Desh : शांतता भंग करणाऱ्यांवर कारवाई करू ; मुख्यमंत्री भगवंत मान

अमृतपालच्या अटकेनंतर मुख्यमंत्री भगवंत मान यांचा इशारा
Bhagwant Mann
Bhagwant Mannsakal

चंडीगड : खलिस्तान समर्थक आणि ‘वारिस पंजाब दे’ या फुटीरतावादी संघटनेचा प्रमुख अमृतपालसिंग याला आज सकाळी मोगा जिल्ह्यात झालेल्या अटकेनंतर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी समाधान व्यक्त करतानाच, शांतता आणि कायद्याचा भंग करण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई करू, असा इशाराही अमृतपाल समर्थकांना दिला आहे.

अमृतपालला अटक झाल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना भगवंत मान म्हणाले,‘‘अमृतपालविरोधात ३५ दिवस सुरु असलेल्या मोहिमेनंतर आज त्याला अटक झाली. देशातील शांतता भंग करणाऱ्यांवर आम्ही निश्‍चित कारवाई करू. सामान्य नागरिकांना त्रास देण्याचा आमचा कोणताही इरादा नसून सूडाच्या राजकारणावरही आमचा भरवसा नाही.’’ सामाजिक एकतेचा भंग करण्याचे अनेक प्रयत्न होऊनही जनतेने शांतता राखल्याबद्दल मुख्यमंत्री मान यांनी आभार व्यक्त केले.

‘अंजाला पोलिस ठाण्यावर हल्ला करताना हल्लेखोरांनी गुरु ग्रंथसाहिबचा ढाल म्हणून वापर केला. त्यामुळे आम्ही त्यांच्यावर पाण्याचा फवाराही मारला नाही आणि लाठीमारही केला नाही. हल्लेखोरांच्या हल्ल्यात काही पोलिस जखमी झाले तरी आम्ही गुरु ग्रंथसाहिबचा अवमान होऊ दिला नाही,’ असे मान यांनी सांगितले. ‘आप’चे प्रमुख नेते अरविंद केजरीवाल यांनी आजच्या कारवाईबद्दल मुख्यमंत्री मान यांचे कौतुक करतानाच, ‘आम्ही शांतता राखण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि त्यासाठी कठोर निर्णय घेण्यासही तयार आहोत,’ असे स्पष्ट केले.

अमृतपालची कोंडी

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फरार झालेल्या अमृतपालची भारत आणि राज्य सरकारने कोंडी केली होती. त्याच्या अनेक जवळच्या साथीदारांना पोलिसांनी अटक केली. त्याची ब्रिटनमध्ये राहणारी पत्नी किरणदीप कौर ही लंडनला जाण्यासाठी अमृतसर विमानतळावर आली असता तिला विमानात बसण्यापासून रोखण्यात आले.

अमृतपालच्या अनेक समर्थकांनाही पोलिसांनी काही काळ ताब्यात घेतले होते. सध्या दिब्रुगड येथील तुरुंगात दलजितसिंग कालसी, पापलप्रीतसिंग, कुलवंतसिंग धालिवाल, वारिंदरसिंग जोहाल, गुरमितसिंग बुक्कनवाला, हरजितसिंग, भगवंतसिंग, बसंतसिंग आणि गुरिंदरपालसिंग औजला हे अमृतपालचे नऊ साथीदार बंदिस्त आहेत. यापैकी पापलपप्रीतसिंग यानेच अमृतपालला प्रशिक्षण दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

अमृतपाल प्रकरणाचा घटनाक्रम २०२२

  • २९ सप्टेंबर : अमृतपालची ‘वारिस पंजाब दे’चा प्रमुख म्हणून नियुक्ती

  • १२ डिसेंबर : समर्थकांकडून जालंधरमधील गुरुद्वारात खुर्च्यांची जाळपोळ

  • २०२३

  • १० फेब्रुवारी : अमृतपालचा अनिवासी भारतीय किरणदीप कौरशी विवाह

  • १६ फेब्रुवारी : अमृतपाल, लव्हप्रीत यांच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा

  • १७ फेब्रुवारी : लव्हप्रीतला अटक

  • २३ फेब्रुवारी : लव्हप्रीतला सोडविण्यासाठी अमृतपालचा सहकाऱ्यांसह अंजाला पोलिस ठाण्यावर सशस्त्र हल्ला

  • १८ मार्च : ‘वारिस पंजाब दे’विरुद्ध पोलिसांची मोहिम; अमृतपाल फरार

  • २० मार्च ते १५ एप्रिल : अमृतपालच्या विविध सहकाऱ्यांना अटक

  • २३ एप्रिल : अमृतपालला अटक

‘अमृतपालचे काम तर व्यसनमुक्तीचे’

अमृतसर : ‘पंजाबमधील अमलीपदार्थांची तस्करी आणि व्यसनाधिनता या संकटांपासून युवकांना वाचविण्यासाठीच अमृतपाल काम करत होता,’ अशी प्रतिक्रिया त्याचे वडिल तारसेमसिंग यांनी दिली आहे. अमृतपालला अटक झाल्यानंतर पत्रकारांनी तारसेमसिंग यांच्याशी संपर्क साधल्यावर ते म्हणाले,‘‘अमृतपाल शरण गेल्याचे आम्हाला बातम्यांमधूनच समजले. आम्हालाही तेच हवे होते, कारण त्याच्यामुळे इतर अनेक लोकांना पोलिसांच्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. आम्ही त्याच्यासाठी लढा देऊ.

सर्व समाजाने असा लढा द्यायला हवा. अमृतपाल हा अमलीपदार्थांमुळे राज्यात निर्माण झालेल्या समस्येपासून युवकांना वाचविण्यासाठी काम करत होता.’’ अमृतपालच्या आई बलविंदर कौर यांनीही शरणागतीबद्दल समाधान व्यक्त केले. ‘माझा मुलगा लढवय्यासारखा शरण गेला. आम्ही त्याच्यासाठी कायदेशीर लढाई लढू. आम्ही लवकरच त्याची भेट घेऊ,’ असे त्या म्हणाल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com