'शेतकरी देणार संसदेला धडक'; संयुक्त किसान मोर्चाचा सरकारला कडक इशारा

Farmers Protest
Farmers Protest

नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर गेल्या चार महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी पुढील दोन महिन्यांसाठीचा लढ्याचा आराखडा आज जाहीर केला आहे. मे महिन्यात भर उन्हामध्ये पायी चालत संसद भवनाच्या दिशेने कूच करण्याचा निर्धार संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांनी बोलून दाखविला. मोर्चाच्या नेत्यांमध्ये कालच खलबते झाली होती. या बैठकीमध्येच संसद भवनाला धडक देण्याचा निर्धार करण्यात आला. या आंदोलनाची तारीख मात्र अद्याप निश्‍चित करण्यात आलेली नाही. शेतकरी नेते गुरनामसिंग चढुनी म्हणाले की, या मोर्चामध्ये केवळ शेतकरीच नाही तर महिला आणि बेरोजगार तरुण देखील सहभागी होणार आहेत. हे आंदोलन पूर्णपणे शांततेत होईल.

२६ जानेवारीच्या दिवशी जो प्रसंग घडला होता तो पुन्हा होऊ नये म्हणून विशेष काळजी घेण्यात येईल, असेही त्यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितले. या मोर्चादरम्यान पोलिसांनी कारवाई केली तर जमाव बिथरू नये म्हणून वेगळी समिती स्थापन करण्याचा मुद्दाही काही शेतकरी नेत्यांनी या बैठकीमध्ये मांडला होता. याशिवाय आंदोलनकर्ते शेतकरी 10 एप्रिलला 24 तासांसाठी केएमपी एक्स्प्रेसवे थांबवणार आहेत.

वाहतूक रोखून धरणार
आता दहा एप्रिल रोजी या शेतकरी संघटना चोवीस तासांसाठी कुंडली- मानेसर- पलवाल या एक्स्प्रेस वेवरील वाहतूक रोखून धरणार आहेत. सकाळी अकराच्या सुमारास हे आंदोलन सुरू होईल ते दुसऱ्या दिवशी अकरापर्यंत चालेल. सरकार आमच्या मागण्या मान्य करत नसल्याने आम्ही हे पाऊल उचलत आहोत, असे शेतकरी नेत्यांनी सांगितले. या आंदोलनामध्ये हुतात्मा झालेल्या शेतकऱ्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी ६ मे रोजी विशेष कार्यक्रमाचेही आयोजन केले जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com