झेन व आकाश यांना ‘बाल शौर्य पुरस्कार’

झेन व आकाश यांना ‘बाल शौर्य पुरस्कार’

नवी दिल्ली - मुंबईच्या परळ भागातील दहा वर्षांची झेन सदावर्ते आणि औरंगाबाद जिल्ह्यातील पंधरा वर्षांचा आकाश खिल्लारे यांना यंदाचा (वर्ष २०१९) ‘राष्ट्रीय बालवीर’ व ‘वीरबाला पुरस्कार’ आज दिल्लीत जाहीर करण्यात आले आहेत. देशभरातील १२ राज्यांतील २२ मुलांना यावर्षीच्या प्रजासत्ताकदिनी राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. 

सहा श्रेणींमध्ये देण्यात येणाऱ्या या पुरस्काराचे स्वरूप पदक, प्रशस्तिपत्र आणि रोख रक्कम असे आहे. पुरस्कारप्राप्त बालकांना बालकल्याण परिषदेच्या वतीने शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत करण्यात येते. तसेच, वैद्यकशास्त्र आणि अभियांत्रिकीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना इंदिरा गांधी शिष्यवृत्तीअंतर्गत पदवी पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत पुरविण्यात येते.  

या बालकांना पंतप्रधानांनी आपल्या निवासस्थानी बोलावून गौरविण्याची परंपरा मागच्या वर्षीपासून खंडित झाली आहे. भारतीय बालकल्याण परिषदेच्या अध्यक्ष गीता सिद्धार्थ यांनी पुरस्कारांची घोषणा केली. यंदा दहा मुली आणि १२  मुले अशा एकूण २२ बालवीरांना वर्ष २०१९ च्या ‘राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येणार आहे. एका मुलास हा पुरस्कार मरणोत्तर जाहीर झाला आहे.

मुंबईच्या परळ भागातील राहत्या इमारतीला २२ ऑगस्ट २०१८ मध्ये लागलेल्या भीषण आगीत झेन सदावर्ते हिने विलक्षण धाडस दाखवून १७ जणांचे प्राण वाचविले. झेन राहत असलेल्या १७ मजली इमारतीला अचानक आग लागली. १६ व्या मजल्यावर राहणाऱ्या झेनच्या कुटुंबीयांना आग लागल्याचे कळताच तिच्या आई वडिलांनी तिला झोपेतून उठवले. झेनने स्वयंपाकघराची खिडकी उघडताच संपूर्ण घरात धूर पसरला अशातच शेजारून काही लोकांच्या ‘वाचवा- वाचवा’ अशा आर्त किंकाळ्या तिच्या कानावर पडताच ती घराबाहेर आली आणि आवाजाच्या दिशेने धावली. आगीच्या विळख्यात सापडलेल्या या लोकांना धीर देत झेनने सुरक्षित स्थळी सर्वांना हलविले. तिने त्या मजल्यावरील विजेचा मेन स्वीच बंद केला व अग्निशामक दलालाही फोन केला. आपत्तिकाळात स्वसंरक्षणासाठी शाळेत शिकविलेले उपाय प्रत्यक्षात आणत झेनने या सर्वांना आपल्याकडील विशिष्ट मास्क दिले व एकाच ठिकाणी सर्वांना खाली बसविले. यानंतर अग्निशामक दलाची गाडी येऊन जवानांनी झेनसह आगीत अडकलेल्या १७ जणांना सुरक्षित बाहेर काढले. झेनच्या प्रसंगावधानाने व धाडसामुळे १७ जणांचे प्राण वाचले.

देवेशला ‘बालशक्ती’ पुरस्कार
जळगाव - येथील एल. एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमधील सातवीचा विद्यार्थी देवेश भय्या याची भारत सरकारच्या ‘बालशक्ती’ पुरस्कारासाठी निवड झाली आहे. दिल्लीत उद्या (ता. २२) राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोंविद यांच्या हस्ते त्यास पुरस्कार देऊन सन्मानित केले जाईल. भारत सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयातर्फे दरवर्षी विविध क्षेत्रांत विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बालकांची या पुरस्कारासाठी निवड केली जाते. देवेश भय्या याची शैक्षणिक विभागातून पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com