लशीकरणानंतरही कोरोना होतो? केंद्र सरकारने दिलं उत्तर

लशीकरणानंतरही कोरोना होतो? केंद्र सरकारने दिलं उत्तर

नवी दिल्ली : देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मोठा हाहाकार माजवला आहे. देशात सुमारे चार लाखांहून अधिक रुग्णसंख्या आढळत असून ही मोठी चिंतेची बाब मानली जात आहे. कोरोनाचे नवे व्हेरियंट सध्या देशात पसरले असून त्यांचं जीवघेणं थैमान आरोग्य व्यवस्थेच्या मुळावर उठलेलं दिसून येत आहे. दुसऱ्या बाजूला भारतात लशीकरणाची मोहिम देखील सुरु करण्यात आली आहे. भारतात आतपर्यंत सुमारे 13 कोटींहून अधिक लोकांना कोरोनाची लस दिली गेली आहे. मात्र, कोरोना लस दिलेले हे नागरिक आता कोरोनापासून पूर्णपणे सुरक्षित झाले आहेत का? लशीकरणानंतरही काही जणांना कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग होत असल्याचं चित्र दिसून येत आहे. खरंच लशीकरणानंतर कोरोनाचा संसर्ग होतो का? याबाबत आता थेट केंद्र सरकारनेच स्पष्टीकरण दिलं आहे.

लशीकरणानंतर देखील कोरोनाचा प्रादुर्भाव होतो का?

भारत सरकारच्या प्रेस इन्फोर्मेशन ब्युरोने अर्थात PIB ने आपल्या ट्विटर हँडलवरुन याबाबतची माहिती दिली आहे. कोरोनाची लस घेतल्यानंतर देखील कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो का, याबाबतचं स्पष्टीकरण देताना PIB ने म्हटलंय की, हो! लशीकरणानंतर देखील काहींना कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो आणि होत आहे. लस घेतलेल्या अनेकांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह येत आहे. मात्र, त्यांच्यात दिसून येणारी लक्षणे सौम्य आहेत, असंही यामध्ये म्हटलं आहे.

मात्र, पुढे यात म्हटलंय की, कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लशीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. लस घेतलेल्यापैंकी 0.03-0.04 टक्के लोकांना कोरोनाचा प्रादुर्भाव होत आहे. मात्र, त्यांच्यातील लक्षणे अत्यंत सौम्य आहेत. तसेच लशीकरणाचा परिणाम म्हणून त्यांच्यात दिसून येणारे परिणाम देखील फारसे जाणवून येत नाहीत. मात्र म्हणूनच लस घेतलेल्या नागरिकांनी देखील कोरोना नियमांचं पालन करायचेच आहे. ते करणं गरजेचं असल्याचं PIB ने नमूद केलं आहे.

WHO चं काय आहे म्हणणं?

याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने (world health organization) म्हटलंय की, कोरोना लशीकरणानंतर अनेक लोक आजारी पडत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. परंतु केंद्राने मंजुरी दिलेल्या कोणत्याही लशीमध्ये कोरोना विषाणू पसरण्यास कारणीभूत घटक नाहीत, त्यामुळे कोरोनाविरोधी लस आपल्याला कोरोना संसर्ग होण्यापासून वाचवत आहे. लशीकरणानंतर शरीरात कोरोनाविरोधात लढण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी काही आठवड्यांचा कालावधी लागतो, त्यामुळे लशीकरणानंतर आणि आधीही कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे लशीकरणानंतर आजारी पडू शकता. कारण लसी घेतल्यानंतर संरक्षण पुरविण्यासाठी पुरेसा वेळ लागत आहे. असे WHO ने स्पष्ट केले.

रविवारी रुग्णसंख्येत घट

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं (Union Health Ministry) सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी देशात तीन लाख 66 हजार 161 नवीन रुग्ण आढळले आहेत. बुधवार ते शनिवार लागोपाठ चार दिवस दररोज 4 लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळले होते. आज, रविवारी देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट पाहायला मिळाली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, रविवारी देशात तीन लाख 66 हजार 161 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर तीन लाख 53 हजार 818 रुग्णांनी कोरोनावर मात केली. याच कालावधीत तीन हजार 754 रुग्णांचा मृत्यू झालाय. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दोन कोटी 26 लाख 62 हजार 575 इतकी झाली आहे. देशात आतापर्यंत एक कोटी 86 लाख71 हजार 222 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. याच कालावधीत देशात आतापर्यंत दोन लाख 46 हजार 116 जणांचा कोरोनामुळे झालाय. देशात सध्या 37 लाख 45 हजार 237 रुग्ण उपचाराधीन आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com