Sharad Pawar: सोडून गेलेल्यांबाबत तडजोड नाही, पवार थेटच बोलले; वाचा महत्वपूर्ण मुलाखत

Sharad Pawar interview
Sharad Pawar interviewsakal

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीबरोबरच देशपातळीवरील ‘इंडिया आघाडी’चेही आधारस्तंभ आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘सकाळ माध्यम समूहा’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी देशपातळीवरील राजकारण, अजित पवार यांचे बंड, पवार कुटुंबात पडलेली फूट अशा विविध प्रश्नांना मोकळेपणाने उत्तरे दिली.

- विजय चोरमारे

एक मे रोजी तुमच्या राजकीय प्रवासाला ६१ वर्षे पूर्ण झाली. याकडे मागे वळून बघताना काय वाटते?

- तुम्ही साठ वर्षांच्या प्रवासाची आठवण करून दिली आणि साठी झाल्यानंतर अजून डोकं जाग्यावर आहे, याचा मला मनापासून आनंद आहे. सुरुवातीचा काळ पुण्यात, नंतर महाराष्ट्रात तरुणांचे संघटन यामध्येच माझे लक्ष केंद्रित होते. नंतरच्या काळामध्ये विधिमंडळात जाण्याची संधी मिळाली. नंतरच्या काळात प्रशासनात काम करण्याची संधी मिळाली. जवळपास पंचवीस-तीस वर्षे राज्यमंत्री, मंत्री, मुख्यमंत्री, कधी भारत सरकारमध्ये मंत्री, विरोधी पक्षनेता अशा सर्व पातळ्यांवर काम करण्याची संधी मिळाली. आता मी संसदेत आहे. पण नवीन पिढी कशी तयार होईल, असा माझा आताचा दृष्टिकोन आहे.

Sharad Pawar interview
Sharad Pawar: शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांना धडकल्या, मोठा अनर्थ टळला!

वर्षभरापूर्वी तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी राजीनामा मागे घेतला नसता तर आजचे राजकीय चित्र वेगळे असते असे वाटते का?

- गेले काही वर्षे मी नेतृत्व करण्यासाठी नवी ‘टीम’ तयार करीत होतो. त्या ‘टीम’च्या हातात काम सोपवावे असा उद्देश राजीनाम्यामागे होता; परंतु माझी एक चूक झाली. हा निर्णय घेतल्यानंतर परिस्थिती काय होईल, लोकांची प्रतिक्रिया काय येईल, याचा अभ्यास, विचार मी केला नाही. माझा निर्णय घेताना मी कुणाशी बोललो नव्हतो. काही सहकाऱ्यांशी, ज्येष्ठ सहकाऱ्यांशी सुसंवाद साधण्याची आवश्यकता होती, तसे झाले नाही. त्यामुळे प्रतिक्रिया काय येईल याचा अंदाज आला नाही आणि तो राजीनामा मागे घ्यावा लागला.

एवढ्या मोठ्या संख्येने सहकारी सोडून जातील असे वाटले होते का? कुणाच्या जाण्याचे जास्त आश्चर्य वाटले?

- संपूर्ण विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच आश्चर्य वाटले. हा सबंध पक्ष आम्ही लोकांनी उभा केला, कष्टाने लोक तयार केले होते. ते काही एका दिवसात झालेले नाहीत. वर्षानुवर्षे त्यांच्यावर लक्ष केंद्रित केले, त्यांना संधी दिली, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आम्ही दौरे केले. त्यांनीही कष्ट केले. त्यामुळे ही सपूर्ण ‘टीम’ तयार झाली. ही सगळी ‘टीम’ घेऊन पुन्हा काही उद्दिष्ट ठेवून काम करायचे होते. ‘सत्तेच्या भोवती, सत्तेशिवाय नाही’ हा विचार सगळ्यांनी जेव्हा केला, त्यावेळी मला अस्वस्थता वाटली.

अजित पवारच तुमच्याविरुद्ध बंड करतात आणि तुमच्यावर कठोर टीका करतात, याकडे तुम्ही कसे बघता?

