श्रीनगर : ‘‘ जम्मू-काश्मीरवर केंद्र सरकार घाला घालत आहे, अशी टीका करीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारत सरकारने जम्मू-काश्मीरला संपूर्ण राज्याचा दर्जा देऊन तेथे स्वतंत्र व निष्पक्ष पद्धतीने निवडणूक घ्यावी,’’ अशी मागणी मंगळवारी केली. राहुल गांधी हे काल दोन दिवसांच्या काश्मीर दौऱ्यावर आले होते.त्यांनी आज गंडरबल येथील भवानी मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी दल सरोवरानजीकच्या हजरतबल दर्ग्यालाही भेट दिली. श्रीनगरमध्ये नव्याने बांधलेल्या काँग्रेस भवनचे उद्घाटन राहुल गांधी यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना त्यांनी भाजप व केंद्र सरकारवर कडाडून टीका केली. ते म्हणाले, ‘‘मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आणि भारतात फूट पाडणाऱ्या त्यांच्या धोरणांविरोधात लढत आहे. यात विजय मिळेपर्यंत आपण ही लढाई लढणार आहोत. केवळ जम्मू-काश्मीरच नाही तर देशातील तमिळनाडू, पश्चिम बंगाल व अन्य राज्यांवरही अन्याय होत आहे. पण जम्मू-काश्मीरवर प्रत्यक्ष अन्याय होत असून अन्य राज्यांवर अन्याय केला जात आहे. जम्मू-काश्मीरबाबत काँग्रेसशी भूमिका स्पष्ट आहे. संपूर्ण राज्याचा दर्जा देऊन येथे स्वतंत्र, निष्पक्ष आणि पारदर्शी पद्धतीने विधानसभा निवडणूक घ्यावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
जम्मू-काश्मीरला पुन्हा संपूर्ण राज्याचा दर्जा देण्यासाठी पुढील तीन दिवसांत संसदेत विधेयक मांडण्याची सूचना काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी केली. त्यावर बोलताना राहुल म्हणाले की, मला संसदेत बोलू दिले जात नाही. राफेल, बेरोजगारी आणि भ्रष्टाचारावर मी बोलू शकत नाही. त्यांनी (भाजप) न्यायव्यवस्था, लोकसभेवरही घाला घातला आहे. माध्यमांचा आवाजही त्यांनी दाबला आहे. पत्रकार त्यांच्या इच्छेनुसार लिहू शकत नाही. जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसचे सरकार सत्तेवर असताना ‘उडान’सारख्या प्रमुख योजना अमलात आणल्या होत्या आणि पंचायत निवडणुकाही होत होत्या. काश्मीर विद्यापीठात आम्ही अनेक तज्ज्ञांना पाचारण केले. तसेच काश्मिरी युवकांना देशातील अन्य राज्यांमध्ये पाठविले जात असे. मात्र भाजपने या प्रक्रियेवरही खोडा घातला, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
काश्मिरी नागरिकांना साद घालताना राहुल यांनी त्यांच्या कुटुंबाचे काश्मीरशी असलेले नाते उलगडले. ‘‘सध्या आमचे कुटुंब दिल्लीत राहत आहे. त्यापूर्वी अलाहाबाद आणि त्याच्याही आधी काश्मीरमध्ये वास्तव्यास होते. काश्मीरियत माझ्या नसानसांत आहे. जम्मू-काश्मीरच्या जनतेचे दुःख मी जाणू शकतो. प्रेम व
आदराच्या पायावर संबंध तयार करण्यासाठी मी तुमच्याबरोबर आहे,’’ असा ग्वाही त्यांनी दिली. मी जम्मू आणि लडाखलाही भेट देणार आहे. ही माझी सुरुवात आहे. ३७० वे कलम रद्द केल्यानंतर आणि कोरोना काळात मी येथे येण्याचा प्रयत्न, पण मला प्रत्येक वेळी अडविण्यात आले, असे ते म्हणाले.
पाँडेचरी आणि दिल्लीसारखे सरकार जम्मू-काश्मीरमध्ये आम्हाला नको आहे. नायब राज्यपालांनी राज्य चालविणे आम्हाला मान्य नाही. हे सीमेवरील राज्य आहे आणि येथील कायदा व सुव्यवस्था नायब राज्यपाल पाहू शकत नाही. केवळ स्थानिक मुख्यमंत्रीच राज्याचा कारभार पाहू शकतो.
- गुलाम नबी आझाद, ज्येष्ठ नेते, काँग्रेस
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.