नवी दिल्ली : देशातील विविध बॅंकांना नऊ हजार कोटी रुपयांचा चुना लावून फरार झालेला कर्जबुडव्या उद्योगपती विजय मल्ल्या याचा समावेश असलेल्या न्यायालयीन अवमान प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने पुढील वर्षी अठरा जानेवारी रोजी अंतिम सुनावणी घेण्याचे ठरविले आहे. याप्रकरणामध्ये आम्ही बराच काळ वाट पाहिली असून आता आणखी काहीकाळ वाट पाहणे आम्हाला शक्य नसल्याचे न्या. यू. यू. ललित यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटले आहे.
याआधी २०१७ मध्ये अवमानप्रकरणी मल्ल्याला दोषी ठरविण्यात आल्याकडे न्यायालयाने लक्ष वेधले. आज ज्या खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी पार पडली त्यामध्ये न्या. एस.आर.भट आणि न्या. बेला.एम.त्रिवेदी यांचाही समावेश होता. ‘‘ मल्ल्याला त्याची बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे, अन्य कोणत्याही कारणामुळे त्याला सुनावणीला उपस्थित राहणे शक्य नसेल तर त्याच्यावतीने वकील युक्तिवाद करू शकतात.’’ असे न्यायालयाने यावेळी नमूद केले.
आम्हाला हे प्रकरण आता जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्येच निकाली काढायचे आहे. याआधी देखील आम्ही बराच काळ वाट पाहिली असून आता आणखी शक्य होणार नाही, असे न्यायाधीशांनी स्पष्ट केले. या प्रकरणामध्ये ज्येष्ठ विधिज्ञ जयदीप गुप्ता यांना न्यायालयीन मित्र म्हणून काम पाहण्याची विनंती कोर्टाकडून करण्यात आली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.