
"विजयाबद्दल जनतेचे आभार, आता कोरोनाविरोधातील लढ्याला प्राधान्य" - ममता बॅनर्जी
नवी दिल्ली : निवडणुकीतील या मोठ्या विजयासाठी जनतेचे आभार, पण आता लगेचच मला कोविड प्रतिबंधक कामासाठी काम सुरु करायचं आहे, अशा शब्दांत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निकालानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोबर कोविडच्या परिस्थितीमुळं शपथविधीचा कार्यक्रम हा अगदीच साधेपणाने होईल, असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, तृणमूलच्या विजयानंतर विजयोत्सव साजरा न करता प्रत्येकानं आपापल्या घरी जावं असं आवाहनही ममता बॅनर्जी यांनी दुपारी आपल्या कार्यकर्त्यांना केलं होतं. त्यानंतर राज्यात पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर दीदी पूजा करण्यासाठी कालीघाट मंदिरात गेल्या. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, "कोरोनाचं संकट दूर झाल्यानंतर विजयोत्सव करु. सध्या कोणीही विजयोत्सव करु नये. आता शपथविधी देखील छोट्या स्वरुपात होईल. पश्चिम बंगालच्या जनतेसाठी आम्ही मोफत लस देऊ" अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.
हेही वाचा: ममता बचावल्या कारण तेजस्वी यादवांसारखी केली नाही चूक; जाणून घ्या...
पश्चिम बंगालच्या सर्व २९२ जागांचे निकाल हाती आल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, "मी नंदीग्राममध्ये झालेली हार स्विकारते. तुम्ही विसरुन जा की नंदीग्राममध्ये काय झालं होतं. आमच्या पक्षानं बहुमतानं निवडणूक जिंकली आहे." एकेकाळी ममतांचे सहकारी असलेले आणि भाजपत असलेले सुवेंदू अधिकारी यांनी ममतांचा पराभव केला आहे.
Web Title: Thanks To The People For The Victory Now The Fight Against Corona Is A Priority Says Mamata
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..