काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कोरोना संदर्भात पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं आहे. या पत्रात राहुल गांधी यांनी म्हटलं की, देशात कोरोना म्युटेशनला सतत ट्रॅक करायला हवं.
नवी दिल्ली - काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कोरोना संदर्भात पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं आहे. या पत्रात राहुल गांधी यांनी म्हटलं की, देशात कोरोना म्युटेशनला सतत ट्रॅक करायला हवं. सर्व म्युटेशनवर लवकरात लवकर उपलब्ध असलेल्या लशींची चाचणी घ्यावी. देशातील सर्वांना जितक्या लवकर होईल तेवढं लस देण्याची सोय करा अशी मागणीही राहुल गांधी यांनी पत्रातून केली आहे.
राहुल गांधी यांनी मोदींना पत्र लिहून असा आरोपसुद्दा केला की, सरकारच्या अपयशामुळे देश पुन्हा एकदा देशव्यापी लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर उभा आहे. अशा परिस्थितीत गरीबांना तात्काळ आर्थिक मदत द्यायला हवी. गेल्या वर्षीप्रमाणे त्यांचे हाल होऊ नयेत असंही राहुल गांधींनी म्हटलं आहे.
मी पुन्हा पत्र लिहिण्यासाठी हतबल झालो कारण देश कोरोनाच्या विळख्यात अडकला आहे. अशा प्रकारच्या संकटात भारताचं प्राधान्य हे नागरिक असायला हवेत. मी तुम्हाला विनंती करतो की, देशातील लोकांना वाचवण्यासाठी जे काही शक्य होईल ते करा. जगातील प्रत्येक सहा लोकांमागे एक भारतीय व्यक्ती आहे. या साथीमधून आता असं दिसत आहे की, आपल्या देशाचा आकार, विविधता यामुळे कोरोनाला अनुकूल असं वातावरण बघायला मिळालं आहे. कोरोनाने अनेक रुपं बदलली असून धोकादायक स्वरुपात समोर आला आहे. मला या गोष्टीची भीती आहे की, ज्या डबल म्यूटंट आणि ट्रिपल म्युटंटला आपण पाहतोय ती एक सुरुवात असू शकतो.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.