नवी दिल्ली : नायडूंनी वाढविली कामकाजाची टक्केवारी

राज्यसभाध्यक्षांच्या निरोप समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दाद
Venkaiah Naidu
Venkaiah NaiduVenkaiah Naidu

नवी दिल्ली : संवाद-संपर्क-समन्वय यांतून राज्यसभेची कामकाज टक्केवारी वाढवतानाच गदारोळ एका मर्यादेबाहेर केल्यास तो सभागृहाचा अवमान ठरतो ही भावना आपण कायम मांडली, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी मावळते उपराष्ट्रपती व राज्यसभाध्यक्ष एम. वेंकय्या नायडू यांना निरोप दिला.

देशाची स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाकडून सुवर्णमहोत्सवाकडे वाटचाल सुरू होताना राष्ट्रपती-उपराष्ट्रपती-पंतप्रधान -लोकसभाध्यक्ष या चारही पदांवरील व्यक्ती स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेल्या व अत्यंत सामान्य घरांतून आलेल्या आहेत, असे सांगून मोदी म्हणाले की, तुमच्या अनुभवांचा लाभ देशाला कायम मिळत राहील. राजकारणातून निवृत्त झालात तरी सार्वजनिक जीवनातून तुम्ही निवृत्त होणार नाही. तुम्ही उपराष्ट्रपती म्हणून सभागृहाबाहेर केलेली २५ टक्के भाषणे युवकांसाठी होती.

राज्यसभेतील विविध राज्यांच्या खासदारांना मातृभाषेतूनच संवाद साधता यायला हवा यासाठी नायडू यांनी धरलेल्या आग्रहाचा उल्लेख अनेक वक्त्यांनी केला. यासाठीच नव्हे तर विवध भाषांतील क्लिष्ट शब्दांना सोपे प्रतिशब्द शोधण्यासाठी नायडू यांनी समिती स्थापन केली. त्याचाही उल्लेख पंतप्रधान, उपाध्यक्ष हरिवंश व विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनीही केला.

मोदी म्हणाले की, राज्यसभाध्यक्ष म्हणून तुमचे सर्वांत उल्लेखनीय काम म्हणजे आठव्या परिशिष्टातील सर्व २२ भाषांमधील खासदारांना राज्यसभेत आपापल्या मातृभाषेत संवाद साधता यायला हवा यासाठी तुम्ही प्रयत्न केले. त्यासाठी तत्काळ अनुवाद सेवेचे आधुनिकीकरण केले. संसदेत प्रादेशिक भाषांबाबतचे असे ठोस प्रयत्न प्रथमच झाले.

जर आमच्याकडे देशासाठी भावना, आपले म्हणणे मांडण्याचा निर्धार, विविधतेवर विश्वास असेल तर भाषा ही कधीही भिंत बनत नाही हे तुम्ही सिद्ध केले. ज्या सभेत अनुभवी लोक असतात तीच खरी सभा असते व धर्म व कर्तव्य यांचे योग्य शिक्षण देतात तेच अनुभवी लोक असतात. तुम्ही तसेच असल्याने कधी कधी तुम्ही रागावले तरी कोणत्याही सदस्याने तुमच्याबद्दल गैरसमज करून घेतला नाही.

विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अनेक विरोधी नेत्यांनी नायडू यांच्यानंतर राज्यसभेच्या संचलनाचे चित्र कसे असेल याबाबत ‘आप के साथ ये मौसम मंझर था, आप के बाद मौसम बहोत सताएगा‘ अशी सूचक भावना व्यक्त केली. तीही चर्चेचा विषय ठरली. खर्गे यांनी लोकसभा व राज्यसभा दूरचित्रवाणी वाहिन्यांचे एकत्रीकरण करायला नको होते असे मत व्यक्त केले. ते म्हणाले की, सतत सर्वपक्षीयांशी समन्वय व चर्चा या मार्गाने तुम्ही गेलात.

तुम्ही जे मापदंड स्थापित केले ते यापुढेही संसद व देशाला मार्गदर्शक ठरतील. विद्यार्थी नेते, आंध्र प्रदेशात आमदार, कर्नाटकातून राज्यसभा खासदार, केंद्रीय मंत्री व राज्यसभाध्यक्ष अशा सर्व भूमिकांत वावरताना तुम्ही त्यांना न्याय दिला.‘ इतक्या दबावाखाली तुम्ही पाच वर्षे बजावलेले कर्तव्य स्तुत्य आहे, अशी टिपणीही त्यांनी केली.

वरिष्ठ सभागृहात पंतप्रधानांसह सुमारे ३० सर्वपक्षीय नेत्यांनी नायडू यांच्या कार्याचा गौरव केला. १९७१ मध्ये सार्वजनिक कारकिर्दीला सुरवात केलेल्या नायडू यांच्या रूपाने अटलबिहारी वाजपेयी व नरेंद्र मोदी या दोन सरकारांना सांधणारा भाजपमधील आणखी एक दुवा सक्रिय राजकारणातून लुप्त होणार आहे. आता स्वतः मोदी व राजनाथसिंह वगळता सध्याच्या एकाही केंद्रीय मंत्र्याने वाजपेयी-अडवानी युगात दिल्लीत पक्ष वा सरकार या पातळ्यांवर काम केलेले नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com