चर्चेतला मुद्दा : विद्यार्थ्यांच्या शिकण्यातील अडथळे

नवे शैक्षणिक धोरण उंबरठ्यावर असताना शिक्षणातून संभाव्य फायदे मिळत नाहीत, असा समज विद्यार्थी करून घेत असल्यासर परिस्थिती गंभीर आहे.
student learning
student learningsakal

- डॉ. उमेश दे. प्रधान

नवे शैक्षणिक धोरण उंबरठ्यावर असताना शिक्षणातून संभाव्य फायदे मिळत नाहीत, असा समज विद्यार्थी करून घेत असल्यासर परिस्थिती गंभीर आहे. या अनुषंगाने शिक्षणाशी संबंधित सर्वच घटकांनी या टीकेकडे गांभिर्याने पाहायला हवे आणि बदलही करायला हवेत.

विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या सहज वृत्तीकडे, नैसर्गिक चौकस विचार करण्याच्या शक्तीवर काही विपरीत परिणाम करणारे आपल्याकडून होतेय का, मुलांच्या सर्जनशील मतांवर आपण काही बंधने घालतो आहोत का, विद्यार्थ्यांची केवळ पाठांतर करायला भाग पाडून त्यांना केवळ माहितीची संग्रहालये बनवली जात आहेत का, मुलांच्या आवडी निवडी, गरजा यांचा काही विचार आपण करतो आहोत का, मूल्यमापनाच्या नावाखाली केवळ आशयाचे पुनर्लेखनच अपेक्षित धरले जातेय का, याचा आत्मशोध घ्यायला हवा. या प्रश्नांच्या मिळणाऱ्या उत्तरांमध्येच उद्याच्या शैक्षणिक व्यवस्थेचे यश अवलंबून असणार आहे.

शिक्षणसाहित्य आणि अभ्यास

गाईड्स, तयार साहित्य, परीक्षा डोळ्यासमोर ठेऊन लिहिलेले मार्गदर्शन हे मुलांमधील शिकण्याच्या स्वभावाला मुरड घालणारे आहे. परीक्षेत उत्तीर्ण होणे म्हणजे शिकणे नव्हे, हे समजून देण्याची वेळ आली आहे.

शिक्षकच अशा साहित्याचा वापर वर्गात करायला लागतात, तेव्हा परिस्थितीचे गांभीर्य अजूनच गडद व्हायला लागते. परीक्षांमधील निकाल उंचावण्याची हमी देणारे खासगी शिकवणी वर्ग अपेक्षित अध्ययन प्रक्रिया जोपासण्याला, सर्जनशील विचार व्यक्त करायला कितपत प्रेरक ठरतात?

मुलांमधील निसर्गदत्त शिकण्याच्या सहज प्रवृत्तीला प्रेरक असे तेथील अध्यापन असते का, की केवळ परीक्षा डोळ्यासमोर ठेऊन त्यासाठीचीच केवळ तयारी करून घेणारी, प्रगतीस मारक अडथळा केंद्रे बनत आहेत? शिक्षक मुलांच्या अध्ययन प्रक्रियेबद्दल कितपत जागरूक आहेत?

आपल्या अध्यापनपद्धती विद्यार्थ्याला विचार करायला प्रवृत्त करणाऱ्या आहेत का? त्याला त्याची अभिव्यक्ती करण्याची संधी आपण देतो, याचा आत्मशोध ते कधी घेतात का? शिकवण्याचे आपले काम उत्प्रेरकाचे आहे हे जाणून शिक्षकांनी विषयातील आशयापलीकडे जाऊन मुलांना अध्ययनाला प्रेरित केल्यास बरेच काही साध्य होईल.

मुलांमधील संशोधक वृत्ती, चौकसपणा, कल्पनारम्यता, पृच्छावृत्ती या सगळ्यांना जर आद्यक्रम दिल्यास मुलांचा शाळेत येण्याचा दृष्टिकोन बदलायला मदत होईल. शिक्षकांनी यासाठी आपली मार्गदर्शकाची भूमिका नीट समजून वर्गात वागायला हवे. पालकांनीही आपल्या पालकत्वाच्या भूमिकेकडे जाणीवपूर्वक पाहायला शिकावे. आपण आपल्या पाल्याच्या शिक्षणात अडथळा बनत नाही ना, याचा शोध घ्यायला हवा.

‘स्व’ची जाणीव महत्त्वाची

शाळांमधून शिक्षक सांगतील ती पूर्वदिशा मानण्याची वृत्ती अजूनही टिकून आहे. पुस्तकात सांगितले तेवढेच शिकवणे आणि शिकणे यातच बुद्धिमत्तेचा कस लावला जातो. जोपर्यंत हे असेच घडते आहे, तोपर्यंत उद्याचे संशोधक, शास्त्रज्ञ, विचारवंत, साहित्यिक निर्माण होण्याची शक्यता दुरापास्तच.

ही परिस्थिती बदलायची असेल तर ‘स्व’ची जाणीव निर्माण करून देण्याचे कार्य शाळांमधून प्राधान्याने हाती घ्यावे लागेल. मळलेल्या वाटेवरून जाणाऱ्यांपेक्षा नवे मार्ग निर्माण करणाऱ्यांना प्रोत्साहित करावे लागेल. विद्यार्थ्यांना काय शिकायचे आणि कसे शिकायचे या बाबत जागृत करावे लागेल.

विद्यार्थी आपल्याबरोबर काय घेऊन आले आहेत, याचा शोध घेऊन त्या वृत्तीची जोपासना, वृद्धी करणे हे शिक्षकाने आपले कार्य समजले पाहिजे. शिक्षणाकडे पाहण्याचा समाजातील प्रत्येकाचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. नव्या परिपेक्षात राहून शिक्षण व्यवस्थेकडे नव्याने पाहायला हवे, तरच समाजाचा हा विचार बदलायला मदत होईल.

(लेखक शिक्षणतज्ज्ञ आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com