
नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये आतापर्यंत त्यांनी अनेकांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. काल त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेणार होत्या. मात्र, त्यांच्या तब्येतीच्या प्रश्नामुळे त्यांनी काल पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांची भेट घेतली आहे. आज त्यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. या भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी काही महत्त्वाची विधाने केली आहेत. ही विधाने करताना त्यांनी काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांच्यावर देखील टीका केली आहे. आता त्यांच्या या टीकेवर काँग्रेसकडूनही (Congress) प्रत्युत्तर आलं आहे.
"लढायला तयार नाही त्याला कोण काय करणार?"
पत्रकार परिषदेत त्यांनी म्हटलंय की, आज ज्या प्रकारे देशात फॅसिझम सुरु आहे, त्याविरोधात सक्षम पर्याय निर्माण झाला पाहिजे. मात्र, हे कोणा एकट्याचं काम नाहीये. जो जो सक्षम आहे त्याला घेऊन हे करावं लागेल. भाजपविरोधात लढणारा सक्षम पर्याय असायला हवा, मात्र कोणी लढायला तयार नाही त्याला आम्ही काय करणार? अशा शब्दांमध्ये त्यांनी काँग्रेसवर खोचक टीका केली आहे.
युपीए संपल्याचं विधान
शरद पवार युपीएमधील सर्वात वरिष्ठ नेते आहेत त्यामुळं शरद पवारांनी युपीएचं नेतृत्व करायला हवं का? या प्रश्नावर ममता म्हणाल्या की, "अरे.. तुम्ही युपीएची काय भाषा करता? आता युपीए राहिलेली नाहीये. आता फक्त ते जाहीर करायचं राहिलंय" असं त्यांनी म्हटलंय. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीए आता राहिली नसल्याचंच त्यांनी एकप्रकारे म्हटलंय आणि काँग्रेसवर टीका केली आहे.
काँग्रेसकडून आली रोखठोख प्रतिक्रिया
ममता बॅनर्जी या काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या जवळच्या मानल्या जातात. मात्र, परवा दिल्ली दौऱ्यावर असताना त्यांनी सोनिया गांधींची भेट का घेतली नाही, या पत्रकारांच्या प्रश्नावर त्यांनी दिलेलं उत्तर चर्चेत आलं होतं. त्या म्हणाल्या होत्या की, दरवेळी दिल्लीला आल्यावर मी त्यांची भेट घेणं संविधानानुसार अनिवार्य आहे का? त्यांच्या या उत्तराच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेली आजची टीका बोचरी मानली जातेय. त्याचं उत्तर आता काँग्रेसने दिलंय. "सगळ्यांना भारतीय राजकारणाचं वास्तव चांगलंच माहितीय. जर कुणी काँग्रेसला वगळून भाजपचा पराभव करण्याची स्वप्ने पाहत असेल तर ते फक्त एक दिवास्वप्नच असेल", अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी केसी वेणुगोपाल यांनी दिली आहे.
शरद पवार म्हणाले, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राचं जुनं नातं आहे. आज मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. आपल्याला सन २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात भक्कम पर्याय देता यावा याबाबत आमची चर्चा झाली. नेता रस्त्यावर राहिला तरच त्या पक्षाचा विजय होतो, पण राहुल गांधी कायम परदेशात असतात, अशा शब्दांत ममता बॅनर्जी यांनी राहुल गांधींवर टीका केली होती. पत्रकारांनी याबाबत विचारलं असता. पवार म्हणाले, "पश्चिम बंगालमध्ये ममतांचा जो विजय झाला तो त्यांच्या मेहनतीनं झाला आहे. त्यामुळं त्यांचा वैयक्तिक अनुभावावरुन त्यांनी हे विधान केलं, ज्याचं आम्ही स्वागत करतो"
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.