
अनैतिक संबंधांच्या आरोपावरून पत्नीला खांबाला बांधून मारहाण
पाटणा : बिहारमधील रोहतासमधील (Rohitas Bihar) चेनारी भागातील सिंहपूर गावात प्रेमप्रकरणाच्या आरोपावरून महिलेला खांबाला बांधून मारहाण केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. तीन मुलांच्या आईवर तिच्या पतीने प्रेमसंबंध असल्याचा आरोप केला होता. पोलिसांनी हस्तक्षेप करत महिलेची सुटका केली आहे.
दीपक राम, असे आरोपी पतीचे नाव आहे. तो पीडितेवर नेहमी अनैतिक संबंध असल्याचा आरोप करत होता. त्यांचा वाद पोलिस ठाण्यात पोहोचल्यावर पोलिस अधिकाऱ्यांनी समजूत काढून प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला. पण, घरी पोहोचल्यानंतर पती व त्याच्या कुटुंबीयांनी महिलेला विद्युत खांबाला बांधून ग्रामस्थांच्या उपस्थित मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत महिलेची सुटका केली. याप्रकरणी महिलेचा पती दीप राम, सासरा शिवपूजन राम, केदार राम, धीरेंद्र राम आणि नरेंद्र राम या पाच आरोपींना अटक केली आहे. या घटनेतील अन्य आरोपी फरार असून पोलिस त्यांच्या शोध घेत आहेत. महिलेच्या सुरक्षेसाठी रोहतास पोलिस कटीबद्ध असून असे गुन्हे करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचे पोलिस अधिकारी आशिष भारती यांनी सांगितले.