चार ट्रॅक, तीन ट्रेन आणि काही मिनिटांत अपघात! मुख्य कारण आले समोर, अनर्थ टाळता आला असता | Odisha Train Accident | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Odisha Train Accident

Odisha Train Accident: चार ट्रॅक, तीन ट्रेन आणि काही मिनिटांत अपघात! मुख्य कारण आले समोर, अनर्थ टाळता आला असता

Odisha Train Accident: ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 250 हून अधिक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे तर सुमारे एक हजार लोक जखमी झाले आहेत. तीन गाड्यांच्या या भीषण धडकेनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान हा अपघात कसा झाला, या प्राथमिक अहवाल समोर आला आहे. या तपास अहवालात भीषण घटनेमागे सिग्नलशी संबंधित बिघाड उघड झाला आहे.

मालगाडी बहनगा बाजार स्टेशनवर लूप लाइनमध्ये उभी होती. दरम्यान, चेन्नईहून हावडाकडे जाणारी १२८४१ कोरोमंडल एक्सप्रेस बहनगा बाजार स्थानकावर पोहोचली. दुसरी ट्रेन पास करण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर लूप लाइन आहे. बहनगा बाजार स्टेशनवर अप आणि डाऊन अशा दोन लूप लाइन आहेत. जेव्हा एखादी ट्रेन स्टेशनवरून पास करावी लागते तेव्हा कोणतीही ट्रेन लूप लाइनवर उभी केली जाते. (Odisha Train Accident Update)

बहनगा बाजार स्थानकावर कोरोमंडल एक्स्प्रेस आणि यशवंतपूर हावडा एक्स्प्रेस पास करण्यासाठी, मालगाडी सामान्य लूप लाइनवर उभी करण्यात आली. कोरोमंडल एक्स्प्रेस मुख्य अप मार्गावरून भरधाव वेगाने जात होती. त्यावेळी यशवंतपूर-हावडा एक्स्प्रेसही डाऊन मार्गावरून जात होती.

बहनगा बाजार स्थानकावर या गाड्यांना थांबा नाही. अशा स्थितीत दोन्ही गाड्यांचा वेग जास्त होता. बहनगा बाजार स्थानकावरून जाणारी कोरोमंडल एक्स्प्रेस अचानक रुळावरून घसरली. रुळावरून घसरलेल्या कोरोमंडल एक्सप्रेसचे काही डबे मालगाडीला धडकले. अपघाताच्या वेळी डाऊन मार्गावरून जाणाऱ्या यशवंतपूर-हावडा एक्स्प्रेसच्या मागचे दोन डबे रुळावरून घसरलेल्या ते कोरोमंडल एक्स्प्रेसला धडकले. त्यामुळे मोठा अपघात झाला आहे.

अपघात कधी झाला?

चेन्नईला जाणारी कोरोमंडल एक्सप्रेस पश्चिम बंगालमधील हावडा जंक्शन येथून दुपारी 3.20 वाजता सुटते. ट्रेन ओडिशाच्या बालासोर रेल्वे स्थानकावर संध्याकाळी 6.30 वाजता पोहोचते, जिथे ती पाच मिनिटे थांबते. ट्रेन बालासोर जिल्ह्यातील बहनगा बाजार स्टेशनजवळ संध्याकाळी 6.55 वाजता पोहोचली. त्यावेळी मालगाडीवर धडकली. त्यावेळी संध्याकाळी 7 वाजता पलीकडून बंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस जाणार होती. कोरोमंडल एक्सप्रेसचे डबे बंगळुरू-हावडा एक्सप्रेसच्या रुळांवरून घसरले. त्यामुळे बंगळुरू-हावडा एक्स्प्रेस या डब्यांना धडकली. या धडकेमुळे बंगळुरू-हावडा एक्स्प्रेसचे तीन सामान्य वर्गाचे डबे पूर्णपणे रुळावरून घसरले.

अपघातामागे दोन कारणे -

या अपघातामागे दोन कारणे असल्याचे रेल्वे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पहिली - मानवी चूक आणि दुसरी - तंत्रज्ञानातील चूक. या अपघातामागे तांत्रिक बिघाड हे मुख्य कारण असल्याचे अद्याप मानले जात आहे. अपघात झाला तेव्हा सिग्नलिंग यंत्रणा सक्रीय असती तर कोरोमंडल एक्स्प्रेस थांबवता आली असती.

कारण, ड्रायव्हर कंट्रोल रूमच्या सूचनेनुसार ट्रेन चालवतो आणि ट्रॅकवरील ट्रॅफिक पाहून कंट्रोल रूमकडून सूचना दिल्या जातात. अशा स्थितीत अपघाताची माहितीही नियंत्रण कक्षापर्यंत पोहोचणे अपेक्षित आहे. मात्र, ही माहिती नियंत्रण कक्षापर्यंत पोहोचण्यास लागणारा वेळ हा अपघात रोखण्यात मोठा घटक ठरू शकला असता.