नवी दिल्ली : बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबई कार्यालयावर आयकर विभगाने छापे टाकले आहेत. या धाडीदरम्यान आधिकऱ्यानी कर्मचाऱ्यांचे फोन ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. या छापेमारी मध्ये ५० हून अधिक आधिकरी आणि कर्मचारी सहभागी असल्याची माहिती समोर आली आहे.
या धाडीनंतर ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर आसूड ओढला आहे. प्रसार माध्यमावरील छापेमारी कुठल्या लोकशाहीमध्ये बसते? असा प्रश्न उपस्थित करीत माध्यमांचा गळा घोटण्याचं काम सुरु असल्याचं ठाकरे म्हणाले.
मुंबईतील शिवसेना भवन येथे रायगड येथील मुस्लिम कार्यकर्त्यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. ठाकरे पुढे म्हणाले की, आत्ताची लढाई ही स्वातंत्र्य टिकवण्याची लढाई आहे. कुणी म्हणत असेल की आम्ही हिंदुत्व सोडलं तर त्यांचं हिंदुत्व तपासून घेण्याची गरज आहे. मोहन भागवत जेव्हा मशिदीमध्ये जातात तेव्हा त्यांनी हिंदुत्व सोडलं होतं का? राष्ट्रीयत्व हेच आमचं हिंदुत्व आहे, असं म्हणत त्यांनी बीबीसीवर धाडीप्रकरणी केंद्रावर ताशेरे ओढले.
काही दिवसांपूर्वी बीबीसी या वृतसंस्थेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील वादग्रस्त माहितीपट (BBC Documentary On PM Modi) प्रदर्शित केला होता. त्यानंतर आता ही छापेमारी झाली आहे.
बीबीसी डॉक्यूमेंट्री वाद..
बीबीसीच्या ‘इंडिया: द मोदी क्वेश्चन्स ’ या डॉक्युमेंट्रीमुळे बीबीसी मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. या दोन भागांच्या डॉक्युमेंट्री मालिकेवर देशभरातूनही तिखट प्रतिक्रिया समोर आल्या होत्या. गुजरातमधील २००२ च्या दंगलींवर ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने (बीबीसी) बनविलेला माहितीपट म्हणजे निव्वळ "दुष्प्रचाराचा हिस्सा" आहे, अशा शब्दांत भारत सरकारने डॉक्युमेंट्रीवर ताशेरे ओढले होते. तसेच बीबीसीवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.