
Cheetah: मोदींनी आणलेल्या चित्त्यांच्या अभयारण्यात चर्चा भीषण कुपोषणाची
भोपाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मध्य प्रदेशातील श्योपूर जिल्ह्यातील कुनो नॅशनल पार्कमध्ये नामिबियातून आणलेले चित्ते सोडले आहेत. हवाई दलाच्या विशेष विमानाने नामिबियातून आठ चित्ते भारतात आणण्यात आले आहेत. या भागासाठी हे चित्ते वरदान ठरतील, असा दावा सरकार करत असताना कुनो नॅशनल पार्कच्या आसपासच्या भागातील वास्तव काही वेगळेच आहे. (kuno national park news in Marathi)
चित्त्यांच्या आगमनामुळे या परिसरात पर्यटन वाढेल, असे सरकारचं म्हणणे आहे. माध्यमांमध्ये देखील चित्त्यांचीच चर्चा आहे. मात्र जंगल आणि अभयारण्याच्या आसपासच्या गावांमध्ये कुपोषणाने आणि गरिबीने उच्चांक गाठला आहे. लोकांच्या हाताला रोजगार नाही. अर्थात श्योपूर जिल्ह्याला भारताचा इथिओपिया म्हणूनही ओळखलं जातं.
एका वृत्त वाहिनीने केलेल्या ग्राउंड रिपोर्टमधून ही बाब समोर आली आहे. चित्त्यांच्या आगमाणामुळे परिसराचा विकास होईल, असं म्हटलं जात असलं तर या प्रक्रियाला किमान २० ते २५ वर्षांचा कालावधी लागणार आहे. या चित्त्यांची संख्या वाढल्यानंतरच पर्यटन वाढेल आणि बदल घडू शकेल असं तज्ज्ञांच मत आहे.
श्योपूर जिल्ह्यात २१ हजारांहून अधिक बालके कुपोषणाने ग्रस्त आहेत. मध्य प्रदेश सरकारने विधानसभेत लेखी उत्तरात ही आकडेवारी दिली आहे. दोन आठवड्यांपूर्वी याच जिल्ह्यात एका मुलीचा कुपोषणाने मृत्यू झाला होता.
गावातील लोक सांगतात की, गावात रोजगार नसून कमालीची गरिबी आहे. मुले कुपोषित आहेत. याठिकाणी चित्ते सोडले याचा काही फायदा होईल का, असं विचारल्यानंतर ग्रामस्थ म्हणाले की, आम्हाला चित्त्यांपासून काहीही मिळणार नाही. कुनो नॅशनल पार्क ज्या भागात आहे, त्या परिसरातील सुमारे २३ गावे गरिबी आणि कुपोषणाने ग्रस्त आहेत. या गावांची लोकसंख्या सुमारे 56,000 आहे.