शिवसेनेच्या वाचाळवीर नेत्यांना वेसण?

राज्यपालांच्या पत्रानंतर गृह मंत्रालय सक्रीय
paramilitary forces
paramilitary forcesSakal

नवी दिल्ली - एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील महाबंडखोरीनंतर महाराष्ट्रात ठीकठिकाणी शिवसैनिकांची संतप्त निदर्शने, तोडफोड आणि जाळपोळीचे प्रकार पाहता मुंबईसह राज्यात निमलष्करी दलांना पाचारण करावे, या राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या पत्ररुपी मागणी वा विनंतीला केंद्रीय गृहमंत्रालय सकारात्मक प्रतिसाद देण्याच्या मानसिकतेत आहे. साधारणता बंडखोर आमदार मुंबईत परत येतील त्याच सुमारास महाराष्ट्रात अर्ध सैनिक दलाच्या तुकड्या तैनात करण्याच्या दृष्टीने गृहमंत्रालयाच्या पातळीवर हालचाली सुरू झाल्याचे समजते.

दरम्यान शिवसेनेच्या वतीने भडक भाषणे करणाऱ्या नेत्यांना योग्य रितीने 'वेसण' घालण्याचीही प्रक्रिया दिल्लीच्या पातळीवर सुरू झाली आहे. विधानसभेतील प्रस्तावित शक्तिप्रदर्शन व त्याही आधी जेव्हा बंडखोर आमदार मुंबई मध्ये पुन्हा दाखल होतील, तेव्हा वादग्रस्त विधाने करणारे काही नेते,“बाहेर” रहाणे हे साऱ्या राज्याच्या कायदा-सुव्यवस्था परिस्थितीसाठी अत्यंत धोकादायक ठरेल, असे फीडबॅक केंद्रीय यंत्रणांना मिळाल्याचे समजते.

पूरग्रस्त आसामची राजधानी गुवाहाटीमध्ये पंचतारांकित हॉटेलात मुक्कामी थांबलेल्या सुमारे 50 बंडखोर आमदारांनाही राज्यात,आपापल्या मतदारसंघात परतण्याचे वेध लागले आहेत. अनेक आमदारांनी तशी मागणी शिंदे यांच्याकडे केली आहे. मात्र शिवसैनिकांच्या संतप्त आंदोलनांच्या पार्श्‍वभूमीवर या आमदारांचा जीव धोक्यात येईल असे पाऊल उचलण्यास भाजपचे सर्वेसर्वा नेतृत्व सध्या तयार नाही. दुसरीकडे यासंदर्भातील लढाई सर्वोच्च न्यायालयात पोहोचल्याने न्यायालयीन सुनावणीची कारवाईही सुरू झाली आहे. त्यामुळे या आठवडाभरात हे आमदार मुंबईत परतु शकतात काय, या दृष्टीने भाजप नेतृत्वाने चाचपणी सुरू केली आहे.

राज्यपाल कोशियारी यांनी काल रुग्णालयातून परतल्यावर राज्यातील कायदा-सुव्यवस्था परिस्थितीबाबत गंभीर चिंता व्यक्त करणारे आणखी एक पत्र केंद्रीय गृहसचिवांना लिहिले. त्यात त्यांनी संजय राऊत किंवा इतर शिवसेना नेत्यांचा नामोल्लेख केला नसला तरी काही नेत्यांकडून भडकाऊ आणि धमक्या देणारी भाषणे होत असल्यामुळे आपल्याला आपल्या कुटुंबियां बद्दल चिंता वाटते, असे गुवाहाटीतील शिवसेना, प्रहार जनशक्ति आणि अपक्ष मिळून 48 आमदारांनी आपल्याला कळविले आहे, असे नमूद केले.

मंत्री किंवा आमदार म्हणून आपल्या परिवाराला मिळणारी सुरक्षा राज्य सरकारने बेकायदेशीररित्या मागे घेतल्याचीही तक्रार आमदारांनी केल्याचे यापूर्वीच्या पत्रातच स्पष्ट केले होते. आमदार आणि त्यांच्या कुटुंबियांना तत्काळ पोलीस सुरक्षा प्रदान करावी असे निर्देश आपण यापूर्वीच दिल्याचेही राज्यपालांनी पत्रात म्हटले. दरम्यान राज्यपाल कोशियारी यांच्या पत्राची केंद्रीय गृहसचिव अजयकुमार भल्ला यांच्या पातळीवर गंभीर दखल घेण्यात आली आहे.

बंडखोर आमदारांविरुद्ध आक्रमक झालेले शिवसैनिक अनेक शहरांमध्ये तोडफोड करत आहेत व महाराष्ट्राचे पोलीस मूकदर्शक बनले आहे, असा गंभीर आरोप राज्यपालांनी केला आहे. त्यामुळेच हे आमदार जेव्हा प्रत्यक्ष मुंबईत परत येतील त्यावेळी त्यांच्या जिविताचे रक्षण व कायदा सुव्यवस्था परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, या दृष्टीने निमलष्करी दले मुंबई आणि राज्यात तैनात करण्याच्या दृष्टीनेही हालचाली सुरू झाल्या आहेत. साधारणतः या आठवडाभरात या टबाबत केंद्राकडून ठोस निर्णय गृहमंत्रालयाकडून प्रत्यक्ष अमलातही आणला जाणे शक्य आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com