Monsoon Session : राज्यसभेतील कोंडी फुटण्याची चिन्हे

दोन आठवडे ‘पाण्या’त : येत्या सोमवारपासून महागाईवर चर्चेस सहमती
two weeks of Monsoon session Rajya Sabha demanding discussion on inflation Venkaiah Naidu
two weeks of Monsoon session Rajya Sabha demanding discussion on inflation Venkaiah Naidusakal

नवी दिल्ली : राज्यसभेत महागाईवर विशिष्ट नियमांतर्गतच चर्चेची मागणी करून विरोधी पक्षसदस्यांनी गदारोळ केल्याने पावसाळी अधिवेशनाचे पहिल्या पूर्ण दोन आठवडयांचे कामकाज जवळपास पाण्यात गेले आहे. मात्र बुधवारी सभापती वेंकय्या नायडू यांनी ही कोंडी फोडण्यासाठीचा आणखी प्रयत्न म्हणून सरकारी मंत्री व विरोधी पक्षनेत्यांची बैठक बोलावली. या बैठकीत पुढील आठवड्याच्या सुरवातीपासूनच दोन्ही सभागृहांत महागाईवर चर्चा करण्याबाबत एक व्यापक सहमती झाल्याचे भाजप सूत्रांनी सांगितले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन कामकाजात सहभागी झाल्याने सरकारने या विषयावर चर्चा करण्याची तारीख सांगण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, सोमवारपर्यंत सरकार व पंतप्रधान आणखी असा निर्णय घेणार नाहीत की ज्यामुळे संसदेत आंदोलन करणे विरोधकांना भाग पडेल, असा टोला एका विरोधी पक्षनेत्याने लगावला.

नायडू यांच्याकडील या बैठकीत विरोधी पक्षनेते मल्लिकाजुर्न खर्गे आणि के. सी. वेणुगोपाल, समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव, तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओब्रायन, द्रमुकचे तिरुची सिवा, शिवसेनेचे संजय राऊत, सीपीएमचे एल्लमारम करीम, भाकपचे विनय विश्वम आणि एमएमकेचे बिनय रेड्को सहभागी झाले होते. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी, सभागृह नेते पीयूष गोयल आदींनी बैठकीत भाग घेतला. दरवाढीच्या मुद्द्यावर सरकार चर्चा करण्यास कधीही तयार असल्याचे मंत्र्यांनी सांगितले.

तीन दिवसांत १२ तास चौकशी

राज्यसभेतील २० खासदारांना गदारोळाबद्दल चालू आठवड्यासाठी निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे शुक्रवारपर्यंत तरी चर्चा होणार नाही असे विरोधी पक्षनेत्यांनी या बैठकीत स्पष्ट केले. नॅशनल हेराल्ड प्रकरणी गेल्या तीन दिवसांत त्यांची १२ तास चौकशी झाली. त्यांना १०० प्रश्न विचारण्यात आले. सोनिया व राहुल गांधी यांची पुढील चौकशी केव्हा होणार हे ईडीने अद्याप स्पष्ट केलेले नाही. जोशी यांनी सांगितले, की संसदेच्या दोन्ही सभागृहांत सोमवारपासून कोणत्याही दिवशी दरवाढीवर चर्चा होऊ शकते.

निलंबित खासदारांचा ५० तासांचा सत्याग्रह

सर्वपक्षीय खासदारांची वर्दळ, सरकारच्या दडपशाहीविरूद्ध जोरदार घोषणाबाजी, निलंबित खासदारांचे क्रांतीगीतांचे सूर, अशा वातावरणाने ऐतिहासिक संसद भवनाच्या प्रांगणातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळा पुन्हा गजबजला आहे. राज्यसभेतील निलंबनाच्या निषेधार्थ गांधी पुतळ्यासमोर २० खासदारांनी बुधवारी ५० तासांचे सत्याग्रह आंदोलन सुरू केले.

बरोबर एका वर्षापूर्वी कृषी कायद्यांवरील गदारोळानंतर राज्यसभेतील १३ खासदारांना निलंबित करण्यात आले होते. तेव्हाही संपूर्ण अधिवेशनादरम्यान असेच वातावरण होते. सर्वपक्षीय खासदारांच्या वर्दळीने हा परिसर जिवंत भासत असे. तेच चित्र बुधवारी दिसले. मंगळवारी निलंबित झालेले १९ व बुधवारी त्यात भर पडलेले संजय सिंह यांनी गांधी पुतळ्यासमोर ठाण मांडले आहे.

‘मोदी-शहा यांनी भारताच्या लोकशाहीलाच निलंबित केले आहे. तुम्ही २४ खासदारांच्या निलंबनाचे काय घेऊन बसलात,‘ अशी उपरोधिक प्रतिक्रिया तृणमूलचे नेते डेरेक ओब्रायन यांनी दिली. तृणमूलच्या डोला सेन यांनी सांगितले की, या आंदोलनाचे विरोधकांनी नियोजन केले आहे. त्यानुसार ठराविक पक्षांना वेळा विभागून देण्यात आल्या आहेत. पाऊस किंवा कमालीचा उन्हाळा असला तरी आज रात्रभर आम्ही येथे बसणार आहोत.

राज्यसभेत बुधवारीही सकाळच्या सत्रातील कामकाज स्थगित करण्यात आले. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे ईडी कारवाईच्या निषेधार्थ आज काळा फेटा बांधून सभागृहात आले होते. शून्य तासाच्या सुरवातीला सभापती वेंकय्या नायडू यांनी सुरवातीचे निवेदन वाचण्यास सुरवात केली. तोच संजय सिंह व तृणमूल काँग्रेस सदस्यांनी महागाई व जीएसटीवर आवाज उठवला. संतप्त झालेले वेंकय्या नायडू यांनी, हा बेशिस्तपणाचा कळस आहे. तुम्ही हेच वर्तन कायम ठेवणार असाल, तर मी सभागृह दुपारी १२ पर्यंत स्थगित करतो असे सांगून तशी घोषणा केली. यावेळी सभागृहात गदारोळ सुरू झाला नव्हता. दुपारी बारा व नंतर दोनला कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर काही मिनिटांतच सभागृह संस्थगित करण्यात आले.

दरम्यान, राज्यसभेत १९ खासदारांचे निलंबन व काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या ईडी चौकशीमुळे काँग्रेस खासदारही संसदेचे कामकाज चालू देण्याच्या मनःस्थितीत नाहीत. साहजिकच दुसराही आठवडा गोंधळ व गदारोळानेच गाजणार हे स्पष्ट झाले आहे.

विरोधकांची बेकी

राष्ट्रपती व उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांच्या एकीला पडलेल्या भेगा आंदोलनातही दिसून येत आहेत. राज्यसभेचे खासदार गांधी पुतळ्यापाशी बसले आहेत. लोकसभेतून निलंबित झालेल्या काँग्रेसच्या चार खासदारांनी संसदेच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंदोलन सुरू केले आहे. खर्गे यांनी राज्यसभेत सरकारच्या विरोधात हल्लाबोल करण्यासाठी सकाळी बैठक बोलावली. त्याकडेही तृणमूल व तेलंगण राष्ट्र समिती सदस्यांनी पाठ फिरविली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com