महाराष्ट्रात सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकूण 53.40% मतदानाची नोंद झाली. बारामतीमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद झाली आहे, तर कोल्हापुरात सर्वाधिक मतदान झालं आहे.
लातूर - 55.38%
सांगली - 52.56%
बारामती - 45.68%
हातकणंगले - 62.18%
कोल्हापूर - 63.71%
माढा - 50.00%
धाराशीव - 52.78%
रायगड - 50.31%
रत्नागिरी-सिंधुदुर्ग - 53.75%
सातारा - 54.11%
सोलापूर - 49.17%
सायंकाळी पाच वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर आली आहे. देशात आतापर्यंत 60.19 टक्के मतदान झालं असून, महाराष्ट्रात 53.40 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. देशातील सर्वात कमी मतदानाची नोंद महाराष्ट्रात झाली आहे.
आसाम - 74.86%
बिहार - 56.01%
छत्तीसगड - 66.87%
दादरा-नगर हवेली आणि दमण दीव - 65.23%
गोवा - 72.52%
गुजरात - 55.22%
कर्नाटक - 66.05%
मध्य प्रदेश - 62.28%
महाराष्ट्र - 53.40%
उत्तर प्रदेश - 55.13%
पश्चिम बंगाल - 73.93%
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या विरोधात सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. ईव्हीएम मशीनची पूजा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
ईव्हीएम हॅक करण्याचं आमिष दाखवत अंबादास दानवेंकडे एका व्यक्तीने अडीच कोटींची मागणी केली होती. त्यांच्या भावाने सापळा रचत या व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. एक लाखांची लाच घेत असताना मारुती ढाकणे या व्यक्तीला पुण्यातून पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
कोल्हापूरच्या पद्माराजे मतदान केंद्रावर बोगस मतदानावरुन वाद झाला आहे. तर दुसरीकडे इचलकरंजीच्या कोरोची गावामध्ये मतदार यादीवरुन गोंधळ झाला आहे. उमेदवारांच्या यादीत मतदारांची नावं आहेत, मात्र निवडणूक आयोगाच्या यादीत नाहीत. त्यामुळे मतदान प्रक्रियेत अडथळा येत आहे. नागरिक मात्र मतदान करण्यावर ठाम आहेत.
रायगडमध्ये मतदानासाठी आलेल्या कित्येक मतदारांनी मतदानानंतर रक्तदानही केलं. मतदान केंद्राबाहेरच यासाठी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. यामुळे मतदारांना एकाच दिवशी दोन श्रेष्ठ दान करण्याची संधी मिळाली. रायगडमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 41.43 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
सोलापूरमध्ये राम सातपुते आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याची घटना समोर आली आहे. मतदान केंद्रावर काही वाद झाल्यामुळे पोलिसांना पाचारण करावं लागलं.
देशातील दुपारी तीन वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर आली आहे. महाराष्ट्रात सर्वात कमी (42.63%) मतदानाची नोंद झाली आहे. तर पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक (63.11%) मतदानाची नोंद झाली आहे. आसाममध्ये देखील 63.08 टक्के मतदान झालं आहे.
आसाम - 63.08%
बिहार - 46.69%
छत्तीसगड - 58.19%
दादरा-नगर हवेली आणि दमण दीव - 52.43%
गोवा - 61.39%
गुजरात - 47.03%
कर्नाटक - 54.20%
मध्य प्रदेश - 54.09%
महाराष्ट्र - 42.63%
उत्तर प्रदेश - 46.78%
पश्चिम बंगाल - 63.11%
दुपारी तीन वाजेपर्यंत महाराष्ट्रात 42.63 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. यातील सगळ्यात कमी मतदान हे बारामतीमध्ये झालं आहे. बारामतीमध्ये अवघं 34.96 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. तर सर्वाधिक 51.51% मतदान हे कोल्हापुरात झालं आहे.
लातूर - 44.48%
सांगली - 41.30%
बारामती - 34.96%
हातकणंगले - 49.94%
कोल्हापूर - 51.51%
माढा - 39.11%
धाराशीव - 40.92%
रायगड - 41.43%
रत्नागिरी-सिंधुदुर्ग - 44.73%
सातारा - 43.83%
सोलापूर - 39.54%
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी बारपेटा येथील मतदान केंद्रावर मतदान केलं.
मतदाराने चक्क ईव्हीएम पेटवल्याचा धक्कादायक प्रकार सांगोल्यातून समोर आला आहे. याप्रकरणी संबंधित तरुणाला निवडणूक अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.
रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये असणाऱ्या बाळगंगा प्रकल्पगस्तांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. आपलं पुनर्वसन झालं नसल्यामुळे या गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. याप्रकरणी रायगड पोलीस अधीक्षकांनी मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो निष्फळ ठरला आहे.
पश्चिम बंगालच्या मालदामध्ये महिलांनी आंदोलन करत मतदानावर बहिष्कार टाकला आहे. विकासाच्या काही मुद्द्यांसाठी या महिला आंदोलन करत आहेत.
सोलापुरातील मनगुळी आणि भैरववाडी या दोन गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. गावात रस्ता नसल्याने गावकऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. दोन्ही गावांमध्ये सकाळपासून केवळ 8 जणांनी मतदान केलं आहे.
सांगोल्यात शिवसेना आणि शेतकरी कामगार पक्ष यांच्या कार्यकर्त्यांच्या दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली असून दोन्ही गटातील ५ ते ६ जण जखमी झाले आहेत.
कोल्हापूर : उत्तरेश्वर पेठेतील रमाबाई आंबेडकर शाळेत मतदान केंद्रावर मतदानासाठी रांगेत उभारलेले महादेव श्रीपती सुतार ( वय ६९, रा. उत्तरेश्वर पेठ, कोल्हापूर ) हे वृध्द चक्कर येऊन कोसळले. नातेवाईकांसह कार्यकर्त्यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
कारवार लोकसभा मतदारसंघाच्या व्याप्तीत येणाऱ्या खानापूर तालुक्यातील निट्टुर या गावातील मतदान केंद्राबाहेर मतदारांचे नावे शोधून देणारे भाजपचे कार्यकर्ते आपल्या सोबत भाजपचे शेले घेऊन बसले होते. याप्रसंगी कारवार लोकसभा काँग्रेस उमेदवार अंजली निंबाळकर येथे दाखल झाल्या. भाजप कार्यकर्त्यांना रंगेहात पकडून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
धाराशीवच्या पाठसावंगी गावात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात 3-4 जण गंभीर जखमी झाले असून, एकाचा मृत्यू झाल्याचं समजत आहे. साम टीव्हीने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
दुपारी एक वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर आली आहे. देशात एकूण 39.92 टक्के मतदान झालं असून, महाराष्ट्र अजूनही सगळ्यात मागे आहे.
आसाम - 45.88%
बिहार - 36.69%
छत्तीसगड - 46.14%
दादरा-नगर हवेली आणि दमण दीव - 39.94%
गोवा - 49.04%
गुजरात - 37.83%
कर्नाटक - 41.59%
मध्य प्रदेश - 44.67%
महाराष्ट्र - 31.55%
उत्तर प्रदेश - 38.12%
पश्चिम बंगाल - 49.27%
दुपारी एक वाजेपर्यंत महाराष्ट्रात 31.55 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. बारामती मतदारसंघात सगळ्यात कमी मतदानाची नोंद झाली आहे.
लातूर - 32.71%
सांगली - 29.65%
बारामती - 27.55%
हातकणंगले - 36.17%
कोल्हापूर - 38.42%
माढा - 26.61%
धाराशीव - 30.54%
रायगड - 31.34%
रत्नागिरी-सिंधुदुर्ग - 33.91%
सातारा - 32.78%
सोलापूर - 29.32%
दोन्ही हात नसलेल्या एका व्यक्तीने गुजरातमध्ये चक्क पायांनी मतदान केलं आहे. अनिकेत सोनी असं या व्यक्तीचं नाव आहे. 20 वर्षांपूर्वी इलेक्ट्रिक शॉक लागल्यामुळे या व्यक्तीने दोन्ही हात गमावले होते. मात्र तरीही त्यांनी हार मानली नाही. इतर नागरिकांना देखील मतदान करण्याचं आवाहन अनिकेतने यावेळी केलं.
छत्तीसगडमधील सेमली येथे एकाच कुटुंबातील पाच पिढ्यांनी एकाच वेळी मतदान केलं आहे.
हातकणंगलेमध्ये शिंदे आणि ठाकरे गटामध्ये वाद झाला आहे. धैर्यशील माने आणि सत्यजित पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याचं समोर आलं आहे.
साताऱ्याचे पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई यांनी मरळी येथे सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. मतदान हा आपला अधिकार आणि कर्तव्यही आहे. सर्व मतदार बंधू-भगिनींनी जास्तीत जास्त संख्येने मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे आणि आपली लोकशाही बळकट करण्याच्या या प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन मंत्री शंभूराज देसाई यांनी यानिमित्ताने केले आहे.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. कोठंबी येथील मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केलं.