- याचा अर्थ सुरुवातीपासून त्यांच्या मनात होते, ते आता बाहेर येत आहे. आता ते सातत्याने जे बोलताहेत त्याच्यातून ही गोष्ट स्पष्ट होते की, आज घेतलेली भूमिका तेव्हाच घेण्याची त्यांची इच्छा होती. पक्ष उभा केला तो हातात घेण्याची त्यांची इच्छा होती. इच्छा असणे याच्यात काही चुकीचे नाही. पक्ष चालवताना अनेक गोष्टींकडे बघावे लागते. राज्याकडे, देशाकडे व्यापक दृष्टीने विचार करावा लागतो. सुसंवाद ठेवावा लागतो. वाचन करावे लागते. या सगळ्या गोष्टी ते कितपत करतात याबद्दल मला माहिती नाही. पण या सगळ्या गोष्टी करून राजकारण केले तर लोकांशी सुसंवाद राहत असतो. त्यात कितपत त्यांना यश येईल, हे मी सांगू शकत नाही.

Sharad Pawar interview
Sharad Pawar Exclusive Interview: अजितदादांनी बंड का केलं? पवारांची बेधडक मुलाखत...

अजित पवार सोडून गेल्यानंतर सुप्रिया सुळे यांची खासदारकी धोक्यात आली, असे तुम्हाला कधी वाटले का ?

- साधी सरळ गोष्ट दिसत होती की, उद्या निवडणुकीला त्रास होईल. आणि लोकशाहीमध्ये त्रास होतोच. लोकांच्यासमोर गेल्यावर वस्तुस्थिती कळते. या मतदारसंघात अनेक वर्षे आम्ही काम केले आहे. सुसंवाद आहे मतदारांशी. गेल्या पंधरा वीस वर्षांत तिथले सगळे राजकारण अजितकडे सुपूर्द करून मी स्थानिक राजकारणातून बाजूला झालो आणि राष्ट्रीय पातळीवरील राजकारणामध्ये लक्ष केंद्रित केले. त्यामुळे खालची जबाबदारी विचारपूर्वक सोपवल्यानंतर त्यांनी वेगळी भूमिका घेतली तर त्याची फारशी चिंता नसते, कारण आपण जाणीवपूर्वक त्यांना हा अधिकार दिलेला असतो.

आता स्थानिक पातळीवर सहकारी सोसायट्या, ग्रामपंचायतींपासूनच्या राजकारणात लक्ष घालणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी काही भाषणांत सांगितले आहे. तुम्ही तसे लक्ष घालणार आहात का?

- हो. कारण मला ही नवी पिढी अस्वस्थ दिसते. जे काही पक्षामध्ये झाले, याच्यात दोन घटक मला अस्वस्थ दिसतात- माझ्यावेळची ज्येष्ठांची पिढी आणि आताची तरुण पिढी. आज मी राज्यभर जातो, अक्षरशः हजारो तरुण आमच्यासोबत असतात. ही तरुणपिढी एकत्र येते, आस्था दाखवते. त्यांचे भवितव्य चांगले कसे राहील यासाठी त्यांचे नेतृत्व तयार करणे ही माझी जबाबदारी आहे. महाराष्ट्रात एक नवीन नेतृत्वाचा वर्ग तयार करणे, ही महाराष्ट्राची गरज आहे. त्याच्यावर लक्ष केंद्रित करणे अशी माझी भूमिका आहे आणि त्या दिशेने मी काम करणार. ज्यांच्यात कुवत असेल त्या सगळ्यांना मोठे करायचे.

Sharad Pawar interview
Sharad Pawar: मोदींची वाटचाल हुकूमशाहीकडे; विरोधकांना संपविण्यासाठी.. पवारांचा थेट आरोप

बारामतीतून सुनेत्रा पवार यांची उमेदवारी हा अजित पवार यांचा निर्णय असावा, की भाजपने त्यासाठीची सक्ती केली असावी?

