कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना स्वातंत्र्य; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही

कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना स्वातंत्र्य; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही

नवी दिल्ली - यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी क्षेत्र व शेतकऱ्याला आणखी मजबूत करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना आणखी स्वातंत्र्य मिळेल, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज या  कायद्यांची पुन्हा पाठराखण केली. गेली अनेक दशके अर्थसंकल्प म्हणजे मतपेढीच्या हिशोबाचे चोपडे बनले होते, असे सांगून त्यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले.

नवे कृषी कायदे रद्द केले जावेत म्हणून दिल्लीच्या सीमांवर आंदोलकांकडून व संसदेत विरोधकांकडून सरकारवर जबरदस्त दबाव आला असतानाही पंतप्रधान मात्र पूर्वीच्याच भूमिकेवर ठाम असल्याचे दिसून येते. राष्ट्रपती अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावावरील चर्चेला ते उद्या (ता.५) संसदेत (राज्यसभा) उत्तर देतील तेव्हाही सरकारची हीच भूमिका अधोरेखित होईल असे मानले जाते. 

राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली झालेल्या चौरीचौरा सत्याग्रहाच्या शताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करताना मोदींनी अर्थकल्पात सर्वसामान्यांवरील कराचा बोजा न वाढविल्याबद्दल अर्थमंत्र्यांची प्रशंसा केली. चौरीचौरा घटनेतील हुतात्म्यांना आदरांजली वाहताना मोदी म्हणाले की, ‘‘ नव्या कायद्यांमुळे शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे. देशाच्या प्रगतीचा शेतकरी हाच सर्वांत मोठा आधार आहे. त्यामुळे अर्थसंकल्पातही कृषी क्षेत्राच्या बळकटीसाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यापूर्वी अर्थसंकल्प म्हणजे कोणाच्या नावाने किती घोषणा केल्या इतकाच अर्थ होता. आम्ही तो बदलला आहे व सामान्यांच्या जीवनात त्याचे सकारात्मक प्रतिबिंब पडू लागले आहे. कोरोना काळात आम्ही ज्या आव्हानांचा मुकाबला केला ती पेलण्यासाठी व विकासाचे लक्ष्य वेगाने पूर्ण करण्यासाठी यंदाचा अर्थसंकल्प बळ देणारा आहे. वाढीव वित्तीय तरतुदीचा मोठा भाग रस्ते विकासासाठी वापरण्यात येणार आहे.’’

युवकांना नव्या संधी
बाजार समित्या आणि गावे यांना जोडण्यासाठी रस्त्यांचा विकास होत आहे. पूल व नवीन रेल्वेमार्गही निर्माण करण्यात येतील यातून रोजगारही वाढतील, असा दावा त्यांनी केला. शिक्षण क्षेत्राचा दर्जा वाढविण्यासाठी तरतूदही वाढविण्यात आली आहे. युवकांना रोजगाराच्या व व्यवसायाच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठीच्या तरतुदींमुळे आगामी काळात लाखो युवकांना नव्या संधींची दारे खुली होतील अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com