देश अन्नधान्य टंचाईच्या उंबरठ्यावर; ममता बॅनर्जी यांची भाजपवर टीका

mamata banerjee
mamata banerjee

राणाघाट (पश्‍चिम बंगाल) - कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे मोदी सरकार हटवादी भूमिकेतून पाहत असल्याने देश अन्नधान्य टंचाईच्या आणि दुष्काळाच्या उंबरठ्यावर असल्याची टीका काल पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली. भाजपचा पक्ष म्हणजे कचराकुंडी झाली असून या ठिकाणी निष्क्रिय, भ्रष्ट नेत्यांना सामील करुन घेत असल्याचीही टीका ममता बॅनर्जी यांनी केली. 

पश्‍चिम बंगालमध्ये राजकीय रणधुमाळीला वेग आला असून नादिया जिल्ह्यात आयोजित सभेत ममता बॅनर्जी यांनी भाजपवर हल्लाबोल केला. पश्‍चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपचा जेव्हा पराभव होईल, तेव्हा ट्रम्प समर्थकांप्रमाणेच गोंधळ घालतील, असेही त्यांनी भाकित केले. बहुतांश नेते केंद्रीय यंत्रणांच्या तपासाच्या भितीपोटी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. अनेकांनी पैसे कमावले असून त्यांना भाजप धमकावत आपल्या पक्षात घेत आहेत. भाजपला पश्‍चिम बंगालमध्ये किंमत राहिली नसून अन्य पक्षांच्या निष्क्रीय आणि भ्रष्ट लोकांना सामील करुन घेतले जात आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

निवडणुकीपूर्वी भाजपकडून नोकरीचे आश्‍वासन दिले जाते. सर्वांना नागरिकत्व देऊ असेही सांगतात. मात्र निवडणुकीनंतर ढोल वाजवून पळून जातात. बंगालमध्ये एनआरसी लागू करणार नाही, याचा पुनरुच्चार ममता यांनी केला. एनआरसी, एनपीआर आणि सीएए कायद्याला कोणीही घाबरण्याची गरज नाही, असेही त्या म्हणाल्या. कृषी कायद्यावरून केंद्र सरकारची भूमिका हटवादीपणाची असून त्यामुळे जीवनावश्‍यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

शेतकरी हे आपल्या देशाची संपत्ती असून त्यांना हानीकारक ठरणाऱ्या धोरणाला आपला विरोध असेल. केंद्र सरकारने तात्काळ कृषी कायदे परत घ्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दोन दिवसांपूर्वी आदिवासी कुटुंबाच्या घरी जेवण केले होते. यावर त्यांनी टीका करताना म्हटले की, ते जेवण केवळ देखावा होता. जेवणाचे सर्व पदार्थ हे पंचतारांकित हॉटेलमधून मागवले होते. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

भाजपकडून आरोपाचे खंडण
ममता बॅनर्जी यांच्या आरोपाचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी खंडण केले असून तृणमूल सरकारची घटका भरत आल्याचे हे त्यांच्या पक्षातील नेत्यांना कळून चुकले आहे. जर भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांना त्या भ्रष्ट म्हणत असतील तर तृणमूल कॉंग्रेस सरकारने इतक्या दिवस का कारवाई केली नाही?, असा सवाल घोष यांनी केला. 

आम्ही शेतकरी आणि त्यांच्या मागण्यांच्या पाठिशी आहोत. एकीकडे भाजप शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आम्हाला उपदेश करत आहे तर दुसरीकडे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा मानसिक छळ केला जात आहे. हरियाना आणि पंजाबमध्ये अनेक शेतकऱ्यांना मारहाण झाली आहे.
- ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री पश्‍चिम बंगाल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com