सुप्रिया सुळेंनी दत्तात्रय भरणेंविरोधात तक्रार दाखल केली आहे. गावातील लोकांना धरणे धमकावत असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. निवडणूक आयोगाकडे ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
लातूरमधील सुनेगाव-सांगवीतील गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार घातला आहे. याठिकाणी तहसीलदार गावकऱ्यांची समजूत काढण्यासाठी दाखल झाले आहेत.
माजी कृषी व सहकार राज्यमंत्री आमदार डॉ. विश्वजित कदम, भारती विद्यापीठ शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा विजयमाला कदम आणि सौ स्वप्नाली कदम यांनी आपल्या मतदानाचा हक्क सोनसळ तालुका कडेगांव येथे बजावला.
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि समाजकल्याणचे माजी सभापती ब्रह्मदेव पडळकर यांनी पडळकरवाडी येथे मतदान केले.
अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी यांनीदेखील आज मतदानाचा हक्क बजावला. अहमदाबाद येथील मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केलं.
देशात सकाळी 11 वाजेपर्यंत 25.41 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. दुसऱ्या फेरीनंतर देखील महाराष्ट्रच सर्वात मागे असल्याचं दिसत आहे. जाणून घ्या आकडेवारी..
आसाम - 27.34%
बिहार - 24.41%
छत्तीसगड - 29.90%
दादरा-नगर हवेली आणि दमण दीव - 24.69%
गोवा - 30.94%
गुजरात - 24.35%
कर्नाटक - 24.48%
मध्य प्रदेश - 30.21%
महाराष्ट्र - 18.18%
उत्तर प्रदेश - 26.12%
पश्चिम बंगाल - 32.82%
सकाळी 11 वाजेपर्यंत देशात एकूण 25.41 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात 18.18 टक्के मतदान झालं आहे. राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापुरात झालं असून, बारामतीमध्ये सर्वात कमी मतदान झालं आहे.
लातूर - 20.74%
सांगली - 16.61%
बारामती - 14.64%
हातकणंगले - 20.74%
कोल्हापूर - 23.77%
माढा - 15.11%
धाराशीव - 17.06%
रायगड - 17.18%
रत्नागिरी-सिंधुदुर्ग - 21.19%
सातारा - 18.94%
सोलापूर - 15.69%
बारामती मतदारसंघात मतदान केल्यानंतर सुप्रिया सुळे अजित पवारांच्या काटेवाडीतील घरी दाखल झाल्या आहेत.
काँग्रेसचे सरचिटणीस कम्युनिकेशन प्रभारी जयराम रमेश म्हणाले, पहिल्या दोन टप्प्यांनंतरच स्पष्ट झाले की निर्णायक जनादेश 'इंडिया' आघाडीला जाईल. तिसऱ्या टप्प्याच्या मतदानानंतरही तेच दिसेल... आम्ही जिंकलो आहोत.
मैनपुरी लोकसभा मतदारसंघात सपा प्रमुख अखिलेश यादव, मैनपुरीचे विद्यमान खासदार आणि सपा उमेदवार डिंपल यादव यांनी मतदान केले. या जागेवरून भाजपने जयवीर सिंह यांना उमेदवारी दिली आहे.
कराड : लोकशाहीचा उत्सव दर पाच वर्षांनी साजरा होतो त्यावर एक गडद छाया यावेळी आहे. या देशात लोकशाही अस्तित्वात राहील का नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. लोकशाही वाचवण्यासाठी हुकूमशाहीकडे चाललेली वाटचाल थांबवण्यासाठी आज देशात देशातील जनता सज्ज झालेली आहे. मला खात्री आहे की जनता इंडिया आघाडीला साथ देऊन देशात सत्तांतर होईल याची मला खात्री आहे, असा विश्वास माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.
चिक्कोडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवत असलेल्या प्रियंका जारकीहोळी यांनी यमकनमर्डी विधानसभा मतदारसंघांतर्गत मतदान केंद्रावर आपला हक्क बजावला.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी कलबुर्गी येथे मतदान केलं. कलबुर्गी येथे काँग्रेसचे राधाकृष्णा आणि भाजपचे उमेश जाधव यांच्यात लढत आहे.
निंभोरे ता. फलटण येथे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व त्यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्य ऍड जिजामाला नाईक निंबाळजार यांनी सकाळी साडे नऊच्या सुमारास आपला मतदानाचा हक्क बजावला.
फलटण येथील मुधोजी क्लब या मतदान केंद्रावर आज सकाळी पावने दहाच्या सुमारास विधान परिषद माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी मतदानाचा हक्क बजावला.
