आपच्या खासदार स्वाती मालीवाल यांनी आज एएनआयला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्या दिवशी काय घडलं याबाबत पुन्हा एकदा सांगितलं आहे. वृत्तसंस्था एएनआयला दिलेल्या मुलाखतीत १३ मेच्या घटनेचा संदर्भ देत मालीवाल यांनी सांगितलं की, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्यांच्या निवासस्थानी उपस्थित होते. तेव्हा त्यांचे पीए बिभव कुमार यांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचे त्यांनी सांगितले आहे.
स्वाती मालीवाल यांनी सांगितले की, मी १३ मे रोजी सकाळी ९ वाजता केजरीवाल यांच्या निवासस्थानी गेले होते. कर्मचाऱ्यांनी मला ड्रॉईंगरूममध्ये बसायला सांगितले आणि मुख्यमंत्री केजरीवाल मला भेटायला येणार असल्याचे सांगितले. त्याच क्षणी बिभव कुमार तिथे आले. मी त्यांना सांगितले की अरविंद केजरीवाल मला भेटायला येत आहेत. मी असे सांगितल्यानंतर आणि त्यांनी मला मारहाण करण्यास सुरुवात केली.
त्यांनी मला सात-आठ वेळा चापटा मारल्या. मी त्यांना दूर ढकलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी माझे पाय धरले आणि मला जमिनीवर पाडले. माझे डोके सेंटर टेबलवर आदळले. मी जमिनीवर पडताच त्यांनी मला लाथा मारायला सुरुवात केली. मी मदतीसाठी आरडाओरडा केला पण तिथे कोणीच मदतीसाठी आले नाही.
स्वाती मालीवाल म्हणाल्या की, माझ्या मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही हे खूप विचित्र आहे. मी जोरात ओरडत होते. जेव्हा स्वाती मालीवाल यांना विचारण्यात आले की, तिला मारहाण करण्याची सूचना कोणी केली होती, त्यावर बोलताना त्या म्हणाल्या की, त्यांनी हे स्वतःहून केले आहे की कोणी त्यांना तसे करण्यास सांगितले आहे, हा तपासाचा विषय आहे. मी सध्या तपासात पूर्ण सहकार्य करत आहे.
मी कोणालाही क्लीन चिट देत नसल्याचे स्वाती मालीवाल यांनी म्हटलं आहे. पुढे त्या म्हणाल्या सत्य हे आहे की मला मारहाण होत होती आणि अरविंद केजरीवाल निवासस्थानी उपस्थित होते.
मालीवाल पुढे म्हणाले की, त्यांना माझी राज्यसभेची जागा हवी असती, त्यांनी ती प्रेमाने मागितली असती, तर मी जीव सुध्दा दिला असता, खासदारकी ही फार छोटी गोष्ट आहे. त्यांनी मला ज्या पद्धतीने मारले आहे, आता काहीही झाले तरी मी राजीनामा देणार नाही. 13 मे रोजी अपॉइंटमेंट न घेतल्याच्या 'आप'च्या आरोपांवर, आप खासदार स्वाती मालीवाल म्हणाल्या की, मी जेव्हाही त्यांच्या (अरविंद केजरीवाल) घरी गेले आहे, तेव्हा मी कधीही अपॉइंटमेंट घेतली नाही. ते सांगत आहेत की माझी अपॉइंटमेंट नाही. पण मी नेहमी अपॉइंटमेंटशिवाय गेली आहे. त्याच क्षणी त्याने मला बाहेर जाण्यास सांगितले असते तर मी बाहेर गेलो असतो. जर कोणी अपॉइंटमेंट घेऊन आला नाही तर तुम्ही त्याला मारहाण कराल का, असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे.
स्वतंत्र आणि निष्पक्ष पोलिस तपासाबाबत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विधानावर, आपच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी सांगितले की त्यांनी न्यायालयाबाहेर खटला चालवला आणि मला दोषी ठरवले. संपूर्ण पक्ष मला दोषी ठरवण्यात व्यस्त आहे, ते कसे म्हणू शकतात की या प्रकरणाचा तपास निष्पक्ष व्हावा? ते रोज काहीतरी व्हिडिओ पोस्ट करतात, कधी मी भाजपचा एजंट आहे असे सांगतात, कधी चारित्र्यहनन करतात, कधी धमक्या देतात. अशा परिस्थितीत स्वतंत्र आणि निष्पक्ष तपास कसा होणार? असा सवालही त्यांनी पुढे उपस्थित केला आहे.
मारहाण प्रकरणी तक्रार दाखल करण्यास झालेल्या विलंबावर आप खासदार स्वाती मालीवाल म्हणाल्या की, तुम्ही तक्रार दाखल केली तर मला सांगण्यात आले होते. पक्ष मला भाजपचा एजंट घोषित करेल. घटनेनंतर मी पोलीस स्टेशनला पोहोचलो तेव्हा एसएचओसमोर मी खूप रडत होते. त्यावेळी मी माझ्या फोनवर मीडियाचे अनेक कॉल्स पाहिले, तेव्हा मला त्याचे राजकारण करायचे नव्हते.
यानंतर पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते माझ्या घरी आले आणि पक्ष याप्रकरणी कारवाई करेल, असे मला सांगण्यात आले. संजय सिंह माझ्या निवासस्थानी आले. त्यांनी बिभवशीही चर्चा केली, त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी कबूल केले की स्वाती यांच्यावर हल्ला झाला आणि अरविंद केजरीवाल त्याची दखल घेत आहेत. दुसऱ्याच दिवशी आम्ही सर्वांनी बिभव कुमारला या लोकांसोबत लखनौमध्ये पाहिले.
आप खासदार स्वाती मालीवाल यांनी सांगितले की, सध्याचे सर्वात मोठे शासक आणि अरविंद केजरीवाल यांचे सर्वात जवळचे व्यक्ती बिभव कुमार आहेत. त्याचं घर पाहिलं तर त्याला इतकं आलिशान घर दिलं आहे, दिल्लीतल्या एकाही मंत्र्याला असं घर दिलं नाहीये. सध्या ते पक्षातील ताकदवान व्यक्ती असून संपूर्ण पक्ष त्यांना घाबरत आहे. मालीवाल पुढे म्हणाल्या की, माझ्या चारित्र्यहननाचे प्रकार रोज होत आहेत.
'आप'च्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी सांगितले की, मला ट्रोल करण्यात येत आहे. दररोज पत्रकार परिषदा आयोजित केल्या जात आहेत जेणेकरून मी दबावाला बळी पडून प्रकरण संपवेन. त्या एफआयआरमधील माझा प्रत्येक शब्द खरा आहे. मी पॉलिग्राफ, नार्को टेस्टसाठी देखील तयार आहे. मी एकटीच लढेन, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.