Modi will be the prime minister again Amit Shah expressed his belief
Modi will be the prime minister again Amit Shah expressed his belief

मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार; अमित शहा यांचा विश्‍वास

भाजपने दलित आणि आदिवासी यांचा सन्मान केला आहे, पक्षाच्या धोरणात त्यांना सर्वोच्च स्थान आहे

पाटणा - आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष हा मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत अधिक बहुमत मिळवत सत्तेत येईल आणि नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होतील, असा दावा भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पक्षाच्या सात आघाड्यांच्या संयुक्त राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये केला. हा विजय निश्‍चित करण्यासाठी बूथ स्तरापासून काम करा सुरु करा,’’ असे आवाहन शहा यांनी यावेळी केले.

बिहारमधील पाटण्यातील ‘ज्ञान भवन’ येथे भाजपच्या सात आघाड्यांच्या संयुक्त राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांसह अनेक वरिष्ठ नेत्यांनी या बैठकीला हजेरी लावत उपस्थितांना मार्गदर्शन केले. दोन दिवसीय बैठकीच्या समारोपाच्या सत्रामध्ये रविवारी संध्याकाळी केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी शहा म्हणाले, ‘‘भाजपने दलित आणि आदिवासी यांचा सन्मान केला आहे, पक्षाच्या धोरणात त्यांना सर्वोच्च स्थान आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळातच एक आदिवासी महिला देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होऊ शकल्या आहेत. जागतिक स्तरावर देशाची प्रतिष्ठा वाढली आहे.’’

समारोपाच्या सत्रात भाजपचे राष्ट्रीय जे. पी. नड्डा म्हणाले की, आमची लढाई ही काँग्रेसशी नसून घराणेशाही असलेल्या पक्षांशी आहे. भाजपने देशात एक नवी राजकीय संस्कृती रुजवली आहे. जेडीयू आणि भाजपमधील बेबनावाच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे सरचिटणीस अरुण सिंह यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्रपणे लढणार असल्याचे माध्यमांसमोर स्पष्ट केले.

शहा यांचे स्वागत करण्यासाठी नित्यानंद राय, संजय मयुख, संजय जैस्वाल यांच्यासारखे दिग्गज नेते विमानतळावर उपस्थित होते. मुख्यमंत्री हे कोरोना ने संक्रमित असल्याने गृह विलगीकरणात आहेत, त्यामुळे शहा आणि नितीशकुमार यांची भेट होणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

बैठकीत दोन ठराव मंजूर

या बैठकीच्या शेवटी दोन राजकीय ठराव मंजूर करण्यात आले. मोदी सरकारच्या कार्यकाळात दलित आदिवासी आणि मागास वर्गाचा सन्मान केला जात आहे, त्याबाबत सरकारच्या प्रयत्नांची माहिती घरोघरी पोचविण्यासाठी प्रयत्ने केले जाणार आहेत. तसेच स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला बळ देण्यासाठी १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान प्रचार मोहीम राबविली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com