केंद्रीय मंत्री आणि धारवाडमधील भाजप उमेदवार, प्रल्हाद जोशी यांनी हुबळी, धारवाड येथील मतदान केंद्र क्रमांक १११ वर मतदान केले. काँग्रेसने धारवाड लोकसभा मतदारसंघातून विनोद आसूती यांना उमेदवारी दिली आहे.
दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार पल्लवी धेंपे यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्यासोबत पती श्रीनिवास धेंपे आणि कन्या गिरीजा धेंपे यांनीही मतदान केलं.
उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रमाकांत खलप यांनी म्हापशात सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला आहे.
पुण्यातील आंबेगाव येथे मतदार याद्यांमध्ये गोंधळ झाल्याचं समोर आलं आहे. यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
बारामतीमधील रिमांड होम मतदार केंद्रावर सुप्रिया सुळेंनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांचे कुटुंबीय देखील उपस्थित होते.
सकाळी नऊ वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर आली आहे. देशातील सर्वात कमी मतदान महाराष्ट्रात झालं आहे.
आसाम - 10.12%
बिहार - 10.41%
छत्तीसगड - 13.24%
दादरा-नगर हवेली आणि दमण दीव - 10.13%
गोवा - 13.02%
गुजरात - 9.87%
कर्नाटक - 9.45%
मध्य प्रदेश - 14.43%
महाराष्ट्र - 6.64%
उत्तर प्रदेश - 12.94%
पश्चिम बंगाल - 15.85%
महाराष्ट्रात सकाळी नऊ वाजेपर्यंत 6.64% मतदानाची नोंद झाली आहे.
लातूर - 7.91%
सांगली - 5.81%
बारामती - 5.77%
हातकणंगले - 7.55%
कोल्हापूर - 8.04%
माढा - 4.99%
धाराशीव - 5.79%
रायगड - 6.84%
रत्नागिरी-सिंधुदुर्ग - 8.17%
सातारा - 7.00%
सोलापूर - 5.92%
सोलापुरातील पाथर्डी येथील मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन बंद पडली आहे. त्यामुळे 20 मिनिटांपासून येथील मतदान प्रक्रिया थांबली आहे.
पश्चिम बंगालमध्ये मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात देखील हिंसाचाराच्या घटना समोर येत आहेत. मुर्शिदाबाद येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या घरावर बॉम्ब हल्ला झाला आहे. याबाबत काँग्रेसने तृणमूल कार्यकर्त्यांना जबाबदार धरलं आहे. टीएमसीने हा आरोप फेटाळून लावला आहे.
खासदार श्रीनिवास पाटील यांनी कराड शहरातील पालिका शाळा नंबर तीन मध्ये आज मंगळवारी सहकुटुंब मतदान केले. लोकशाही बळकट करण्यासाठी नागरिकांनी मतदान करावे. सामान्य जनतेचे प्रश्न सोडवणारा माणूस दिल्लीला पाठवावा असे आवाहन त्यांनी यावेळी केलं.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सहकुटुंब मतदानासाठी पोहोचले आहेत. गांधीनगर येथील मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केलं. याठिकाणी ते स्वतः निवडणुकीसाठी उभे आहेत.
शरद पवार यांनी बारामतीमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. माळेगावातील श्रीमंत शंभूसिंह महाराज हायस्कूलमधील मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केलं.
शरद पवार हे आपल्या कुटुंबीयांसह मतदानासाठी दाखल झाले आहेत. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत आहे.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी त्यांच्या बावडा या मूळ गावी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या व कन्या अंकिता पाटील ठाकरे, पत्नी भाग्यश्री पाटील, पुत्र राजवर्धन पाटील यानी देखील मतदानाचा हक्क बजावला.
सांगली मतदारसंघातील ३४८ मतदान केंद्रातील तीन मतदान यंत्रे बंद पडली होती. ती सुरू करून मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित आबा पाटील सरूडकर यांनी बजावला मतदानाचा हक्क.
माढा लोकसभेचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
बारामती : दौंडमधील राहू येथील मतदान केंद्रावर आमदार राहुल कुल यांनी पत्नी कांचन कुल यांच्यासह सकाळी सात वाजताच मतदानाचा हक्क बजावला.
रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख आणि देशमुख कुटुंबीय यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यासोबत संपूर्ण देशमुख कुटुंबीय उपस्थित होते.
लातूरमधील औसा येथे ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे मतदान प्रक्रिया थांबली होती. अखेर 45 मिनिटांनी याठिकाणी मतदान सुरू झालं आहे.