- मला सत्ताधारी पक्षाचे दिल्लीतले काही लोक सांगतात की, त्यांना सांगण्यात आले की, यांना उभे करा. त्यांच्याबद्दल ज्या काही गोष्टी त्यांनी त्रास देण्यासाठी राखून ठेवल्या, या सगळ्यातून वाचायचे असेल तर तीन-चार गोष्टी केल्या पाहिजेत. त्यात पक्षातून बाहेर पडा, पक्ष ताब्यात घ्या, यांना एकटे पाडा किंवा या पद्धतीने निवडणुकीला सामोरे जा, यांचा पराभव करा.. या सगळ्या गोष्टी होत्या, असे दिल्लीतले लोक सांगतात. त्यांना अमित शहा आणि त्या लोकांचे मार्गदर्शन होते. अजित पवार अनेक भाषणांतून सांगत असतात की, पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्याशी माझे अत्यंत घरोब्याचे संबंध आहेत. तो घरोबा याच्यातून स्पष्ट होतो.

पवार कुटुंबाच्या एकसंधपणाचे उदाहरण राजकारणात नेहमी दिले जायचे. पण अखेरीस पवार कुटुंबातही फूट पडली. हे सगळे घडताना तुमच्या काय भावना होत्या?

- मला काळजी वाटत होती. पण आमच्या कुटुंबात अजित आणि त्याचे कुटुंबीय सोडले तर बाकी सगळे एकत्र आहेत. गेली अनेक वर्षे राहिले तसे सगळे एकत्र राहिले असते तर आनंद झाला असता. अनेकदा काही गोष्टी आपल्याकडून होतात. त्यासंबंधीचे दडपण कुणीतरी आणू पाहात असेल, त्यामुळे अस्वस्थता किंवा चिंता असेल तर त्यावेळेला तडजोडी होतात. इथे तशी तडजोड करण्याची वेळ त्यांच्यावर आली असावी, असे प्रथमदर्शनी दिसते.

लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्प्यानंतर तुम्हाला राज्यातील मतदारांची काय भूमिका जाणवते?

- तरुण पिढी आणि ज्येष्ठांची पिढी यांची सामुदायिक शक्ती एकत्र होते आहे. विरोधकांना प्रोत्साहित करेल अशा पद्धतीची पावले ती टाकत आहे. लोकांचा मोदींबद्दल भ्रमनिरास झाला आहे, हे आज हळूहळू दिसायला लागले आहे. लोक ज्या मनःस्थितीत आहेत, त्याची प्रचिती आम्हाला प्रचारादरम्यान फिरताना येते.

देशाच्या पातळीवर काय चित्र दिसते? ‘इंडिया आघाडी’ला किती यश मिळेल?

- देशाचे चित्र आज काही सांगता येणार नाही. पण निवडणुका झाल्यानंतर सगळे लोक एकत्र येतील आणि पर्यायी शक्ती निर्माण करू शकतील. ती जर केली तर देशाचा चेहरा बदलेल. प्रथमदर्शनी असे दिसते की, संपूर्ण दक्षिण भारत एका बाजूला आहे. त्याच्यामध्ये भर महाराष्ट्र घालेल. पश्चिम बंगाल, पंजाब, हरियाना, दिल्ली भर घालेल. यासगळ्यांची सामूहिक शक्ती नक्कीच देशाचे नेतृत्वसुद्धा बदलायला, देशामध्ये परिवर्तन घडवायला उपयुक्त ठरू शकते. त्यावेळेला देशाचा चेहरा वेगळा दिसेल.

Sharad Pawar interview
Sharad Pawar : शरद पवार अन् उद्धव ठाकरेंना बघण्यासाठी इचलकरंजीत चेंगराचेंगरी

व्यक्तिगत अहंकार असलेले विरोधी नेते निवडणुकीनंतर एकत्र येऊ शकतील?

- निवडणुकीनंतर येतील. निवडणुकीच्या आधी अनेकदा कोणती जागा कुणी लढवावी यावरून मतभिन्नता असते. ती मतभिन्नता म्हणजे अहंकार असे वाटते, पण तसे नसते. ज्या मतदारसंघात काम केले त्या मतदारसंघातून निवडून येण्याचा आत्मविश्वास असतो, त्यामुळे ते घडते.

महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये सांगली, दक्षिण मुंबई या जागांवरून अखेरच्या टप्प्यात किरकिर झाली. तुम्ही तुमचा अधिकार वापरला असता तर तिथे काही गोष्टी सोपेपणाने पार पडल्या असत्या, असे म्हटले जाते...

