरच्या बैठकीत तोडगा निघाला नाही, तर 3 डिसेंबरला मोठ्या ताकदीने चक्का जाम करण्याचा निर्धार राजू शेट्टी यांनी केला आहे.

आप नेत्याची गळफास लावून आत्महत्या

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या (Aam Aadmi Party) व्यापार शाखेचे राज्य सचिव संदीप भारद्वाज (Sandeep Bhardwaj) यांनी गुरुवारी राहत्या घरी आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. याप्रकरणी पोलिसांनी सीआरपीसी (CRPC) कलम 174 अन्वये चौकशी सुरू केली आहे.

मिरजेसह चार तालुक्यांना अवकाळी पावसाचा तडाखा

सांगली जिल्ह्यात दोन दिवसाच्या ढगाळ वातावरणानंतर गुरुवारी सायंकाळी जोरदार अवकाळी पावसानं हजेरी लावली. मिरज तालुक्यासह चार तालुक्यांमध्ये पाऊस झाला. या अवकाळी  पावसामुळं द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. कारण पावसाचा फुलोऱ्यात असणाऱ्या द्राक्ष बागांना तडाखा बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर अन्य पिकांसाठी देखील हा पाऊस धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.

दिल्लीतील एम्स रुग्णालयात सायबर हल्ला; दोघांना केले निलंबित

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) दिल्लीचा सर्व्हर दोन दिवस उलटूनही सुरळीत झालेला नाही. सुरक्षेच्या कारणास्तव एम्सचा लॅन इंटरनेट सर्व्हरही गुरुवारी संध्याकाळी बंद करावा लागला. सध्या एम्स कॅम्पसमध्ये मोबाईल इंटरनेट सेवा वापरली जात आहे. त्याचवेळी सायंकाळी उशिरा एम्स व्यवस्थापनाने संगणक शाखेशी संबंधित दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. एम्स व्यवस्थापनाने एका निवेदनात रॅन्समवेअर सायबर हल्ल्याची भीती व्यक्त केली होती परंतु सुरक्षा यंत्रणांनी अद्याप याची पुष्टी केलेली नाही. एम्स नवी दिल्ली सर्व्हर हॅक प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या IFSO युनिटने अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात रॅपीडो कंपनीवर गुन्हा दाखल

पुण्यात रॅपीडो कंपनीवर गुन्हा दाखल झाला आहे. रॅपीडो ही दुचाकी टॅक्सी वाहतूक करणारी कंपनी आहे. आरटीओकडून तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीररित्या दुचाकी टॅक्सी वाहतूक करण्याप्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. या कंपनीविरोधात अनेक रिक्षा संघटनांनी विरोध केला होता. रॅपीडोविरोधात पुण्यात २८ नोव्हेंबर रोजी रिक्षा चालकांचे चक्काजाम आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.

थेट कर्नाटकात जाऊ...महाराष्ट्र सरकारला जतच्या नागरिकांचा अल्टिमेटम

सीमाप्रश्नावरून महाराष्ट्र-कर्नाटक यांच्यातला वाद पुन्हा एकदा सुरू झाला आहे. सांगलीतल्या जत तालुक्यावर दावा सांगण्याचा कर्नाटक सरकार गांभीर्यानं विचार करतंय. अशा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी म्हटले आहे. अशातच जतच्या नागरिकांनीही महाराष्ट्राविरोधात आक्रमक भूमिका घेतील असल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र सरकारला जतच्या नागरिकांनी अल्टिमेट दिला आहे. सांगली जिल्ह्यातील दुष्काळी जत तालुक्यातील ४० गावांनी महाराष्ट्र सरकारला अल्टिमेटम देत थेट कर्नाटकमध्ये विलीन होण्याचा इशारा दिला आहे.

सावरकरांनी नेहमीच भारत तोडण्याचा प्रयत्न केला, भाजप-आरएसएस तेच करत आहे - जयराम रमेश

काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी पुन्हा एकदा हिंदुत्ववादी विचारवंत वीर सावरकर (Veer Savarkar), भारतीय जनता पक्ष (BJP) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) जोरदार हल्लाबोल केला. सावरकरांनी नेहमीच भारताचे तुकडे करण्याचा प्रयत्न केला आणि भाजप-आरएसएस तेच करत आहे, असं त्यांनी म्हटलंय.

घशात मासा अडकून 6 महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी अंत

अंबरनाथ : घशात मासा अडकून 6 महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी अंत झाला आहे. अंबरनाथमधील उलन चाळ परिसरात ही हृदयद्रावक घटना घडलीय. खेळता-खेळता बाळानं तोंडात मासा टाकला आणि श्वास अडकल्यानं बाळाचा तडफडून झाला मृत्यू आहे.

इंजिनात बिघाड झालेली ट्रेन तब्बल पाच तासांनी मार्गस्थ

कोकण रेल्वे (Konkan Raliway) मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. कोकणकन्या एक्सप्रेसच्या (Konkan Kanya Express) इंजिनात बिघाड झाल्यानं तब्बल पाच तास वाहतूक विस्कळीत झाली होती. मडगाव-मुंबई कोकणकन्या एक्स्प्रेस वीर स्टेशनवर रखडली होती. अनेक गाड्या विविध स्थानकांमध्ये खोळंबल्या होत्या. पण अखेर पाच तासांनी बिघाड दुरुस्त करण्यास रेल्वे प्रशासनाला यश आलं. त्यानंतर कोकणकन्या एक्सप्रेस मार्गस्थ झाली. 

एक इंचही जागा कर्नाटकाला देणार नाही- शंभूराज देसाई

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यासह सोलापूर आणि अक्कलकोट येथील गावांवर आपला दावा सांगितला आहे. त्यांनतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी एकही इंच जागा आम्ही कर्नाटकाला देणार नाही अशा शब्दात बोम्मई यांना ठणकावलं आहे. ते कराड येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

आज शुक्रवार 25 नोव्हेंबर 2022 : बैलगाडा शर्यतींबाबत पुनर्विचार याचिकेवर काल सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. ॲनिमल वेल्फेअर बोर्ड ॲाफ इंडिया बैलगाडी शर्यतीबाबत सकारात्मक असल्याचं दिसून आलं. त्यामुळं आता राज्यात पुन्हा बैलगाडा शर्यतींचा धुरळा उडणार आहे. त्याचबरोबर कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील सीमावाद पुन्हा उफाळून आलाय. या वादाचे पडसाद आजही उमटण्याची शक्यता आहे. तसंच राज्यपाल पदावरुन भगतसिंग कोश्यारी यांना हटवण्याची खासदार उदयनराजे भोसलेंनी केलेल्या मागणीवर आज काय राजकीय घडामोडी घडतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या सोबतच राज्यातील थंडीचे अपडेटही जाणून घेणार आहोत. शिवाय, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या तब्येतीविषयीचे प्रत्येक अपडेटचा आढावाही या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com