न्यू नॉर्मल : अक्षय ऊर्जा आणि कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akshay Urja

अक्षय किंवा अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या आणि अग्रेसर असलेल्या काही कंपन्या त्यांच्या ‘सीएसआर’ फंडामार्फत अनेक समाजोपयोगी प्रकल्प राबवतात.

न्यू नॉर्मल : अक्षय ऊर्जा आणि कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी

अक्षय किंवा अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या आणि अग्रेसर असलेल्या काही कंपन्या त्यांच्या ‘सीएसआर’ फंडामार्फत अनेक समाजोपयोगी प्रकल्प राबवतात. आरोग्य, शिक्षण याबरोबरच पर्यावरणाचे संरक्षण महत्त्वाची उद्दिष्टे समोर ठेऊन या कंपन्या समाज कल्याणासाठी योगदान देत असतात.

अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड ही कंपनी ‘सीएसआर’ फंडातून विविध उपक्रम राबवीत आहे. टाटा पॉवर सोलर, उच्च दर्जाची उत्पादने वितरित करत असताना शाश्वत व्यवसाय पद्धतींचा अवलंब करण्यावरही तितकेच लक्ष केंद्रित करते. सुझलॉन एनर्जी लिमिटेड ही अजून एक अक्षय ऊर्जा क्षेत्रात काम करणारी अग्रगण्य कंपनी आहे. ‘जीएमआर’एनर्जी हा भारतातील सर्वांत मोठ्या वैविध्यपूर्ण पायाभूत सुविधा असलेल्या ‘जीएमआर’समूहाचा एक भाग आहे. जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी जीएमआर फाउंडेशन स्थानिक समुदायांसाठी म्हणजे भारतातील दुर्गम गावांमध्ये आरोग्य आणि स्वच्छता सेवांची उपलब्धता वाढविण्याच्या दिशेने कार्य करते. फाउंडेशनच्या प्रशिक्षण संस्था तरुणांचा आत्मविश्वास आणि प्रेरणा स्तर बळकट करून त्यांच्यातील उद्यमशीलता विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करतात. समाजातील वंचित समुदायांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी ते चांगल्या शिक्षण संस्थांसोबत भागीदारी करतात.

सौर ऊर्जा उत्पादनात रिन्यू पॉवर ही पहिली स्वतंत्र ऊर्जा उत्पादक भारतीय कंपनी आहे. एकूण ऊर्जा उत्पादन क्षमतेचा विचार करता, रिन्यू पॉवर ही अपारंपरिक ऊर्जेच्या क्षेत्रात पहिल्या क्रमांकाची कंपनी आहे, असे म्हटले तरी चालेल. २०११मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीनं २०१९मध्ये प्रस्थापित क्षमता वाढवताना ५ गिगॅवॉटचा टप्पा ओलांडला. या कंपनीने २०१९-२०मध्ये भारतातल्या एकूण उत्पादनात १ टक्का योगदान दिले होते. यामुळे देशातल्या एकूण कार्बन उत्सर्जनात ५ टक्के घट झाली.

युनायटेड नेशन्स एन्व्हॉयरमेंट प्रोग्रॅम, सेल्फ एम्प्लॉईज विमेन्स असोसिएशन आणि रिन्यू पॉवर यांनी परस्पर सहकार्यानं आधुनिक स्वच्छ ऊर्जेच्या क्षेत्रात ग्रामीण महिलांना रोजगार मिळावा यासाठी कौशल्य शिक्षण कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. या प्रकल्पामुळे केवळ रोजगार निर्मिती होणार नसून प्रतिष्ठित कामाची संधी, लिंगसमभाव, परवडणाऱ्या दरात स्वच्छ ऊर्जा, हवामानबदल विषयक कृती, आणि ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासाला चालना देणारा शाश्वत विकास प्रत्यक्षात येणार आहे. दोनशे महिलांनाही प्रशिक्षण दिले आहे. त्यातील सहा महिलांना व्यवसाय उभारणीसाठी सीड कॅपिटल देण्यात आले. त्याच सामाजिक उत्तरदायित्वाचा भाग म्हणून आम्ही पनियारा येथील शाळेमध्ये, शाळेबाहेर असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण घेतले. मुलींना ब्युटी पार्लर चालवायचे होते, मुलांना मोबाईल दुरुस्तीचे काम करायचे होते. उंचावलेल्या जीवनमानाची ‘ॲस्पिरेशनल इंडियाची’ ही चुणुक मी पाहत होते.

यासाठी त्यांना हवी होती वीज घरात...शेतात...शाळेत...रस्त्यात...गिरणीत आणि सर्वत्र आली. आपण रोज उजेडाबरोबर राहतो उजेड मिळण्याची नवलाई आपल्याला आज नाही. तो उजेड देऊन सौरऊर्जेने भारतात नवी क्रांती घडवली हे खरं आहे!