-आमचे जवळपास ९५ टक्के प्रश्न सुटले होते. प्रश्न होता सांगलीचा. आणि सांगलीचा विषय ज्या पद्धतीने निघाला ती गोष्ट मला स्वतःला काही पसंत नव्हती. त्यामुळे मी त्याच्यात लक्ष दिले नाही.

पण तुम्ही उद्धव ठाकरेंना सांगू शकला असता. २००४ मध्ये चंद्रपूरचा काँग्रेसचा उमेदवार ठरवताना तुम्ही थेट काँग्रेसच्या दिल्लीतल्या नेतृत्वाशी बोलून उमेदवार बदलायला भाग पाडले होते. इतका ठोस हस्तक्षेप तुम्ही करणे अपेक्षित होते...

- त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना हा रस्ता योग्य नाही हे आम्ही सुचवत होतो. पण त्यांनी एक भूमिका जाहीरपणे घेतली. जाहीरपणे एखादी भूमिका घेतल्यानंतर मार्ग निघणे अवघड बनले.

अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीला तुमचे समर्थन होते, किंवा तुम्हाला त्याची कितपत कल्पना होती?

-दोन्ही गोष्टी नव्हत्या. समर्थन तर नव्हतेच, कल्पनाही नव्हती. ‘भाजपबरोबर जाऊन सत्तेत गेले पाहिजे. सत्तेशिवाय राहणे योग्य नाही. विकास करायचा असेल तर सत्ता पाहिजे,’ वगैरे तत्वज्ञान आमच्यातील काही सहकारी मांडत होते. माझ्याशीही बोलत होते. त्यातील काही घटक हेही सांगत होते की, हे केले नाही तर आम्हाला तुरुंगात जावे लागेल. काही लोकांनी आम्हाला सांगितले की आमची घरे जप्त होतील. ईडी, सीबीआयच्या यंत्रणा आम्हाला छळताहेत. एकाच्या कुटुंबाने तर सांगितले, की आम्हाला रस्त्यात गोळ्या घाला पण हा छळ थांबवा. सत्तेत जाण्याचा आग्रह करणारे आमचे काही सहकारी होते. मला स्वतःला ते काही योग्य वाटत नव्हते. राजकारणात विरोधी पक्षाला या पद्धतीने त्रास देणे महाराष्ट्रात कधीच नव्हते. परंतु देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही एक नवीन पद्धती दाखवली, त्याचे परिणाम आमच्या काही लोकांवर झाले.

Sharad Pawar interview
Sharad Pawar : जनतेसाठी माझा आत्मा अस्वस्थ ; शरद पवार यांचे पंतप्रधान मोदी यांना प्रत्युत्तर

१९७८ मध्ये तुमच्या मंत्रिमंडळात जनसंघाचे लोक होते. नंतरच्या काळात २०१४ मध्ये तुम्ही भाजपला बाहेरून पाठिंबा दिला होता. भाजपला पाठिंबा देताना तुमची नेमकी काय भूमिका होती?

- मी जाणीवपूर्वक घेतलेला तो निर्णय होता. हेतू हा होता की भाजप आणि शिवसेना एकत्र येणे योग्य नाही. आम्हाला शिवसेनेला आमच्याबरोबर घ्यायचे होते. हे दोघे एकत्र राहिले तर आमची इच्छा, आमची अपेक्षा पूर्ण होणार नाही. ते टाळायचे असेल तर त्यांच्यात अंतर निर्माण होणे गरजेचे होते. भाजपमध्ये एक वर्ग असा होता की आम्ही म्हणेल ते शिवसेनेने ऐकले पाहिजे, असे म्हणत होता. त्याचप्रमाणे शिवसेनेशिवाय शक्य नाही, असे सांगणाराही एक वर्ग होता. हे लक्षात घेऊन मी अगदी विचारपूर्वक भाजपला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली जेणेकरून भाजप आणि शिवसेना एकत्र येऊ नयेत. तो विचारपूर्वक घेतलेला निर्णय होता, तो पुढे न्यायचा नव्हता. त्या दोघांमध्ये एकवाक्यता होऊ नये, एवढीच काळजी घ्यायची होती.

