विकासाच्या मुद्द्यावर बोलण्याची गरज : संभाजीराजे

किरकोळ गोष्टींवरून वातावरण गढूळ करण्याचे प्रयत्न
sambhaji raje bhosle 1.jpg
sambhaji raje bhosle 1.jpgsakal

नवी दिल्ली : महाराष्ट्रात सध्या जे राजकारण सुरू आहे, ते छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्‍वर महाराज, शाहू-फुले-आंबेडकर यांनी निश्‍चितच आवडले नसते. हा महापुरुषांचा महाराष्ट्र आहे. विकासाच्या मुद्द्यांवर आपण बोलले पाहिजे. अन्य राज्ये महाराष्ट्राचा आदर्श कसा घेतील, याचा विचार केला पाहिजे. परंतु आपण किरकोळ गोष्टींवरून वातावरण गढूळ करून टाकत आहेत, अशी खंत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली.

मराठा सेवा संघाचे पहिले राष्ट्रीय महाअधिवेशन सुरू आहे. त्याच्या उद्‌घाटनाच्या कार्यक्रमानंतर खासदार संभाजीराजे माध्यमांशी बोलत होते. भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे, मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर, रेखा खेडेकर यांच्यासह संघाचे विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्रातील सध्याच्या राजकारणाबद्दल खासदार संभाजीराजे यांनी भाष्य करीत राजकारणाच्या बदललेल्या दिशेबद्दल खेद व्यक्त केला. तावडे म्हणाले, की मराठा सेवा संघ राष्ट्रीय स्तरावर आता विस्तार करतो आहे.

मराठा समाज, अठरा पगड जाती-समाजाच्या विकासासाठी राष्ट्रीय स्तरावरील नेता म्हणून सक्रिय भूमिका बजावेल. पुरुषोत्तम खेडेकर यांनी देखील महाराष्ट्रातील सद्यःस्थिती विषयी भाष्य केले. महाराष्ट्रच नव्हे; तर देशात आपले जे मूळ प्रश्‍न आहेत, ते सोडून विषयांतर करण्याची नवी पद्धत अवलंबिली जात आहे, असे ते म्हणाले. तसेच शिवाजी महाराजांचे लोककल्याणकारी काम हे त्यांचे अस्सल चरित्र लिहून ते सर्व भाषांमध्ये प्रसिद्ध करण्याची गरज आहे. त्यांच्या जीवनावर एक चांगला चित्रपट आला, तर लोकांच्या मनात ज्या शंका आहेत, त्या दूर होऊ शकतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. संभाजी ब्रिगेडवरील टीकेबाबत बोलताना खेडेकर म्हणाले, की बरळत राहणारे लोक बरळत राहतात. काही लोकांचा आम्हाला बदनाम करण्याचा हेतू कायम राहिला आहे. मराठा सेवा संघामुळे जातीयवाद कमी झाला, असे आम्ही म्हणू शकतो.

जुने मुद्दे उकरायला नको

बाबासाहेब पुरंदरे यांनी जेम्स लेन याला मदत केल्याचा आरोप केला जातो, या मुद्द्यावर खेडेकर यांनी भूमिका स्पष्ट केली. ‘जेम्स लेन प्रकरण आता कालबाह्य झाले आहे. पुरंदरे हे देखील गेले आहेत. मला असे वाटते की तेच तेच उकिरडे उकरत बसू नये. त्यापेक्षा शिवाजी महाराजांवरील अस्सल चरित्र लिहून घेतले पाहिजे,’ याचा पुनरुच्चार खेडेकर यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com