दक्षिण सोलापुरातील गंगेवाडी येथील मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया थांबली होती. व्हीव्हीपॅट मशीनमध्ये झालेल्या बिघाडामुळे मतदान थांबलं होतं. मात्र सुमारे अर्ध्या तासानंतर आता मशीन बदलून मतदान पुन्हा सुरू करण्यात आलं आहे.
हातकणंगले मतदारसंघातून राजू शेट्टींनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यासोबतच, धाराशीवमधून अर्चना पाटील, ओमराजे निंबाळकर यांनीही मतदान केलं.
जिल्हा परिषद शाळा क्रमांक 23, गोडोली सातारा येथे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी बजावला मतदानाचा हक्क.
दक्षिण सोलापुरातील गंगेवाडी येथील मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅट मशीनमध्ये बिघाड झाला आहे. यामुळे 15 ते 20 मिनिटांपासून मतदान प्रक्रिया थांबली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. अहमदाबादमधील निशन हायर सेकंडरी स्कूलमध्ये त्यांनी मतदान केलं. यावेळी अमित शाह देखील उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मतदानासाठी दाखल झाले आहेत. याठिकाणी अमित शाह यांनी त्यांचं स्वागत केलं.
सोलापुरातून प्रणिती शिंदे, राम सातपुते यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तर, कोल्हापुरातून शाहू महाराज छत्रपती यांच्या कुटुंबाने मतदान केलं. रायगडातून आदिती तटकरे यांनीही मतदानाचा हक्क बजावला.
अमित शाह हे अहमदाबादमधील निशन हायर सेकंडरी स्कूलमध्ये दाखल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी याठिकाणी आज मतदान करणार आहेत.
अजित पवार, सुनेत्रा पवार यांनी काटेवाडीमध्ये मतदानाचा हक्क बजावला आहे. तसंच, रोहित पवार यांनी बारामतीमध्ये मतदान केलं.
लोकसभा निवडणुकांसाठी आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. मोठ्या संख्येने लोकांनी बाहेर पडून मतदान करावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आज पंतप्रधान देखील मतदान करणार आहेत.
लातूरमधून अमित देशमुख यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी त्यांच्या पत्नीही त्यांच्यासोबत होत्या. तसंच साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांनीदेखील मतदानाचा हक्क बजावला आहे.
देशभरात ठिकठिकाणी तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. कित्येक उमेदवार देखील मतदानासाठी केंद्रांकडे निघाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह हेदेखील आज मतदान करणार आहेत. अजित पवार, उदयनराजे भोसले, सुशिलकुमार शिंदे असे कित्येक नेते देखील सकाळीच मतदानासाठी बाहेर पडले आहेत.
तिसऱ्या टप्प्यातील मतदानामध्ये केवळ राज्यातीलच नाही तर देशातील दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. सुप्रिया सुळे, धैर्यशील मोहिते-पाटील, सुनिल तटकरे, नारायण राणे, प्रणिती शिंदे, छत्रपती शाहू महाराज, उदयनराजे भोसले, अमित शाह, दिग्विजय सिंह, ज्योतिरादित्य शिंदे, शिवराज सिंह चौहान अशा कित्येक दिग्गजांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये कैद होणार आहे.
राज्यातील ११ जागांवर आज मतदान पार पडणार आहे. सकाळी सात वाजेपासून मतदानास सुरुवात होईल. यापूर्वी बारामतीमधील बूथ नंबर २२२ वर मॉक व्होटिंग पार पडलं.
तिसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील ११ मतदारसंघांमध्ये मतदान होईल. यासोबतच गुजरातमध्ये २५, उत्तर प्रदेशात १०, कर्नाटकमधील १४, मध्य प्रदेशातील ९, छत्तीसगडमधील ७, बिहारमधील ५, आसाममधील ४, पश्चिम बंगालमधील ४, गोव्यातील २ आणि दादरा नगर हवेली तसंच दमण-दीव या केंद्रशासित प्रदेशांमधील प्रत्येकी एका जागेवर आज मतदान पार पडणार आहे.
राज्यातील बारामती, सांगली, कोल्हापूर, रायगड, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, माढा, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि हातकणंगले या ११ मतदारसंघांतील उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामध्ये बंद होणार आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा तिसरा टप्पा आज पार पडत आहे. यासाठी ठिकठिकाणी मतदान केंद्रावंर तयारीला वेग आला आहे. महाराष्ट्रातील 11 जागांवर मतदान पार पडणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.