म्हणजे तुम्ही २०१४ ला पेरले ते २०१९ ला उगवले... ?

- त्याची चर्चा आधी होतीच, परंतु २०१९ला स्पष्ट झाली.

केंद्रात काही बदल झाले आणि बाजूला गेलेल्या काही सहकाऱ्यांनी परत येण्याची इच्छा व्यक्त केली तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे एकत्रीकरण होऊ शकेल?

- दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाचा विचार आमच्या अनेकांच्या मनात आहे. पण आता जे बाहेर गेलेत, भाजपसोबत गेलेत त्या सगळ्यांच्याच संदर्भात त्यांनी तयारी दाखवली तरी त्यांचा विचार करणे मला शक्य होणार नाही. यातल्या काही लोकांच्या बाबतीत हा विचारच आम्ही करू शकत नाही.

Sharad Pawar interview
Sharad Pawar NCP Manifesto 2024: जाहीरनामा नव्हे शपथनामा! शरद पवार गटाने कोणती आश्वासने दिली आहेत ? जाणून घ्या घोषणा

२०१४ आणि २०१९ पेक्षा यावेळचे निवडणुकीचे चित्र वेगळे असल्याचे तुम्ही प्रचारात सांगता. ते नेमके काय आहे?

- पहिल्या दहा वर्षांत नरेंद्र मोदी यांची एक भूमिका होती. त्यांच्यात आत्मविश्वास होता. आज तो मला दिसत नाही. त्याचे कारण लोक या निष्कर्षाशी येऊ लागलेत, की ते बोलतात ते खरे नाही. बोलतात ते करत नाहीत. महागाईच्या प्रश्नासंदर्भात त्यांनी त्यावेळी मनमोहनसिंग यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली होती. ‘मला पन्नास दिवस द्या, मी महागाई कमी करतो’ असे म्हणाले होते. पण ते घडले नाही. त्यावेळी पेट्रोलचा दर लिटरला ७१ रुपये होता. तो पन्नास टक्के खाली आणू असे ते म्हणाले होते. प्रत्यक्षात घडले पेट्रोलचा दर १०६ रुपयांवर पोहोचला. घरगुती गॅसचा दर असाच दुप्पट झाला. यापूर्वी एक पद्धत होती, मनमोहनसिंग पंतप्रधान होते तेव्हा एक वर्ष पूर्ण झाल्यावर ते दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन वर्षाचा लेखाजोखा देशासमोर मांडायचे. आज दहा वर्षे झाली मोदींना पंतप्रधान होऊन, एकदासुद्धा प्रसारमाध्यमांसमोर येऊन त्यांनी भूमिका मांडली नाही. मी राज्यसभेत आहे. राज्यसभेचे अधिवेशन पंचवीस दिवस चालले. तेवीस दिवस ते फिरकलेसुद्धा नाहीत. संसदीय पद्धतीवर त्यांचा विश्वास नाही. त्यांचे एक अनंत हेगडे नावाचे कर्नाटकातले खासदार त्यांनी जाहीरपणे सांगितलं की चारशे जागा आम्हाला पाहिजेत, कारण मोदींना घटनादुरुस्ती करायची आहे. सत्ताधारी पक्षाचे संसदेचे प्रतिनिधी जाहीरपणे बोलतात, हे एक ‘इंडिकेशन’ आहे. आम्हाला असे वाटते की, डॉ. आंबेडकरांनी जी घटना लिहिली तिची चिरफाड करणे देशाच्या हिताचे नाही. मोदींच्या काळात ते होण्याची शक्यता आहे, असा एक संशय लोकांच्या मनामध्ये येतोय.

बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचा निकाल तुम्हाला कसा दिसतो?

- मतदारांच्यावर निकाल अवलंबून आहे. आजपर्यंत कधी वेगळा निकाल लागला नाही. मतदारांच्यासमोर आमचे अनेक वर्षांचे काम आहे. मी आणि माझी विचारधारा याला त्यांनी अनेक वर्षांपासून नेहमीच पाठिंबा दिला आहे

Sharad Pawar interview
Sharad Pawar : पंतप्रधानांनी पदाची किंमत ठेवली नाही ; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची मोदींवर सडकून टीका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com