‘फिनटेक’ने स्वनियामक यंत्रणा उभारावी - शक्तिकांत दास

शक्तिकांत दास : उद्योगाचा महसूल २०० अब्ज डॉलरपर्यंत वाढणार
set up self regulatory organisation to manage sector better rbi shaktikanta das to fintechs
set up self regulatory organisation to manage sector better rbi shaktikanta das to fintechsSakal

नवी दिल्ली : देशातील फिनटेक उद्योग वेगाने वाढत आहे, त्यामुळे या उद्योगातील कंपन्यांनी स्वनियामक यंत्रणा निर्माण करावी, असा सल्ला रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिला आहे. ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट’मध्ये ते बोलत होते.

‘‘या उद्योगाचा महसूल २०३० पर्यंत २०० अब्ज डॉलरपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. वाढीची मोठी संधी असलेल्या या उद्योगाच्या सुव्यवस्थित विकासासाठी अशी यंत्रणा महत्त्वाची आहे,’’ असे मत दास यांनी व्यक्त केले.

दास पुढे म्हणाले, ‘‘सुशासन ही कोणत्याही कंपनीच्या आणि विशेषतः फिनटेक कंपन्यांच्या शाश्वत आणि दीर्घकालीन यशाची गुरुकिल्ली असते. त्यामुळे फिनटेक कंपन्यांनी या क्षेत्रातील चुकीच्या पद्धती, किंमतीतील पारदर्शकता,

गोपनीयता आणि डेटा संरक्षणाच्या समस्या टाळण्यासाठी उद्योगातील सर्वोत्तम पद्धती विकसित करणे आवश्यक आहे. त्याकरिता स्वनियामक यंत्रणा (एसआरओ) स्थापन करावी. या प्रक्रियेसाठी भारतीय रिझर्व्ह बँक सर्व मदत करण्यास तयार आहे.’’ पुढील वर्षापर्यंत या उद्योगाची अशी यंत्रणा तयार होईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

इतर उद्योगांमध्येही अशा स्वनियामक यंत्रणा आहेत, असे सांगून दास म्हणाले, की अशी यंत्रणा उपलब्ध असल्याने या क्षेत्रातील कंपन्यांना त्यांच्या समस्या मांडण्यास मदत होईल. एक हक्काचे व्यासपीठ मिळेल आणि रिझव्‍‌र्ह बँकेच्‍या खांद्यावरून या वेगाने वाढणाऱ्या क्षेत्राचे नियमन करण्‍याचा भार कमी होईल. नियामक यंत्रणा कायद्यांचे पालन करण्यासाठी, नियमांचा अवलंब करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात, असेही ते म्हणाले.

दास म्हणाले, ‘‘फिनटेक कंपन्या ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्टार्टअपचा समावेश आहे, त्यांनी ग्राहकांच्या गरजा समजून घेऊन, ग्राहकांच्या हिताचे रक्षण करणाऱ्या तरतुदी करून आणि त्यांचा विश्वास संपादन करून नावीन्यपूर्णतेवर भर देणारा ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन स्वीकारणे महत्त्वाचे आहे.’’

रिझर्व्ह बँक फिनटेक परिसंस्थेला चालना देण्यासाठी आवश्यक नियामक आणि इतर धोरणात्मक उपाय यापुढेही चालू ठेवेल, असेही दास यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, फिनटेक कन्व्हर्जन्स कौन्सिलचे सहअध्यक्ष श्रीनिवास जैन यांनी या क्षेत्रात स्वयंनियामक यंत्रणा लवकरात लवकर लागू करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

उद्योगाच्या विकासासाठी सूचना

  • स्वनियामक यंत्रणा (एसआरओ) स्थापन करावी

  • सुशासन ही कंपनीच्या शाश्वत आणि दीर्घकालीन यशाची गुरुकिल्ली

  • नावीन्यपूर्णतेवर भर देणारा ग्राहककेंद्रित दृष्टिकोन आवश्यक

  • कंपन्यांना समस्या मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपयुक्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com