
पाटणा : नितीश कुमार यांनी भाजप आणि एनडीएतून बाहेर पडत राजद आणि महागठबंधनसोबत सत्ता स्थापण करण्याचा निर्णय घेतला आहे. यापार्श्वभूमीवर भाजपनं त्यांना महाराष्ट्राचा दाखला देत इशारा दिला आहे. शिवसेनेनं आमच्यासोबत विश्वासघात केला त्याचे परिणाम तो पक्ष भोगतोय, असं भाजप नेते सुशील मोदी यांनी म्हटलं आहे. (Shiv Sena betrayed us & faced consequences BJP warning to Nitish Kumar)
नितीश कुमार यांना आरजेडीमध्ये तो मान मिळणार नाही जो भाजपसोबत असताना मिळाला होता. जास्त जागा असूनही आम्ही त्यांना मुख्यमंत्री केले आणि त्यांचा पक्ष फोडण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. ज्यांनी आमचा विश्वासघात केला त्यांनाच आम्ही तोडलं. महाराष्ट्रात शिवसेनेने आमचा विश्वासघात केला आणि त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागत आहेत, असा थेट इशारा भाजपचे राज्यसभेचे खासदार सुशील मोदी यांनी नितीश कुमार यांना दिला आहे.
दरम्यान, नितीश कुमार यांनी राज्यपालांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा केला असून उद्या ते राजभवनात राजदप्रणित महागठबंधनसोबत नवं सरकार स्थापन करणार आहेत. या नव्या सरकारमधील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा उद्या शपथविधी पार पडणार आहे.