

नवी दिल्ली : सभागृहातील वर्तनावरून लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी काल विरोधी पक्षनेते राहुल गांधींना समज दिल्याच्या घटनेचे पडसाद आजही उमटले. विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीतील पक्षांच्या लोकसभेतील गटनेत्यांच्या शिष्टमंडळाने आज लोकसभाध्यक्षांची भेट घेऊन विरोधी पक्षनेत्यांना बोलण्याची संधी नाकारल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच या प्रकारावर सत्ताधाऱ्यांकडून राजकारण केले जात असल्याचा तक्रारीचा सूरही विरोधकांनी लावला.