देशाच्या अनेक भागात मुसळधार पाऊस सुरूय.
देशाच्या अनेक भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरूय. भारतीय हवामान खात्यानं (Indian Meteorological Department IMD) पुढील चार दिवस दिल्ली, पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र (Maharashtra), छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये हलका ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलाय. सध्या दक्षिण भारतातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. तेलंगणामध्ये रविवारपर्यंत रेड अलर्ट कायम आहे. तर, कर्नाटक आणि केरळमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे.
तेलंगणातील पावसाबाबत रेड अलर्ट पाहता मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrasekhar Rao) यांनी मुख्य सचिव सोमेश कुमार यांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. राज्यातील सर्व संबंधित विभागांनी सतर्क राहून सुरक्षेच्या उपाययोजना तातडीनं कराव्यात, असं ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी परिस्थितीचा आढावा घेणार असून रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेणार असल्याचं सांगितलंय. पावसाळ्यात कोणताही धोका पत्करू नये आणि अत्यावश्यकतेशिवाय घराबाहेर पडू नये, असं आवाहनही त्यांनी केलंय.
महाराष्ट्रातील मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भात मुसळधार पावसामुळं किमान 130 गावं बाधित झाली असून 200 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. मात्र, आतापर्यंत कुठूनही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाहीय, ही दिलासादायक बाब आहे. मुसळधार पावसामुळं पूर्व महाराष्ट्रामधील गडचिरोलीतील 128 गावांचा संपर्क तुटल्याचं अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितलं.
दरम्यान, हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील वसमत तालुक्यात शनिवारी सकाळी 8.30 वाजतेपर्यंत 150 मिमी पावसाची नोंद झालीय. आसना नदीच्या काठावर वसलेल्या हिंगोली जिल्ह्यातील दोन गावं आणि शेजारच्या नांदेड जिल्ह्यातील हदगाव गावातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना बोलावून लोकांना बाहेर काढण्याचे आणि इतर प्रकारची मदत देण्याचे निर्देश दिले आहेत.
राज्यात आजपासून पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. विशेषतः कोकणातील सर्व जिह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिलाय. कोकणात 200 मिमीपर्यंत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. रत्नागिरी जिह्यातील जगबुडी व कोदवली नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. मुंबईत कांजुरमार्ग, घाटकोपर तसेच रायगड व महाडमध्ये एनडीआरएफच्या प्रत्येकी एक अशा चार तुकड्या तैनात केल्या आहेत. जून ते जुलै महिन्यात नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत राज्यात 67 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.